Share Market : रखडलेला भारत- अमेरिका व्यापार करार, टॅरिफच्या संकटामुळं विदेशी गुंतवणूकदार सतर्क, 21 हजार कोटी काढून घेतले, जाणून घ्या कारण
FPI Share Market : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात जोरदार शेअर विक्री केली आहे. जुलै महिन्याचा ट्रेंड त्यांनी ऑगस्ट महिन्यात देखील कायम ठेवला आहे.

Foreign Investors Outflow नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार लांबणीवर पडला आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचं शिष्टमंडळ भारतात येणार होतं, मात्र त्यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केलं आहे. याची अंमलबजावणी 27 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 21 हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे.
डिपॉजिटरीच्या ताज्या आकडेवारीनुसार 2025 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1.16 लाख कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदार संस्था सतर्कता बाळगत आहेत.
विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढणं सुरुच
एंजल वनचे सीएफए वकार जावेद खान यांनी म्हटलं की अमेरिका आणि रशियातील तणाव सध्या कमी झाला आहे, नव्यानं बंधनं घालण्यात आलेली नाहीत.अमेरिकेनं भारतावर लादलेलं अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. हा बाजारासाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. ते असं देखील म्हणाले की एस अँड पीनं भारताचं रेटिंग BBB- वरुन BBB केलं आहे. ज्यामुळं विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या विक्रीच्या धोरणात बदल होऊ शकतो.
डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 14 ऑगस्टपर्यंत 20975 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर, जुलै महिन्यात त्यांनी 17741 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करत पैसे काढून घेतले होते. मात्र, विदेशी गुंतवणूकदारांनी मार्च ते जून या तीन महिन्यांमध्ये 38673 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
तज्ज्ञांचा अंदाज काय?
मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाच्या सहयोगी संचालक हिमांशू श्रीवास्तव यांच्या मते विदेशी गुंतवणूकदार वारंवार पैसे काढून घेत आहेत याचं कारण जागतिक अनिश्चितता आहे. युद्ध, अमेरिका आणि तर विकसित देशांमध्ये टॅरिफच्या दरांवरुन सुरु असलेले मतभेद, अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यानं भारतासारख्या विकसित होणाऱ्या बाजारांमधील विदेशी गुंतवणूकदारांचं आकर्षण घटलं आहे.
जियोजीत इन्वेस्टमेंटसचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार वी.के. विजयकुमार यांच्या मते कंपन्यांचे कमजोर निकाल, उच्च मूल्यांकन हे विदेशी गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या विक्रीचं मोठं कारण आहे. एफपीआयनं बाँडमध्ये 4469 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















