रायपूर : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेते म्हणून एनडीएच्या (NDA) घटकपक्षाच्या नेत्यांनी निवड केली. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. एनडीएच्या घटकपक्षांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे एनडीएत मोठ्या घडामोडी सुरु असताना काँग्रेस (Congress) नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करा, अशी भाजप पक्षनेतृत्त्वाला विनंती केली होती. या वक्तव्याचा संदर्भ देत भूपेश बघेल यांनी कार्यकर्त्यांनो तयार राहा 6 महिन्यात ते वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं म्हटलं आहे. 


फडणवीस राजीनामा देत होते, योगींची खूर्ची डळमळीत झालीय, राजस्थानच्या भजनलाल शर्मांची खूर्ची डगमगतेय. सर्व मुख्यमंत्र्यांच्या खूर्च्या डगमगू लागल्या आहेत. सरकार बनलं नाही नितीश कुमारांचे प्रवक्ते अग्निवीर योजना बंद करा म्हणतात. जातनिहाय जनगणनेची मागणी करतात, राहुल गांधी यांनी पण जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे असं म्हटल्याचं भूपेश बघेल यांनी सांगितलं. 




जदयूच्या प्रवक्त्यांनी यूसीसीची गरज नाही, असं म्हटलं आहे. आता यांचं सरकार येणार आहे. यांचं घर बसलं नाही तोच भांडण सुरु झालं आहे, असं भूपेश बघेल म्हणाले. कार्यकर्त्यांनो तयार राहा, सहा महिने ते एका वर्षात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं भूपेश बघेल यांनी म्हटलं.


भूपेश बघेल यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, एका दिवसात तीन तीन वेळा कपडे बदलणारे एकाच ड्रेसवर कार्यक्रम करत  आहेत. पार्टी तोडणारे, निर्वाचित मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणारे, घाबरवणाऱ्यांना धमक्या देणाऱ्यांना जनतेनं चांगला धडा शिकवल्याचं भूपेश बघेल म्हणाले.  


दरम्यान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदारांची संख्या 2019 च्या तुलनेत 23 वरुन 2024 ला 9 वर पोहोचली. भाजपच्या उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या जबाबदारीतून मोकळं करण्याची विनंती पक्षनेतृत्त्वाला करत असल्याचं म्हटलं होतं. अमित शाह यांनी मात्र केंद्रातील शपथविधी सोहळा होईपर्यंत कार्यरत राहण्याच्या आणि नंतर निर्णय घेऊ अशा फडणवीस यांना सूचना दिल्या आहेत.   


काँग्रेसचं देशातील कामगिरी सुधारली असून महाराष्ट्रात काँग्रेसला 13 जागा मिळाल्या. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून पराभव स्वीकारावा लागला.  


संबंधित बातम्या : 


मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक


मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'