PM Kisan Samman Nidhi : आज देशातील शेतकऱ्यंना (Farmers) एक दिलासादायक बातमी मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6000 रुपये जमा होणार आहेत. कारण, पंतप्रधान किसान सन्मान निधीसह राज्या सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. 


आज पीएम किसान उत्सव दिवस 


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून 6000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून 4000 रुपये असे एकुण 6000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने  28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज PM किसानचा 16 वा हप्ता जारी करतील. या अंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.


15 नोव्हेंबर 2023 ला 15 हप्ता झाला होता जमा


यापूर्वी, 15 नोव्हेंबर 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. 


PM किसान योजनेचा 11 कोटी शेतकऱ्यांना लाभ


शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi). गेल्या पाच वर्षापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारनं 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2.81 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. आता पुन्हा 28 फेब्रुवारीला केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हजार कोटी रुपये जमा करणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


5 वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 2.81 लाख कोटी रुपये, 11 कोटी शेतकऱ्यांना लाभ; 'या' योजनेतून आर्थिक पाठबळ