कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला अवघ्या दोन जागा वाट्याला आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी असतानाच आता शिरोळ तालुक्यामध्येही मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. शिरोळमधील ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास दादा पाटील हे स्वगृही परतणार आहेत. त्यामुळे ठाकरेंना शिरोळ तालुक्यामध्ये मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. उल्हास पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) वाटेवरती असून ते उद्याच (29 ऑक्टोबर) कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे. 


संघटनेत प्रवेश केल्यास स्वाभिमानीतून उमेदवारी


दरम्यान उल्हास पाटील यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश निश्चित झाल्यास ते शिरोळमधून स्वाभिमानीकडून रिंगणात असतील. उल्हास पाटील मूळचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. 2014 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि निवडणूक जिंकली होती. 2019 च्या निवडणुकीमध्येही उल्हास पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवल्याने यावेळी त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 


शिरोळमध्ये तिरंगी लढत होणार 


दुसरीकडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही त्यांच्याच पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उल्हास पाटील कोणती भूमिका घेणार? याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून रंगली होती. मात्र, उल्हास पाटील आता थेट घर वापसीच्या तयारीत असल्याने स्वत:च्याच बालेकिल्ल्यात अडचणीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगलंच बळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून अनेक शिलेदार सोडून गेल्याने राजू शेट्टी यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं होतं. त्यामुळे चळवळीमधील खंदा समर्थकाची घरवापसी झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. राजू शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्तीमधून शिरोळ आणि मिरज विधानसभा मतदारसंघ घेतला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या