Lucknow Crime Incident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर परिसरात घडलेल्या ट्रिपल मर्डर आणि सुसाईड केस प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बँक कर्मचारी मानस वाजपेयी (Manas Bajpai Case0 याने कौटुंबिक वादातून आधी आपली पत्नी दिव्या मिश्रा (Divya Mishra) हिची बँकेच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर घरी जाऊन स्वतःच्या मानसिक आजारी बहिणीची हत्या केली आणि शेवटी घरामध्ये 'हनुमान चालीसा' (Hanuman Chalisa) लावून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
बँकेच्या बाहेर पत्नीवर झाडल्या गोळ्या
मिळालेल्या माहितीनुसार, मानस आणि दिव्या यांचा विवाह 12 वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, गेल्या एका वर्षापासून ते दोघे वेगळे राहत होते आणि फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा खटला सुरू होता. गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मानसने गोमतीनगर येथील खासगी बँकेच्या बाहेर कार्यरत असलेल्या दिव्याला भेटण्यासाठी बोलावले.
काही मिनिटे दोघांमध्ये बोलणे झाले आणि अचानक मानसने तिच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी दिव्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घरी जाऊन बहिणीची हत्या अन् व्हॉट्सॲप स्टेटस
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी मानस घाईघाईने हुसडिया येथील आपल्या घरी पोहोचला. तिथे त्याने आपली 28 वर्षीय बहीण विभा वाजपेयी हिची गोळ्या झाडून हत्या केली. विभा ही मानसिक आजाराने ग्रस्त होती. आत्महत्या करण्यापूर्वी मानसने स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटस (WhatsApp Status) वर एक मेसेज पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने पत्नी आणि बहिणीची हत्या केल्याचे कबूल केले होते.
हनुमान चालीसा लावली आणि स्वतःचे जीवन संपवले
प्रत्यक्षदर्शी शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानस दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घरी आला तेव्हा तो खूप घाबरलेला आणि घामाने भिजलेला होता. घरात गेल्यानंतर त्याने मोठ्या आवाजात 'हनुमान चालीसा' लावली. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस पाहून घरात प्रवेश केला असता मानस मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 बंदुका आणि शस्त्रे जप्त केली आहेत.
पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला बँकेबाहेर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस त्या तपासात असतानाच दुसरी बातमी आली. तपासात दोन्ही घटनांमागे एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. सध्या पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, या हत्याकांडामागचे मूळ कारण आणि परिस्थितीचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
ही बातमी वाचा:
