Nashik Crime News : राज्यात महापालिका निवडणुकांचा धुरळा अजून खाली बसलेला नसतानाच नाशिकमधून (Nashik) एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल 400 कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा मोठा कट उघडकीस आला असून, या प्रकरणात राजकीय आणि बिल्डर लॉबीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आलाय. या गंभीर प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे, नाशिकमधील एका तरुणाच्या अपहरणाच्या तपासातून हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये संदीप पाटील (Sandeep Patil) या तरुणाचं अपहरण झालं होतं. या प्रकरणाच्या तपासादरम्यान कर्नाटकमधील चोरला घाटात 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या कंटेनर लुटीचा मोठा खुलासा झाला. गोव्याहून कर्नाटकमार्गे एका ट्रस्टकडे जाणाऱ्या दोन कंटेनरमध्ये तब्बल 400 कोटी रुपये होते. हे पैसे 2000 रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई) यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News: संदीप पाटीलचा धक्कादायक खुलासा

या प्रकरणात पीडित संदीप पाटील याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत थरारक माहिती उघड केली आहे. व्हिडीओमध्ये संदीप पाटीलने म्हटले आहे की, “16 ऑक्टोबर 2025 रोजी कर्नाटकमधील चोरला घाटात दोन कंटेनरमध्ये 400 कोटी रुपये होते. हे पैसे गोव्याहून कर्नाटकमार्गे एका ट्रस्टकडे जात होते. रात्रीच्या अंधारात हे कंटेनर लुटण्यात आले. या कंटेनरमधील 2000 रुपयांच्या जुन्या नोटांचा मूळ मालक ठाण्यातील एक बिल्डर आहे. 20 ऑक्टोबर रोजी जयेश कदम याचा मला व्हॉट्सअॅपवर फोन आला. तुझ्या नावाने तक्रार आहे, चौकशी करायची आहे, असं सांगून २२ ऑक्टोबरला मला घोटीला बोलावण्यात आलं. तिथे मला जबरदस्तीने फॉर्च्युनर गाडीत बसवून नाशिकला आणलं. गाडीत विशाल नायडू आणि सुनील धुमाळ होते. त्यांनी मला मारहाण करत ‘तूच कंटेनर लुटलास’ असा आरोप केला,” असे त्याने म्हटले आहे. 

Nashik Crime News: पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणाबाबत अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निखेलकर यांनी माहिती देताना सांगितले, “संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटीचा खोटा आरोप करत काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या, मारहाण केली आणि अपहरण केलं. या प्रकरणात आम्ही 5 आरोपींना अटक केली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे. तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.”

Nashik Crime News: SIT स्थापनेचा निर्णय

या प्रकरणाचं स्वरूप अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि उच्च आर्थिक मूल्याचं असल्याने तसेच यात राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता, निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उघड झालेल्या या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा 

Nagpur Crime News: फिरायला जाण्याच्या बहाण्याने OYO मध्ये नेलं, बॉयफ्रेंडने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या गर्लफ्रेंडला संपवलं; नागपूरमधील घटनेचं गूढ उकललं!