मुंबई : राज्यातील 29 महापालिका (Election) निवडणुकांसाठीयेत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षातील बडे नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करून लक्ष वेधत आहेत. त्यातच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात जवळपास 70 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी टीका केली होती. यासंदर्भात विरोधी पक्षातील काही नेते न्यायालयात (Highcourt) देखील गेले आहेत. त्यातच, आता नवी मुंबईतील (Navi mumabi) प्रभाग क्रमांक 17 (अ) च्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे, आता येथील प्रभागात 15 जानेवारीला मतदान होणार का नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 (अ) मधून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेले भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कारण, निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यासंदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, याप्रकरणीन्यायालयाने येथील निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली असून येत्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज फेटाळला होता, आयोगाच्या या आदेशावर अंतरिम स्थगिती देत मुंबई हायकोर्टाने निवडणुकीलाही अंतरिम स्थगिती दिली आहे. भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याने महाराष्ट्रम्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम 10(1 ड) अंतर्गत भोजनेंचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानेप्रथमदर्शनीबेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने अधिकारांचा वापर केल्याचं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाचे भाजप उमेदवार निलेश भोजने यांना दिलासा दिला. त्यानुसार, पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, नवी मुंबईत भाजपच्या उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने प्रभाग 17 अ मधील भाजपची उमेदवारी संकटात सापडली होती. मात्र, पक्षाने वेळ न दवडता रणनीती बदलत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दर्शन भोईर यांच्या पक्षप्रवेशामुळेभाजपने या प्रभागात आपला पॅनल उभा केला असून, थेट शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांविरोधात थेट लढत आहे. दर्शन भोईर यांनी भाजपातील पक्षप्रवेशानंतरभाजपच्याविचारधारेनुसार काम करून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे प्रभाग 17 अ मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, आता भोजने यांना न्यायालायने दिलासा दिल्याने आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
नवी मुंबई महापालिकेत 117 अर्ज ठरले अवैध
नवी मुंबई महानगरपालिका निडणुकीसाठी सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून 839 अर्ज वैध तर 117 अर्ज अवैध ठरले. एकूण 956 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. नेरूळ विभागात सर्वाधिक 28 अर्ज अवैध ठरले असून घणसोली विभागात तब्बल 39 अर्ज बाद झाले आहेत. याच्या तुलनेत वाशी विभागात अत्यंत काटेकोर तयारीमुळे आणि अचूक कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे अवघा एकच अर्ज बाद झाल्याचे स्पष्ट होते. आता माघार प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
