Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय?
या निवडणुकीतून घराणेशाही विरुद्ध कार्यकर्ते राजकारण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, स्थानिक पातळीवर सत्ताधारी गटांचा प्रभाव किती खोलवर आहे, हे निकालांनी स्पष्ट केलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या निकालातून राजकीय घराणी आणि सत्ताकेंद्रांचा प्रभाव ठळकपणे समोर येत आहे. या निकालांमुळे केवळ प्रभागनिहाय विजय-पराजय नाही, तर शहराच्या राजकारणातील सत्तासमीकरणे बदलतायत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपने सत्ता स्थापन इकडे पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. प्रभाग 23मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही मुलं विजयी झाली आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंच्या पुतण्यासह, आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. दरम्यान, दुसरीकडे अंबादास दानवेंच्या भावाचा राजेंद्र दानवे यांचा पराभव झालाय.
शिरसाटांची दोन्ही मुलं जिंकली
पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यांची मुलगी हर्षदा शिरसाठ प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झाली असून, मुलगा सिद्धांत शिरसाट प्रभाग क्रमांक 29 मधून विजयी झाला आहे. एकाच वेळी दोन्ही अपत्यांचा विजय झाल्याने शिरसाट यांची महापालिकेतील ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
हर्षदा शिरसाट यांची लढत भाजपच्या मयुरी बर्थने यांच्याशी होती. तर सिद्धांत शिरसाट यांची लढत भाजपचे भगवान गायकवाड तसेच ठाकरे गटाचे किशोर साबळे व एमआयएमच्या मोनिका मोरे यांच्यासोबत होती. या निकालांमुळे शिंदे गटासाठी संभाजीनगरमध्ये सत्तेचा पाया अधिक मजबूत झाल्याचं बोललं जात आहे. आगामी महापालिकेतील सत्ता स्थापन, महत्त्वाच्या समित्यांवर वर्चस्व आणि निर्णयप्रक्रियेत शिरसाट यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमदार प्रदीप जयस्वालंचा लेकही आघाडीवर
प्रभाग क्रमांक 15 मधून आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश जैस्वाल आघाडीवर असून, जैस्वाल गटाची पकड या भागात अजून मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे. ऋषिकेश जयस्वाल यांची लढत भाजपचे मिथुन व्यास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे लक्ष्मीनारायण पाखरिया यांच्याशी झाली.
अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव
छत्रपती संभाजी नगरच्या प्रभाग 16 ड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांची लढत शिवसेनेचे मनोज बल्लाळ यांच्याशी झाली. या लढतीत अंबादास दानवे यांच्या भावाचा म्हणजेच राजेंद्र दानवे यांचा पराभव झालाय.
दरम्यान प्रभाग सत्रामध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र प्रभाग 25 मध्ये भाजपचे माजी महापौर भगवान घडामोडी यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुलमंडीतील शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली कोरडे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे या भागातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. दरम्यान शहरात एमआयएमचा शिरकाव लक्षणीय ठरला असून पक्षाचे दोन उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
एकूणच, या निवडणुकीतून घराणेशाही विरुद्ध कार्यकर्ते राजकारण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, स्थानिक पातळीवर सत्ताधारी गटांचा प्रभाव किती खोलवर आहे, हे निकालांनी स्पष्ट केलं आहे. महापालिकेतील पुढील राजकीय घडामोडींसाठी हे निकाल अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.




















