Vidhan Parishad Election 2022 : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदानाला भाजपकडून आजारी आमदारांना बोलावण्यावरुन शिवसेनेनं टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की, भाजप सर्व मार्गांनी केवळ विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असून यामध्ये अगदी सरकारी यंत्रणा, स्वत:च्या आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणण्यासारखे प्रकार करत असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.  मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, हे भेदाभेदीचेच राजकारण. पण त्याच वेळेला लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक या दोन आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणले जाते. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते. विजयाची किंवा चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजपा कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो. याचेच नाव चमत्कार, असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.


काय म्हणाल्या मुक्ता टिळक
भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की,  पक्ष आदेशानुसार आपण मतदानासाठी जात आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे मी आज मतदानाला जात आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी माझे आभार मानले, असं मुक्ता टिळक यांनी सांगितलं.  पक्षातील सर्वचजण काळजी घेतात. त्यामुळे विशेष ममत्व वाटतं, असंही त्या म्हणाल्या.


भाजप आमदार लक्ष्मण जगताप ऍम्ब्युलन्सने मतदानासाठी 


राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचे मत हे बहुमूल्य ठरले होते. आता विधानपरिषदेच्या आखाड्यात ही तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच आजारग्रस्त आमदार जगताप मतदानासाठी मुंबईला आलेत.  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मतदानाला येऊ नका असे सांगितले होते.  मात्र तरीही लक्ष्मण जगताप मतदानाला येण्यावर ठाम होते. लक्ष्मण जगताप दुपारपर्यंत मतदानाला पोहोचतील, अशी माहिती आहे.  लक्ष्मण जगताप यांना देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती. जगताप यांच्यां बंधूंनी म्हटलं की, राज्यसभेच्या वेळीही पक्षानं स्पष्टपणे सांगितलं होतं की, तब्येत बरोबर नसेल तर येऊ नका. पक्षापेक्षा व्यक्ती आम्हाला महत्वाचा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. पक्षानं मतदानासाठी आग्रह केला नव्हता, असं ते म्हणाले.