Crime News : नवी दिल्ली : प्रेम म्हणजे, प्रेम असतं... प्रेमासाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते, प्रेमाबाबतच्या या दोन्ही वाक्यांचा प्रत्यय, एका घटनेतून येईल. आपल्या दीरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या महिलेनं दीर आणि त्याच्या मित्राच्या मदतीनं चक्क आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. ज्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याच्या आणाभाका घेतल्या, सातजन्म तोच मिळावा म्हणून देवाकडे साकडं घातलं, त्याच नवऱ्याला संपवण्यासाठी क्रूर पत्नीनं दीरासोबत कट रचला आणि पतीला कायमचं यमसदनी धाडलं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  


उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात एक अत्यं धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचं आपल्या दिरावर प्रेम जडलं. दोघांमधील जवळीत वाढली, त्यानंतर ही बाब महिलेच्या पतीच्या लक्षात आली. त्यानं दोघांच्या नात्याला विरोध केला. कालांतरानं त्यानं महिलेला मारहाण करण्यासही सुरुवात केली. त्यानंतर दीराच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेनं पतीची हत्या केली. 


मित्रांसोबत घरात घुसून गोळी घातली


पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नहटौर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 जुलै रोजी मृत राणूचे वडील शीशराम यांनी तक्रार दाखल केली. ज्यामध्ये त्यांनी मुलगा राणू त्यांच्या खोलीत झोपला होता. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून त्याच्यावर गोळी झाडल्याचं सांगितलं. दरम्यान, गोळी झाडल्यानंतर राणूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर उपचारादरम्यान राणूचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात जे समोर आलं ते सर्वांच्या पायाखालची जमिन हादरवणारं होतं. 


हत्येपूर्वी राणूच्या वडीलांना पाजलेली दारू 


हत्येबाबत माहिती देताना आरोपी विक्कीनं पोलीस चौकशीत सांगितलं की, माझे काका शीशराम यांचा मुलगा राणू याच्या पत्नीशी माझी मैत्री झाली होती आणि आम्ही एकमेकांशी बोलायचो. राणूच्या पत्नीनं मला सांगितलं की, राणू तिला मारहाण करतो आणि त्यानं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. राणूला मार्गातून दूर केलं तर आमचं काम सोपं होईल आणि बदनामीपासूनही वाचू. त्यामुळे आम्ही कट रचून रानूला संपवण्याचा निर्णय घेतला. 


अशा परिस्थितीत राणूला आमच्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी मी माझा मित्र सागर याला सर्व काही सांगितलं आणि एक कट रचला. जेव्हा राणूची पत्नी तिच्या आई-वडिलांकडे माहेरी गेली, तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून हत्येचा प्लान आमलात आणण्याचं ठरवलं. त्याचवेळी राणूची पत्नी तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली, मी सागरसह राणूच्या वडिलांना दारू पाजली. राणूचे वडील दारू पिऊन झोपी गेले. त्यानंतर मी सागरकडे भरलेलं पिस्तूल दिलं आणि त्यानं राणूवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.


दिरासोबत संसार थाटण्याच्या मोहात महिलेनं चक्क ज्याच्यासोबत साताजन्माच्या आणाभाका घेतल्या, त्याला संपवण्याचा कट रचला. सध्या आरोपी महिला, तिचा दिर आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.