मुंबई : भाजपवर 'मुलं पळविणारी टोळी' असा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर आता मुलंच नाही तर नातवंडही पळवू, असा इशाराच गिरीश महाजनांनी दिला होता. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. पळून जाणारे तुम्हालाच लखलाभ असं आव्हाडांनी म्हटलं आहे.


नातू, पणतू, खापर पणतू, सुना सगळेच पळवा. त्यामुळे किमान इथली जागा तरी खाली होईल. पळून जाणारे सगळे तुम्हालाच लखलाभ असो. तसंही पळत आहेत ती श्रीमंताची पोरं आहेत, ही पोरं पळाली तरच गरिबांच्या पोरांना, आमच्यासारख्यांना संधी मिळेल, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.


सामनाच्या अग्रलेखातून भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये असा सल्ला मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला दिला. त्यावर बोलताना पाळण्याची दोरीच तुमच्या हाती आहे, तुम्हीच ठरवा काय करायचं, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.


संबंधित बातमी : तोंडी परीक्षा | मुलंच नाही तर नातवंडंही पळवू : गिरीश महाजन



राधाकृष्ण विखे-पाटलांवर जितेंद्र आव्हाडांनी वक्तव केलं. राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब विखेंसोबत झालेला जुना वाद हा वैचारिकच होता. मात्र, सध्याचे वाद वैयक्तिक पातळीवर येतात. त्यावेळी राजीव गांधींनी बाळासाहेब विखेंना पाडा, असा आदेश दिला होता. ती जबाबदारी केवळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून शरद पवारांनी पाळली.


तसेच राधाकृष्ण विखे पाटलांनी आघाडीधर्माबाबत केलेल्या वक्तव्याचाही आव्हाडांनी समाचार घेतला. ज्यांच्या चिरंजीवांनी आघाडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आघाडीबाबत बोलू नये, असं आव्हाड म्हणाले.


संबंधित बातमी : ....म्हणून नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील