Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्याच्या जामनेर (Jamner) शहरात 21 वर्षीय तरुण सुलेमान खान याची अत्यंत अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मॉब लिंचिंग प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध हत्येचा आणि मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
कॅफेमधून जबरदस्तीने नेऊन केली मारहाण
सुलेमान खान हा पोलीस भरतीच्या ऑनलाईन फॉर्मबाबत माहिती घेण्यासाठी जामनेरला आला होता. त्यावेळी तो एका कॅफेमध्ये एका 17 वर्षीय मुलीसोबत बसला होता. पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या त्या कॅफेमध्ये काही स्थानिक तरुण आले आणि दोघांना तिथून जबरदस्तीने घेऊन गेले. त्यानंतर सुलेमानला जंगलात नेऊन दीर्घकाळ अमानुष मारहाण करण्यात आली.
घरासमोर टाकला मृतदेह, कुटुंबीयांनाही मारहाण
सुलेमानला सहा ते सात तास अमानुषपणे मारहाण केल्यानंतर, त्याचा मृतदेह गावात नेऊन त्याच्या घरासमोर टाकण्यात आला. त्यावेळी त्याची आई, बहीण आणि वडील घराबाहेर आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप सुलेमानचे मामा साबीर खान यांनी केला आहे.
रास्ता रोको, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी सुलेमानचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि दीड तास जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलन केले. आरोपींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि कडक पोलीस बंदोबस्तात शववाहिका बेटावद गावात नेण्यात आली. तिथेच सुलेमानचा अंत्यविधी पार पडला.
पोलिसांची कारवाई, आठ जण अटकेत
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, "या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी चार जणांना घटनेच्या दिवशीच, तर इतर तीन जणांना नंतर अटक करण्यात आली. एक आरोपी जळगावमधून पकडण्यात आला." तसेच, विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून सखोल चौकशी करण्याच्या मागणीवरही पोलीस विभाग विचार करत आहे.
जामनेरमधील सात कॅफे सील
दरम्यान, जामनेर शहरातील काही कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने धडक कार्यवाही करून वाकी रोड, नवकार प्लाझा तसेच बीओटी कॉम्प्लेक्स मधील सात कॅफेवर धाडी टाकून कॅफे मधील साहित्य जप्त करण्यात आले. प्रशासनाने सर्व कॅफेना सील ठोकले असून यापुढे कोणत्याही कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करू,असा इशारा पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिला आहे.
शहरातील एका कॅफेमध्ये बेटावद बुद्रुक येथील सुलेमान रहमान खान हा तरुण हा एका तरुणीसह बसलेला काही तरुणांना दिसला होता, त्याच ठिकाणी या तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून शहरातील सर्व कॅफे पोलिसांच्या रडारवर होते. आज पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी संयुक्त पाहणी केली. संशयास्पदरीत्या आढळून आलेल्या सात कॅफे बंद करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आणखी वाचा