Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election Result 2024) आता राज्यात विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Elections) सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आपापल्या परीनं आगामी विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सर्व राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. भाजप (BJP) काँग्रेसनंतर (Congress) सोमवारी राज्यात शिवसेना (शिंदे गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं (Nationalist Congress Party) आपल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी विधानसभेसाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. 


सोमवारी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना निवडणुकीची तयारी करण्याचा सल्ला दिला. तसेच, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेनं आपापल्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची बैठक बोलावून विधानसभेच्या तयारीला लागण्यास सांगितलं. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोवर आता पक्षांकडून विधानसभेच्या जागांसाठी दावे-प्रतिदावेही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


छगन भुजबळांकडून विधानसभेसाठी 80 जागांचा दावा 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट 80 जागांची मागणी केली नसली, तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला तेवढ्याच जागा मिळाल्या पाहिजेत, असा सूर शिंदेंच्या आमदारांचा असल्याचं समोर आलं आहे. पवार यांच्या पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत 80 जागांची मागणी केली आहे. त्यांनी जळगाव, धुळे आणि इतर जिल्ह्यांतील जागांवर दावा केला आहे. 


सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच आमच्या पक्षाला जागा मिळाल्या पाहिजेत, असं बोलून दाखवलं आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घ्यावं लागेल, असंही ते म्हणाले आहेत. 


नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? 


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं की, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 80 जागा मिळाव्यात, असं मी आधीच सांगितले होतं. यानंतर अनेक जण माझ्या विरोधात बोलले. मला असं काही बोलू नकोस असंही सांगण्यात आलं होतं, तरीही जागावाटपाचा मुद्दा शेवटपर्यंत चालू ठेवल्यानं आम्हाला फायदा होणार नाही, असं माझं मत आहे. जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घ्यावा. आमचे 40-45 आमदार आहेत, जवळपास तेवढेच आमदार शिंदे गटाचे आहेत, त्यामुळे शिंदे यांना जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी छगन भुजबळांनी केल्याचं पाहायला मिळतंय. 


शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची खलबतं 


सोमवारी शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचे खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली होती. आगामी विधानसभेबाबत या बैठकीत खलबतं झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे 9 खासदार निवडून आले आहेत. आपण केवळ यावरच समाधान मानू नये. लोकसभा निवडणुकीतील विजयानं अतिउत्साही होण्याची गरज नाही, कारण लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि विभागप्रमुखांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत. 


वर्षावर शिंदेंच्या शिवसेनेची बैठक 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांची वर्षा निवास येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभव तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत पक्षानं कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षनेते, खासदार, आमदारांना दिल्या आहेत. विधानसभेत चांगली कामगिरी करायची असेल तर आजपासून निवडणुका घ्याव्या लागतील. केंद्र आणि राज्य सरकारची कामं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत बोलताना त्यांनी पक्षनेते आणि आमदारांना वक्तव्य करण्यापासून दूर राहून महायुतीच्या मित्रपक्षांसोबत काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.