KDMC Election 2026 Shivsena MNS Alliance: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत रस्सीखेच सुरु असताना बुधवारी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसल्या. आज शिंदे सेनेचे 53 नगरसेवक याठिकाणी आपल्या गटाची नोंदणी करण्यासाठी आले होते. त्याचवेळी मनसेचे राजू पाटील हेदेखील आपले 5 नगरसेवक घेऊन याठिकाणी पोहोचले. त्यानंतर राजू पाटील, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यात एक छोटेखानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसेने केडीएमसीत सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मनसेच्या नेत्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर सडकून टीका केली होती. मात्र, आता सत्तास्थापनेसाठी मनसे (MNS) शिंदे सेनेच्या मांडीला मांडी लावून बसल्याने सामान्य मतदारांना धक्का बसला आहे. मात्र, या निर्णयाचे मनसेचे नेते राजू पाटील (Raju Patil) यांच्याकडून समर्थन करण्यात आले. (KDMC Election 2026)

Continues below advertisement

अंबरनाथ नगरपालिकेत कुरघोडीचे राजकारण होताना दिसले होते. ते आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होऊन द्यायचे नव्हते. एक बाजू स्थिर असली पाहिजे. अन्यथा वारंवार नगरसेवकांची पळवापळवी झाली असती. आमच्या पाठिंब्यामुळे या सगळ्याला पुढील पाच वर्षांसाठी 100 टक्के आळा बसला. कल्याण डोंबिवलीत आमचे पाच नगरसेवक वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्जात आहे. त्यामुळे आमच्या नगरसेवकांना प्रभागात विकास करण्यासाठी निधी मिळाला नसता. नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार सत्तेला चिकटलो तर नगरविकास खात्याकडून काहीतरी निधी मिळेल. हा सर्वांगीण विचार करुन ज्या लोकांनी मनसेला मोठ्या अपेक्षने मतदान केले आहे, त्यांची काम होण्यासाठी आम्ही शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे राजू पाटील यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच राज ठाकरे यांनी आम्हाला तिकीट वाटपापासून पुढील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. ठाकरे गटाचे जे दोन नगरसेवक मनसेत आले आहेत, त्यापैकी विनोद केणे हे मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष आहेत. तर राहुल कोटा हे मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. जागावाटपात गोंधळ नको म्हणून या दोघांनी वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. ते आमच्यासोबत आहेत, आम्ही त्यांना अपात्र ठरु देणार नाही, असे राजू पाटील यांनी सांगितले.

Continues below advertisement

आणखी वाचा

मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?