RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवला, गृहकर्जावर काय परिणाम होणार? ईमएमआय कमी होणार की वाढणार? जाणून घ्या
Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आज पतधोरण जाहीर करण्यात आलं. आरबीआयनं यावेळी रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. गृहकर्ज सुरु असणारे आणि ज्यांचं गृहकर्ज सुरु आहे, त्या सर्वांचं लक्ष आरबीआयच्या रेपो रेटच्या निर्णयाकडे लागलंहोतं. आता आरबीआयनं रेपो रेट कायम ठेवल्यानं गृहकर्जदारांमध्ये स्थिरतेची भावना निर्माण होऊ शकते. यामुळं गृह कर्जाचे व्याज दर देखील स्थिर राहू शकते. यामुळं गृहकर्ज ज्यांना घ्यायचंय ते त्यांचं आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करु शकतात.
RBI Repo Rate : रेपो रेट कायम, गृहकर्जावर काय परिणाम होणार?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यांच्या पतधोरण विषयक समितीनं रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय एकमतानं घेतला. आरबीआयनं निश्चित केलेल्या मर्यादेत महागाई असल्यानं आणि जागतिक आव्हानं असूनही आर्थिक वाढ स्थिर असल्यानं रेपो रेट स्थिर ठेवल्याचं आरबीआयनं म्हटलं.
गृहनिर्माण उद्योग आणि हाऊसिंग मार्केटसाठी स्थिर व्याज दर ही चांगली बाब आहे. जेव्हा कर्जासाठीच्या खर्चाचा अंदाज लावता येतो तेव्हा अधिक लोक गृहकर्ज घेण्यासंदर्भात विश्वासानं निर्णय घेतात.
आरबीआय रेपो रेट दर स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळं अल्पकालीन दिलासा मिळतोय. पुढील काळात रेपो रेट कसा राहणार की नाही हे महागाईची स्थिती, जागतिक आर्थिक परिस्थिती यावर आधारित असेल. महागाई नियंत्रणात राहिली तर आरबीआयला रेपो रेट कमी करण्यासारखी स्थिती दिसून येईल. रेपो रेट कमी केल्यास कर्जाचा खर्च कमी होईल.
सध्या रेपो रेट स्थिर राहिल्यानं गृहकर्जाचा ईएमआय स्थिर राहिल. गृहकर्ज घेण्याचा जे विचार करत आहेत त्यांच्यासाठी कर्ज घेण्यासाठी चांगली वेळ आहे.
रेपो रेटमध्ये वर्षभरात 125 बेसिस पॉईंटची कपात
गेल्या वर्षी फेब्रुवारी 2025 पूर्वी रेपो रेटचा दर 6.50 टक्के होता. मागील एका वर्षात एकूण 125 बेसिस पॉइंट्स दरकपात केली आहे. आरबीआयनं रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला आहे. सोबतच, आरबीआय पुढील सवलतींचा विचार करण्यापूर्वी वेट ॲंड वॉचची भूमिका स्वीकारण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीतील एमपीसी बैठक केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारत- अमेरिका, भारत-युरोपियन यूनियन यांच्यातील महत्त्वपूर्ण व्यापार करारानंतर पार पडली. या दोन्ही घडामोडींचा आर्थिक वाढीवर आणि महागाईच्या समीकरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आरबीआयनं रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला आहे.डिसेंबर महिन्यात आरबीआयकडून रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सनं कपात करत तो 5.25 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.

























