Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. तर राज्यसभेवेळी झालेल्या चुका सुधारत महाविकास आघाडी देखील सतर्क आहे. या मतदान प्रक्रियेत सर्वाधिक भाव आला आहे तो अपक्ष आमदारांना. अपक्ष आमदारांचं वाढतं वजन पाहता आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 


बच्चू कडू यांनी म्हटलं की, येणारा काळ हा अपक्ष आमदारांचा असणार आहे. हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा, असं ते म्हणाले. अपक्षांचा झटका काय असतो आणि परिणाम कसे असतील ते विधान परिषद निवडणुकीत दिसणार आहे, असंही बच्चू कडू म्हणालेत.


बच्चू कडू म्हणाले, "येणारा काळ हा छोट्या पक्षाच्या आमदारांचा आणि अपक्ष आमदारांचा असणार आहे. कारण निवडणुकीत दिवसेंदिवस त्यांचं वजन वाढत आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. महाविकास आघाडीच्या बाजूला राहून दुसऱ्या पक्षाला फटका बसेल. पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे अपक्ष ठरवणार. येत्या काळात 'प्रहार' संघटनेचा मुख्यमंत्री असेल, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 


काही वेळातच चित्र होणार स्पष्ट


विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरु राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून मतादानाला सुरुवात झाली आहे. 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करुन दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार का याची उत्सुकता दिसून येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Mla Raju Patil : मनसेचं एक मत नेमकं कोणाला? कोणी गृहीत धरु नये, आमदार राजू पाटलांचं वक्तव्य
 
Vidhan Parishad Election Live : राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 28 मतांचा कोटा, सूत्रांची माहिती
 
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच, काय आहे दोन्ही पक्षांची रणनीती?