Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तेलगु देसम आणि जेडीयुमुळे मदत झाली नसती तर बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता भाजपमध्ये नव्हती, असे शरद पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी पूर्ण बहुमत आहे का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 
 
खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीचा निकाल जर बघितला व एकंदरीत झालेले मतदान पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये जे होतं त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. त्यांची संसदेतील संख्या कमी झाली, संसदेतील त्यांचे बहुमत कमी आहे. तेलगु देसम आणि जेडीयुमुळे बिहार आणि आंध्र या भागातून मदत झाली नसती तर बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती, असे शरद पवार म्हणाले. 


बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती- 


गेल्या २५ वर्षांत आपण अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले. काही ठिकाणी संघर्षाबद्दल व काही ठिकाणी नवीन दिशा दाखवण्याबद्दल. आज वेगळ्या स्थितीतून देश चालला आहे, देशाचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये आहे. खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल जर बघितला व एकंदरीत झालेले मतदान पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये जे होतं त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. त्यांची संसदेतील संख्या कमी झाली, संसदेतील त्यांचे बहुमत कमी आहे. तेलगु देसम आणि जेडीयुमुळे बिहार आणि आंध्र प्रदेश या भागातून मदत झाली नसती तर बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती, असे शरद पवार म्हणाले. 


आता सत्तेचे विकेंद्रीकरण पूर्ण नाही 


गेली ५ वर्ष सरकार चालवलं ते त्या लोकांनी आपल्या मनाप्रमाणे चालवलं, त्यांनी देशाचा कुठलाही विचार केला नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचे सूत्र आणि आम्ही सांगेल तीच नीती, आम्ही सांगू ते धोरण, हेच सूत्र ठेवून देशामध्ये काम केलं. सुदैवाने देशातील जनतेने देशामध्ये ही नीती पुन्हा निर्माण होणार नाही, याची नोंद घेतली, त्या प्रकारे मतदान करून प्रचंड अधिकार या एक दोन लोकांच्या हातामध्ये होता, त्याला मर्यादा आणण्याबद्दलची काळजी घेतली. आता सत्तेचे विकेंद्रीकरण पूर्ण नाही, पण त्याची प्रक्रिया सुरू होणार, हे प्रशासन आता देशाला बघायला मिळेल. शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या-माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे. या देशातील लोकशाही असेल, संसदीय लोकशाही पद्धती असेल, जी काही विचारधारा आणि कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला, त्याची अंमलबजावणी करण्याबद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असू त्यापेक्षा कितीतरी पटीने हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी होते, असे पवार म्हणाले.


विधानसभेच्या कामाला लागा - 


गेले २५ वर्षे आपण विचारधारा वाढवायचा प्रयत्न केला. आता मजबुतीने आपण हा पक्ष आणखी पुढे नेऊया. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल, त्यात तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे, आता एकच लक्ष्य आणि ते लक्ष्य म्हणजे तीन-चार महिन्यांनी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे, ही भूमिका आपण घेणार आहोत. या गोष्टी करत असताना त्या सत्तेचा उपयोग अधिक लोकांना कसा होईल, शेवटच्या घटकाला कसा होईल, हे सूत्र घेऊन आपण काम करायचं आहे, असे पवार म्हणाले.