Manipur Election 2022 : पंजाबपाठोपाठ आणखी एका राज्याच्या निवडणूक वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.  निवडणूक आयोगाने गुरुवारी मणिपूर विधानसभेसाठी मतदानाच्या तारखा बदलल्या असल्याची माहिती दिली आहे. मणिपूरमध्ये दोन टप्पात मतदान होत आहे. स्थानिक कारणामुळे मतदानाची तारीख बदलल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. याआधी निवडणूक आयोगाने पंजाबमधील मतदानाची तारीख बदलली होती. आता मणिपूर विधानसभा मतदानाचा तारीख बदलण्यात आली आहे. 


मणिपूर विधानसभेसाठी मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या आहेत. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 फेब्रुवारी ऐवजी आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 मार्च ऐवजी 5 मार्चला होणार आहे. स्थानिक कारणामुळे मतदानाची तारीख बदलत असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितले.   






निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्रा मंगळवारी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला.


 मणिपुरमध्ये यंदा कोणाची सत्ता? काँग्रेस की भाजप? जनतेचा कौल कुणाकडे?
मणिपुरमध्ये भाजप, काँग्रेस आणि विविध स्थानिक पक्षांनी आगामी निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज देखील दाखल केला. त्याआधी शनिवारी काँग्रेसने राज्यातील पाच पक्षांसोबत आघाडी करण्याची घोषणा केली. त्यामुळे सहा पक्ष एकत्र मिळून राज्यात आता निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे मणिपुरमध्ये नेमकी कोण सत्ता स्थापन करणार? हा मोठा प्रश्न आहे.  मणिपुरमध्ये कोण सरकार स्थापन करणार? या प्रश्नाला घेऊन सी वोटरच्या मदतीने केलेल्या सर्व्हेमधून जनतेचा कौल जाणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व्हेच्या अंतिम निर्णयाचा विचार करता मणिपुरमध्ये भाजपाला सर्वाधिक 34 टक्के पसंती मिळाली आहे. तर, काँग्रेसला 28 टक्के आणि एनपीएफला 10 टक्के मतं मिळाली आहेत. तर इतरांच्या झोळीत 28 टक्के मतं मिळाली आहेत. मणिपुरमध्ये कोणता पक्ष किती मतांनी जिंकेल? याबाबत नागरिकांना प्रश्न विचारला असता भाजपलाच सर्वाधिक लोकांची पसंती मिळाली आहे. भाजप यंदा 21 ते 25 जागांवर विजय मिळवू शकतो. तर काँग्रेस 17 ते 21 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर एनपीएफच्या खात्यात 6 ते 10 जागा जाताना दिसू शकतं. तर इतरांना 8 ते 12 जागा मिळण्याचं अनुमानही व्यक्त केलं जात आहे.