नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 मतदार संघांमध्ये आज मतदान पार पडले. या टप्प्यात देशभरात 63.3 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान झाले असून उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 54.29 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.


सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान झाले.

या टप्प्यात 10 कोटी 16 लाख हून अधिक मतदारांना त्यांचा मताधिकार बजावण्याची संधी होती. त्यापैकी 6 कोटी 43 लाख 12 हजार मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. एकूण 979 उमेदवारांचे भविष्य मतदारांनी ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले आहे.

देशभरात बिहारमध्ये 59.29 टक्के, हरयाणा 66.27 टक्के, मध्य प्रदेश 63.63 टक्के, उत्तर प्रदेश 54.29 टक्के, पश्चिम बंगाल 80.16 टक्के, झारखंड 64.50 टक्के आणि दिल्लीत 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली.

मध्य प्रदेशमधली भोपाळ, नवी दिल्ली आणि आझमगडच्या जागांवर दिग्गजांची अग्निपरीक्षा आहे. भोपाळमध्ये भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात काँग्रेसचे दिग्विजय मैदानात आहेत. साध्वी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भोपाळची निवडणूक ही चर्चेत राहिली. तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी देखील साध्वी प्रज्ञासिंहला टक्कर देण्यासाठी प्रचारादरम्यान सॉफ्ट हिंदुत्वाचा वापर केला.