मुंबई : महाशिवआघाडीतील शिवसेनेच्या सत्तावाटपाचा प्रस्ताव सूत्रांच्या आधारे 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. त्यात शिवसेनेने मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवतानाच, काँग्रेस-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष पूर्णवेळ उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे असं झाल्यास राज्याला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काल (14 नोव्हेंबर) फॉर्म्युल्याच्या मसुद्यावर चर्चा झाली. याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


तीन पक्षांच्या नेत्यांची समन्वय बैठक गुरुवारी (14 नोव्हेंबर) पार पडली. या बैठीकत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. किमान समान कार्यक्रमासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नवाब मलिक तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.

प्रस्तावात, कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रीपद?
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रस्तावात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल. याशिवाय गृहमंत्रालय, विधानसभा उपाध्यपद राष्ट्रवादीला, महसूल, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर अर्थ, नगरविकास तसंच विधानपरिषद अध्यक्षपद शिवसेनेला मिळेल. या प्रस्तावावर तीनही पक्षांची सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं कळतं. प्रस्तावावर आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी चर्चा करतील. त्यांचा जो काही निर्णय होईल, त्यााबाबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली जाईल.

17 नोव्हेंबरला सत्तास्थापनेची घोषणा
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज्यात महाशिवआघाडीकडून सत्तास्थापनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 17 नोव्हेंबर रोजी महाशिवआघाडी सत्तास्थापनेची घोषणा करु शकते. त्यानंतर 19 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सत्तावाटपाबद्दल अंतिम चर्चा होईल. त्यानंतर या दोघांची उद्धव ठाकरेंशी चर्चा होऊन पुढच्या आठवड्यात महाशिवआघाडीचं सरकार राज्याला मिळू शकतं.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उद्या दुपारी तीन वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत तिन्ही पक्षाचे नेते शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.