बीड: जालना, बीड आणि परभणीत अलीकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता या पट्ट्यातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केली आहे. तुकाराम मुंढे यांना मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्त करावे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे एक सक्षम अधिकारी आहेत, असे दमानिया यांनी म्हटले. त्या मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

Continues below advertisement

यावेळी अंजली दमानिया यांनी एक महत्त्वाची मागणी केली. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची मराठवाड्यात डिव्हिजनल  कमिशनर म्हणून नियुक्ती होणे, गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जालना, बीड आणि परभणीसह मराठवाड्यात गुन्हेगारी प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यामुळे आता बीडमध्ये मुंडे (Dhananjay Munde) विरुद्ध मुंढे व्हावे. जालना, बीड आणि परभणीतील घटना पाहता मराठवाड्याला खमका अधिकारी देण्याची गरज आहे. हा अधिकारी कोणाचंही न ऐकणारा, कोणालाही न जुमानणारा असला पाहिजे. त्यामुळे आता बीडसह मराठवाड्यात मुंडे विरुद्ध मुंढे करण्याची वेळ आली आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. त्यामुळे राज्य सरकारने बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, असेही दमानिया यांनी सांगितले.

धनंजय मुंडेंचं सामान सरकारी बंगल्यातून फेकून द्या: अंजली दमानिया

धनंजय मुंडे हे आता मंत्री राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंबईत दिलेला बंगला त्यांनी खाली केला पाहिजे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर बंगला खाली करायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी तसे केले नसले तर आता या बंगल्यातील धनंजय मुंडे यांचे सामान बाहेर फेकून हा बंगला खाली केला पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

Continues below advertisement

धनंजय मुंडेंच्या हातात रिव्हॉल्व्हर अन् दोघांसह स्कॉर्पिओ पेटवण्याचा प्रयत्न?

धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे सोबत गुन्हेगारी करायचे, याबद्दलचा एक पुरावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीडमधील 2007 मधील प्रकरणातील एफआयआरमध्ये दोघांचीही नाव एकत्र असल्याचं दिसतं आहे. पण, या प्रकरणातून पुढे धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलं असल्याची माहितीही समोर आली. सन 2007 मध्ये किशोर फड याला जिवे मारण्याच्या आणि गाडी जाळल्याच्या प्रकरणात दोघे आरोपी आहेत. 18 एप्रिल 2007 साली किशोर फड यांनी पोलिसांनी ही तक्रार दिली होती.

किशोर फड हे त्यादिवशी भंगार लिलावाच्या कार्यक्रमाला जात असताना धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी त्यांची गाडी अडवली. तू भंगार लिलावाला जाऊ नको, तिकडे मी बोली लावणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी किशोर फड यांना धमकावले. मात्र, किशोर फड यांनी त्यांना जुमानले नाही. तेव्हा धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी स्कॉर्पिओ गाडीवर पेट्रोल ओतले आणि गाडी पेटवून दिली. त्यावेळी गाडीत माझा ड्रायव्हर बालाजी घुले आणि मी होतो. आम्ही दोघांनी घाबरुन गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाल्मिक कराडने गाडीचा दरवाजा दाबून धरला. खाली उतरलात तर गोळ्या घालू, असे त्याने म्हटले. त्यावेळी धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांच्या हातात रिव्हॉल्व्हर होती. ही केस रिओपन झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

आणखी वाचा

वाल्मिक कराडने एकदा नव्हे, आवादा कंपनीकडे 6 वेळा खंडणी मागितली, आकाने पैसे कुणाकडे पोहोचवले?