Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शक करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला आहे. महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही. आनंदाच्या क्षणीच कडवट सांगितलेलं बरं असतं. महापालिकेत कुठल्याही पद्धतीने उन्माद, पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
महानगरपालिकेत जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठे कोणी नाही
पक्ष जो ज्यांना जबाबदारी देईल त्यांनी पारदर्शक कारभार करायचा आहे, महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही, महापालिका आपला व्यवसाय नाही, सामाजिक आर्थिक परिवर्तन म्हणून आपण हातात घेतलेला आहे. तशाच प्रकारचा व्यवहार महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित असे मुख्यमंत्री म्हणाले. आनंदाच्या क्षणीच कडवट सांगितलेलं बरं असतं महापालिकेत कुठल्याही पद्धतीने उन्माद, पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही, कोणी कितीही मोठा असला तरी महानगरपालिकेत जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठे कोणी नाही. जर लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या कार्यकर्त्यांनी चुरशीच्या लढती एकतर्फी केल्या
अतिशय आनंद आहे की भाजपने पुण्यात इतिहास रचलेला आहे. माझ्या डाव्या उजव्या बाजूला बसलेले नेते आणि तुम्ही या सगळ्या विजयाचे शिल्पकार आहेत. पुण्याच्या इतिहासात इतका प्रचंड बहुमत गेले 30 ते 35 वर्षात मिळाल्याचं मी तरी कुठल्या पक्षाला पाहिलेलं नाही. पुणेकरांनी मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर मोहर उमटवलेली आहे. पुण्यात फार चुरशीची लढत आहे असं मीडियामध्ये दाखवलं जात होतं. आपल्या कार्यकर्त्यांनी चुरशीच्या लढतीला एकतर्फी केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. निकाल सुरु असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ यांना फोन करून सगळ्यांना शुभेच्छा द्या असे सांगितले होते असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण आकडे काढणारी लोकं नाहीत पण तुम्ही जो आकडा आणला आहे तो फारच अप्रतिम आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुणेकरांच्या पात्रतेला आपण पात्र ठरलो तर पुढचे 25 वर्ष आपल्याला कोणी हलवणार नाही
एवढा बहुमत मिळतो तेव्हा आनंद होतोच. दुसरीकडे जबाबदारही वाढतात, प्रचंड मोठ्या अपेक्षेने पुणेकरांनी आपल्याला बहुमत दिलं आहे. जर त्यांच्या पात्रतेला आपण पात्र ठरलं तर पुढचे 25 वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही. जर पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर हा विजय लाटेसारखा निघून जाईल. कुठल्याच विजयानंतर मोदीजी शांत बसत नाहीत, लगेच पुढच्या पाच वर्षाचे विकासाचं व्हिजन तयार करतात आपल्यालाही पुण्याच्या विकासाचे नियोजन करायचे आहे. महापौर स्टँडिंग समिती अध्यक्ष सभागृहनेते समित्या सगळ्या नेमल्या जातील. मात्र माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की यामध्ये कुणाला यावर्षी संधी मिळेल कोणाला पुढच्या वर्षी संधी मिळेल मात्र पुणेकरांनी दिलेलं बहुमत महत्त्वाचं आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. पुणे महापालिकेतील पद घेण्या देण्यावरुन जर चर्चा झाली तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुणेकरांना जे आश्वासन दिले आहे ते येत्या दोन वर्षातच आपल्याला काम सुरू झालेला दिसेल. राज्याचे सरकार आणि केंद्राचे सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. देशातील एक नंबरची महापालिका झाली पाहिजे असं आपण सगळे काम करु असे मुख्यमंत्री म्हणाले.