Continues below advertisement


नवी दिल्ली : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेनं किमान मासिक शिल्लक रकमेसंदर्भातील निर्णय फिरवला आहे. बँकेला आपला मूळ निर्णय बदलण्याची वेळ यानिमित्तानं आल्याचं पाहायला मिळालं. आयसीआयसीआय बँकेनं 1 ऑगस्टपासून उघडल्या जाणाऱ्या बचत खात्यांसाठी किमान मासिक सरासरी शिल्लक रक्कम 50 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहकांच्या तीव्र आक्षेप आणि असंतोषानंतर हा निर्णय बदलत आता 50 हजार रुपयांवरुन रक्कम 15 हजार रुपये करण्यात आली आङे.


मेट्रो शहरांमधील आयसीआयसीआय बँकेच्या 1 ऑगस्ट नंतरच्या खातेदारांना आता खात्यात 50 हजार रुपयाऐवजी 15 हजार रुपये ठेवावी लागतील. निम शहरी भागातील खातेदारांना 25 हजार ऐवजी 7500 रुपये, ग्रामीण भागातील खातेदारांना 10 हजार रुपयांऐजी 2500 रुपये खात्यात किमान मासिक सरासरी शिल्लक रक्कम म्हणून ठेवावे लागतील. बँकेनं जरी निर्णय बदलला असला तरी ग्रामीण भागातील खातेदार वगळता मेट्रो आणि निम शहरी भागातील खातेदारांना किमान मासिक सरासरी शिल्लक रक्कम म्हणून 1 ऑगस्टपूर्वीच्या नियमाच्या तुलनेत अधिक रक्कम ठेवावी लागेल.


बँकेनं काही तासांमध्ये निर्णय फिरवला


आयसीआयसीआय बँकेनं काही तासांमध्येच किमान मासिक सरासरी शुल्कासंदर्भातील निर्णय फिरवत मागे घेतला आहे. ग्राहकांकडून आलेल्या तीव्र आक्षेप आणि असंतोषाच्या प्रतिक्रियांनंतर निर्णय 50 हजारांचा निर्णय मागं घेण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून मेट्रो आणि शहरी शाखांसाठी किमान मासिक सरासरी शिल्लक रक्कम वाढवून 50 हजार रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र, आता पुन्हा एकदा मेट्रो आणि शहरी शाखांसाठी तो 15 हजार रुपये करण्यात आला आहे. निम-शहरीसाठी रुपये 7 हजार 500 (पूर्वी 25 हजार रुपये), ग्रामीणसाठी 2500 रुपये (पूर्वी 10 हजार रुपये)


दरम्यान, सॅलरी अकाऊंट, पेन्शनर्स, बेसिक बचत खाते, प्रधानमंत्री जनधन योजना खाते आणि विशिष्ट गरज असलेल्या खातेदारांना हा नियम लागू नव्हता. मात्र, तरीही सामान्य बँकेच्या ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.


बँकेनं निर्णय बदलताना काय म्हटलं?


आयसीआयसीआय बँकेनं मासिक सरासरी शिल्लक रकमेसंदर्भातील नवे नियम लागू केले होते. मात्र, आमच्या ग्राहकांच्या बहुमुल्य फीडबॅकनंतर आम्ही किमान मासिक सरासरी शिल्लक रकमेसंदर्भातील नियमांमध्ये बदल करत आहोत. ग्राहकांनी त्यांचा विश्वास बँकेवर ठेवला आणि फीडबॅक दिल्यानं आम्हाला त्यांची चांगली सेवा करता येईल.


एचडीएफसी बँक काय करणार?


आयसीआयसीआय बँकेला किमान सरासरी शिल्लक रकमेत वाढ केल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला होता. तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी बँकांनी किमान शिल्लक रक्कम किती ठेवावी यात नियामक म्हणून आमची काहू भूमिका नसल्याचं म्हटलं होतं. आयसीआयसीआय बँके पाठोपाठ एचडीएफसी बँकेनं बचत खात्यासंदर्भातील नियम बदलला होता. किमान सरासरी शिल्लक रक्कम 10 हजारांहून 25 हजार करण्याचा निर्णय घेतला होता. आता एचडीएफसी बँक नियम बदलणार का हे पाहावं लागेल.