Subbanna Ayyappan : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) माजी महासंचालक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह श्रीरंगपट्टणजवळील कावेरी नदीत तरंगताना आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नियमितपणे श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीच्या काठावर असलेल्या साई बाबा आश्रमात ध्यानासाठी जात असत. घटनास्थळी त्यांची दुचाकी आढळली असून, त्यांनी नदीत उडी घेतली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.  

डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन 7 मेपासून बेपत्ता होते. नेहमीप्रमाणे ते घराबाहेर गेले होते, मात्र त्यानंतर परतले नाहीत. अय्यप्पन यांची स्कूटर कावेरी नदीच्या काठावर सोडून दिलेली अवस्थेत आढळून आली. अय्यप्पन यांच्या कुटुंबीयांनी म्हैसूरमधील विद्यारण्यपूरम पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. शनिवारी (दि. 10) श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला आहे.  डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. 

दरम्यान, डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा जन्म 10 डिसेंबर 1955 रोजी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील यलंदूर येथे झाला. त्यांनी 1975 मध्ये मंगळुरु येथून फिशरीज सायन्समध्ये पदवी (B.F.Sc.), 1977 मध्ये पदव्युत्तर पदवी (M.F.Sc.), आणि 1998 मध्ये बेंगळुरु कृषी विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. डॉ. अय्यप्पन हे कृषी आणि मत्स्य (जलसंपत्ती) शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिल्ली, मुंबई, भोपाळ, बाराकपूर, भुवनेश्वर आणि बेंगळुरू यांसारख्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कार्य केले. ते ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) चे प्रमुख बनणारे पहिले 'नॉन-क्रॉप' (पीक-आधारित नसलेले) शास्त्रज्ञ ठरले. त्यांनी भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर (CIFA) आणि मुंबईच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) या संस्थांमध्ये संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. याशिवाय, ते केंद्रीय कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव, हैदराबाद येथील नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच नॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (NABL) चे अध्यक्ष होते.

भारताच्या ‘नीळी क्रांती’ (Blue Revolution) मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी कृषी संशोधन व विकासात योगदान देत असताना अनेक समित्यांचे नेतृत्व केले आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. 2022 मध्ये त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय होते. ते इंफाळ येथील सेंट्रल अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणूनही कार्यरत होते. विविध संस्थांच्या उभारणी आणि घडणुकीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.

आणखी वाचा 

Beed : वाल्मिक कराड गँगच्या सात गुंडांवर MCOCA; परळीतील शेतकऱ्याला मारहाण, खंडणी अन् गुन्ह्याची मालिकाच नावावर