Navi Mumbai Election: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 (अ) मधून भाजपचे उमेदवार निलेश भोजने (Nilesh Bhojne) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) मोठा दिलासा दिला आहे. भोजनेंचा उमेदवारी अर्ज फेटाळणारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा आदेश न्यायालयाने अवैध ठरवत त्यांच्या नावाचा उमेदवार यादीत समावेश करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार निलेश भोजने यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भाजप उमेदवार निलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करत महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम 10 (1)(ड) अंतर्गत त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला होता. शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. या निर्णयाविरोधात निलेश भोजने यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Navi Mumbai Election: उमेदवार यादीत नावाचा समावेश करण्याच्या सूचना
या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अधिकारांचा प्रथमदर्शनी मनमानी आणि बेकायदेशीर वापर केल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निर्णय कायदेशीर निकषांवर टिकत नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. यासोबतच, भोजने यांचे नाव उमेदवार यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Navi Mumbai Election: प्रभाग 17 अ राजकीय समीकरणे बदलणार?
नवी मुंबईत भाजपच्या उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने प्रभाग 17 अ मधील भाजपची उमेदवारी संकटात सापडली होती. मात्र, पक्षाने वेळ न दवडता रणनीती बदलत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. दर्शन भोईर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने या प्रभागात आपला पॅनल उभा केला असून, थेट शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांविरोधात थेट लढत होणार होती. मात्र, आता न्यायालयाने भोजने यांना दिलासा दिल्याने या प्रभागातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकीवर कोर्टाने गुरुवारी दिलेली अंतरिम स्थगिती उठवत निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. आता प्रभाग 17 अ मध्ये निवडणुकीच्या वेळापत्रकाप्रमाणे 15 तारखेलाच निवडणूक होणार आहे. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 956 अर्जांपैकी 839 अर्ज वैध तर 117 अर्ज अवैध ठरले आहेत. नेरूळ विभागात सर्वाधिक 28 तर घणसोली विभागात 39 अर्ज बाद झाले आहेत. वाशी विभागात मात्र केवळ एकच अर्ज बाद झाला आहे.
आणखी वाचा