नाशिक : "शरद पवार ज्या दिवशी ईडी कार्यालयात जाणार होते, त्याच दिवशी अजित पवार यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती. दोन दिवसांनी राजीनामा दिला असता तरी चाललं असतं. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोकस बदलला," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक, अजित पवार, शरद पवार, ईडी नोटीस या विषयांवर भाष्य केलं.


ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेवरुन छगन भुजबळ आणि अजित पवार या दोन मोठ्या नेत्यांमध्येच जुंपली आहे. काही नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, असं 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात अजित पवार यांनी सांगितलं होतं. यावेळी त्यांचा रोख तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होता. परंतु विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राष्ट्रवादीच्ये नेत्यांमध्ये वाद सुरु आहे.

दोन दिवस भावना आल्या असत्या : भुजबळांची अजित पवारांवर निशाणा
ईडीची अटक हा निवडणुकीचा मुख्य होता. ज्या दिवशी शरद पवार ईडी कार्यालयात जाणार होते, त्यावेळी अजित पवारांच्या राजीनाम्याची गरज नव्हती. दोन दिवसांनी दिला असता तरी चाललं असतं. बँकेचे सदस्य आणि संचालक नसताना त्यांच्या गुन्हा दाखल झाला. त्यामुळे वातावरण तापलं होतं. दोन दिवस तरी मीडिया व्यापला असता. पण संध्याकाळ होत आली, वातावरण झटकन बदललं आणि फोकस बदलला. राजीनाम्याचं कारण नव्हतं, निदान त्या दिवशी तरी द्यायला नको होता. ते (अजित पवार) भावनाप्रधान आहेत हे मान्य, पण दोन दिवस भावना आवरता आल्या असत्या तर बरं झालं असतं, असं छगन भुजबळ म्हणाले.

अटकेचा विषय तेव्हाच संपला : भुजबळ
बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेविषयी छगन भुजबळ म्हणाले की, दंगलीबाबत मनोहर जोशी यांनी श्रीकृष्ण आयोग नेमला होता. युतीच्या काळात फाईल तयार झाली होती. मी फक्त सही केली. त्यांना अटक करण्यात मला आनंद नव्हता. बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवणार नव्हतो. जर ते शक्य झालं नाही तर त्यांना मातोश्रीवर ठेवणार होतो. परंतु त्यांना त्रास द्यायचा नव्हता. रमाबाईनगरमधील दंगलीत काही जणांच्या मृत्यूवरुन मी सरकार खुनी आहे, असा आरोप केला. त्यावेळी शिवसैनिकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. परंतु कोर्टात कोणाला ओळखत नाही असं सांगत प्रकरण मिटवलं. परंतु 'सामना'मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी छापून आलं. मला क्लिन चीट मिळूनही हे छापून आल्याने  बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. परंतु खटल्याचा निकाल जवळ आला असताना, बाळासाहेब यांची प्रकृतीच्या कारणाने तो मागे घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे तसंच बाळासाहेब ठाकरेंनी फोन करुन कुटुंबासोबत मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण दिले. मी कुटुंबासह मातोश्रीवर गेलो आणि 3-4 तास गप्पा मारल्या, त्याचवेळी हा विषय संपला.