वसई :  दिल्ली, चेन्नई, ठाणे, वसई-विरार येथे 100 हून अधिक सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत इराणी चोराला बेड्या ठोकल्या आहेत. वसईच्या क्राईम युनिटनं मोठ्या शिताफिने ही कारवाई केली आहे. कल्याणच्या आंबिवली येथून इराणी चोराला अटक करणं मोठं जिकरीचं काम असतं. चार वेळा ट्रॅप लावूनही गळाला न लागलेला हा 24 वर्षीय अब्बास अमजद इराणी अखेर पोलिसांच्या हाती लागला. याच्यावर मोक्कासारखे 2 गंभीर गुन्हे, दुखापती, जबरी चोरीसारखे 21 गुन्हे ठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद आहेत. तर 2 गुन्हे वसई-विरार हद्दीत नोंद आहेत. 

Continues below advertisement

या चोरावर मुंबई परिसरातच नव्हे तर देशभरातही अनेक गुन्ह्यांची नोदं आहे. राजधानी दिल्ली येथे 125 हून अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे नोंद असून त्याने आपल्या जबाबात चेन्नईलाही चोरी केल्याची कबूली दिली आहे. वसई विरारमध्ये सात ठिकाणी झालेल्या चोरीमधील सीसीटिव्हीत अब्बास इराणी दिसून आला होता. त्या अनुषंगाने तपास करत सिनेस्टाईल अटक केली. 

सापळा रचत सिनेस्टाईल अटक

वसई विरारमध्ये सात ठिकाणी झालेल्या चोरीमधील सीसीटिव्हीत अब्बास इराणी दिसून आला होता. त्या अनुषंगाने तपसा करताना तो कल्याणच्या आंबिवली येथे असल्याच समजलं. दरम्यान हा संपूर्ण परिसरात इराणी समाजासह सोनसाखळी चोरांचाही अड्डा असल्याचं समोर आलं. या भागात पोलीस एखाद्या चोराला पकडायला अथवा तपासासाठी गेल्यावर वस्तीतील  महिला पुढे येत, पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करतात. त्यामुळे येथून चोराला अटक करुन घेऊन जाणं मोठं जिकरीच असतं. त्यासाठी मोठी प्लॅनिंग करावी लागते. 

Continues below advertisement

वसईच्या क्राईम युनिट 2 ने ही 26, 28, 30 मार्चला आरोपी अब्बास ईराणीला साध्या वेशात पकडण्यासाठी गेले होते. मात्र चोरांच नेटवर्क एवढं तगडं होतं की, आरोपींना पोलीस आल्याची चुणूक लागली, त्यांनी सर्व ग्रुपवर “मामू आया है, फिल्डींग लगी है, कोई बाहर न आये” असा मॅसेज पाठवला होता. त्यामुळे क्राईम युनिटं 2 ने पुन्हा 3 एप्रिलला अब्बास इराणीला पकडण्यासाठी सापळा लावला. पोलिसांमधील कुणी समोसा विकणारा, तर कुणी भाजी विकणारा तर कुणी जनरल स्टोअरवर काम करणारा झाला. पोलीस अब्बास इराणीची वाट पाहू लागले.  त्या वस्तीतील लोकांना समजू न देता अब्बासला पकडायचं होतं.  इराणी कधी जेवण बनवत नसायचा, तो बाहेरचं खायचा. त्यामुळे अब्बास हॉटेलकडे येणार असा कयास बांधून पोलिसांनी तेथे सापळा रचला. अखेर पोलिसांचा प्लॅन यशस्वी झाला. रात्री 8 च्या दरम्यान आरोपी इराणी जेवणासाठी बाहेर येताच पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी एवढ्या वाऱ्याच्या वेगाने अटक केली की, आंबिवली परिसरातील चोराचे हितचिंतकांनी पोलिसांचा पाठलाग उशिरा केला. तोपर्यंत पोलीस वसईच्या दिशेने रवानाही झाले होते.  

दरम्यान, पोलिसांना त्याच्याकडून वसई विरारमधील 7 गुन्हे तर ठाण्यातील 21 गुन्हयांची उकल करण्यात यश आलं आहे. तर 87 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 3,31,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.