Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुंबई : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या लाभाचं वितरण उद्यापासून सुरु करण्यात येईल.  येत्या दोन ते तीन दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधीची रक्कम जमा होईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांनी दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

Continues below advertisement

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती : आदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असं  आदिती तटकरे यांनी म्हटलं. 

आदिती तटकरे पुढं म्हणाल्या, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदित तटकरे यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

लाडकी बहीणची ई-केवयसी कोणत्या वेबसाईटवर करायची?

महिला व बालविकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक वेबसाईट तयार केली आहे. त्या वेबसाईटवर लाभार्थी महिलेने ई केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे. महिलांनी या वेबसाईटशिवाय दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर माहिती शेअर करु नये. लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना  लाभार्थी महिलेची आधार पडताळणी आणि त्याशिवाय पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करणं आवश्यक आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेसाठी पात्रतेचे निकष ठरवण्यात आले होते. त्यानुसार ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. त्या कुटुंबातील पात्र महिलेला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून ज्या महिला ई- केवायसी प्रक्रिया करणार नाहीत त्यांचा लाभ मिळणं बंद होऊ शकतं.