मुंबई : कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलीय. या प्रकरणी शाहुनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  रोनीथ भालेराव असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर रुपेश सावदे ( वय 32 ), मनीष राठोड ( 27 )  आणि सागर साळवे ( 28 ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना रविवारी पहाटे आश्रय बारजवळ घडली आहे. किरकोळ कारणावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  


रोनीथ भालेराव हा त्याच्या दोन मित्रांसोबत दारू पीत होता.  रात्री उशिरा हे सर्व जण आणखी काही दारू घेण्याचे ठरवून आश्रय बारजवळ आले. परंतु, तेथे आल्यानंतर रोनीथ रूपशकडे रागाने पाहतो यातून दोघांमध्ये वाद झाला. काही वेळात वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. रुपेशने रोनीथला मारहाण करायला सुरवात केली. यामध्ये राठोड आणि साळवे हे देखील सहभागी झाले.  या मारहाणीत रोनीथ याचा मृत्यू झाला.  


रोनीथच्या हत्येप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


जुन्या वादातून घेतला जीव 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भालेराव आणि मनीष राठोड हे एकाच परिसरात रहात असून दोघांमध्ये पूर्वीपासूनच वाद होता. यादरम्यान रविवारी दुपारी  रोनीत रागाने बघत असल्याचे कारण देत तिघांनी त्याला जबर मारहाण  केली. या मारहाणीत रोनीतचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी तीनही आरोपींवर 302, 324, 323, 504, 506, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातूनच रोनीतचा जीव घेतला.  


रोनीतचा जागीच मृत्यू 
बेदम मारहाण झाल्याने रोनीत गर्भगळीत झाला आणि तो जागेवरच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.   


महत्वाच्या बातम्या


Crime News : मृत महिलेची संपत्ती लुबाडण्याचा डाव; मन्नत बाबासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल