Maharashtra HSC Results 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Results News) आज जाहीर करण्यात आला. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाकडून पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. तर, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना काहीही आक्षेप असेल तर ते गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात, असं बोर्डाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 22 मे 2024 ते 5 जून 2024 गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 15 दिवसांची मुदत बोर्डाकडून देण्यात आली आहे. ऑनलाईन पैसे भरुन विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. 


निकालाबाबत आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागेल? हे जाणून घेऊया


निकाल हाती आल्यानंतरही अनेकांना आपल्या निकालाविषयी आक्षेप असू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (http://verification.mh- hsc.ac.in) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 


यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 22 मे ते 5 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.


गुण पडताळणीसाठी बुधवार, 22 मे ते बुधवार, 5 जूनपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रती विषय 50 रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं मंडळाकडे जमा करावं लागेल.


फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी 


1. ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन 
2. हस्तपोहोच 
3. रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यावाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पध्द‌तीने छायाप्रती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, यासाठी विद्याथ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे बुधवार, 22 मे ते बुधवार, 5 जूनपर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं मंडळाकडे जमा करावं लागेल.


उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर काय कराल? 


1. फेब्रुवारी मार्च 2014 च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात प्रति विषय 300 रुपयांप्रमाणे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरत संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील


2. विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश पात्रता (उदा. जेईई नीट इत्यादी) परीक्षेसाठी प्रक्रिया होणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्याध्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने आणि प्राधान्याने करून देण्याबाबत सर्व विभागीय मंडळाना सूचना देण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांनी सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी.


3. ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सामान्य ज्ञान (G.K.) या विषयांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून देण्यात येणार आहे. त्यासाठी देखील उपरोक्त पद्धतीनं ऑनलाईन अर्ज करणे आणि ऑनलाईन शुल्क भरणे आवश्यक राहील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


HSC Result 2024: राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के; यंदाही मुलींची बाजी, तर कोकण विभाग सर्वात अव्वल!


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI