Anna Hazare : अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचा हल्लाबोल
Anna hazare on Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असतानाच अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Anna hazare on Arvind Kejriwal : दिल्लीत आज बुधवारी (दि. 05) विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Vidhan Sabha Election 2025) मतदान पार पडत आहे. भाजप (BJP), आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेस (Congress) असा तिरंगी सामना या निवडणुकीत आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा असून 699 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत 13 हजार 766 मतदान केंद्र बनवण्यात आली असून 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. आता दिल्लीत मतदान पार पडत असतानाच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता, मात्र ज्या दिवशी पक्ष आणि पार्टीच्या नादात केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्या पासून मी दूर झालो, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी केला आहे. लोकांनी आता शुद्ध आचार विचार आणि जीवनात त्याग करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले अण्णा हजारे?
अण्णा हजारे म्हणाले की, सुरुवातीला अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होता, तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते. मात्र पक्ष आणि पार्टी जेव्हा काढली तेव्हापासून मी त्याची साथ सोडली. मला समजलं की हा स्वार्थी आहे. सुरुवातीला मला तो चांगला वाटला होता, त्याचे आचार विचार चांगले होते. त्याच्या डोक्यात पक्ष आणि पार्टी नव्हती. मात्र, आता हेच दारूबाबत बोलत आहेत. दारूसाठी आम्ही आंदोलन केले होते त्यावेळी ते देखील आमच्यासोबत होते. आता तेच दारूबाबत बोलत आहेत त्यामुळे मी त्याला सोडून दिले. काही लोक सांगतात की, अण्णा हजारे यांच्यामुळे हे आलेत. मात्र, ही गोष्ट चुकीची आहे. सुरुवातीला तो चांगला माणूस होता, नंतर मला जेव्हा समजलं तेव्हा मी त्याच्यापासून दूर झालो, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी केलाय.
अण्णा हजारेंचे मतदारांना आवाहन
दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यावरून अण्णा हजारे यांनी मतदारांना आवाहन केले आहे. जो उमेदवार आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे? त्याचे आचार-विचार कसे आहेत? त्याचे जीवन कसे आहे? हे पाहूनच मतदान करा, असे आवाहन त्यांनी दिल्लीतील मतदारांना केले आहे.
आणखी वाचा




















