Santosh Deshmukh Murder Case Updates: बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींनी केला होता, असं धनंजय देशमुख गेल्या काही दिवसांपासून सांगत होते. आता याबाबतचा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय आहे. संतोष देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन आरोपींना आखला होता अशी गोपीनीय साक्षीदाराने साक्ष दिली आहे. ज्या बैठकीत हा प्लॅन आखण्यात आला होता त्या बैठकीला हा गोपनीय साक्षीदार उपस्थित होता. विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि सुदर्शन घुलेने (Sudharshan Ghule) हा प्लॅन आखला होता, असं गोपीनीय साक्षीदाराने म्हटलं आहे.
बैठकीत नेमकं काय घडलेलं?
- बीड नांदूरफाटा येथे एका हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी झाली
- विष्णू चाटेच्या वाढदिवसानिमित्ताने पार्टी आयोजित केली गेली होती
- जेवण करत असताना विष्णू चाटे सुदर्शन घुलेला 6 डिसेंबरच्या वादावरून टोचून बोलत होता.
- तुला वॉचमनला मारायची काय गरज होती, आम्ही कमवायचे व तुम्ही गमवायचे असा चाटे घुलेला म्हणाला.
- आपले जीवन देखील कुत्र्यासारखे झाले आहे. तु तुझी इज्जत घातलीसच पण आमची देखील इज्जत घातलीस असेही चाटे घुलेला बोलला.
-त्यावर सुदर्शन घुले हा विष्णू चाटे यांस म्हणाला की, आम्ही सरपंचाला उद्या उचलून नेतो व त्याच्यावर ३७६ भादंविचा गुन्हा नोंदवतो.
- त्यावर विष्णू चाटे हा सुदर्शन यास म्हणाला की, तुला काय करायचे ते कर, नाहीतर गावाकडे चितर, पाखरं, ससे सांभाळायचे काम कर...पण केजला येऊ नको.
त्या महिलेचा मृत्यू, अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ-
संतोष देशमुखांचे अनैतिक संबंध होते असं भासवण्यासाठी एका महिलेचा वापर झाल्याचा आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला होता. त्या महिलेची हत्या झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. धाराशिवमध्ये कळंबमधल्या द्वारका नगरीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झालाय. संतोष देशमुख प्रकरणी या महिलेची चौकशी झाल्याचं अंजली दमानियांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या मृत्यूची बातमी कळंब पोलिसांआधी बीड पोलिसांना मिळाली आणि यावर बोट ठेवत अंजली दमानियांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केलेत. मृतदेहाचे घटनास्थळीच पोस्टमार्टेम करून तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय.