Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) एनडीएला (NDA) बहुमत मिळालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. अशातच एनडीएनं सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या 8 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं एनडीएनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अशातच नरेंद्र मोदींनी आपल्या आज (5 जून) पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती मुर्मूंनी हा राजीनामा स्विकारला असून आजपासून मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहणार आहेत. एनडीए बैठकीआधी लोकसभा भंग करण्याची औपचारिक माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाल्याचं कळतंय. 






8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता 


बुधवारी (5 जून) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊ शकतात. सूत्रांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, या काळात पंतप्रधान मोदी सरकार स्थापनेला पाठिंबा देणारं पत्र राष्ट्रपती मुर्मू यांना सुपूर्द करू शकतात. 


शुक्रवारी (7 जून) दुपारी 2.30 वाजता संसद भवनात एनडीएच्या खासदारांची बैठक होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. या बैठकीला एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. हा शपथविधी कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान होऊ शकतो.


कसं असेल मोदी 3.0 सरकार? 


2014 नंतर पहिल्यांदाच भाजप 272 च्या बहुमतापासून मागे पडलं आहे. पण, यंदा नव्या सरकारचा चेहरामोहरा बदलू शकतो, अशी शक्यता राजकीय वपर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपला एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या अन्य पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. 


कोणाला किती जागा मिळाल्या?


भाजपनं 240 जागा जिंकल्या आहेत. तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) 16, जेडीयू 12, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 7 आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) 5 जागा जिंकल्या आहेत. ते सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतील.