BLOG : मंगळवार दुपारच्या बुलेटिनला अँकरिंग करत असताना पहलगामची ही बातमी येऊन धडकली. आधी वाटलं चकमकीप्रमाणे काहीतरी असेल. पण त्या नंतर त्याची भीषणता लक्षात येत गेली आणि संध्याकाळी तब्बल 26 पर्यटकांना अतिरेक्यांनी लक्ष्य केल्याची माहिती येताच कित्येक किकाळ्या मेंदूत ठणकू लागल्या. हा तोच काश्मीरचा प्रदेश ज्याला स्वर्ग… नंदनवन म्हणायचं. त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाखाली निष्पाप माणसांची कत्तल केली. तळपायाची आग मस्तकात जाणारं असंच हे कृत्य. पुन्हा एकदा दहशतवादाचा भेसूर चेहरा जगाला दिसला नव्हे दाखवलाही गेला.
अर्थातच यामागे असणाऱ्या पाकिस्तानच्या अजेंड्याचा घातकी डाव लक्षात आलाच. पण सुरक्षेच्या दृष्टीनेही ह्यामध्ये अनेक लूपहोल असल्याचं भाष्य अनेक वर्ष लष्करात काम करणाऱ्या तज्ञांनी मांडलं. या घटनेदरम्यान आणि त्या नंतर जेजे काही घडलं ते आपण साऱ्यांनीच पाहिलं आणि संवेदनशील मनाने अनुभवलंही… अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हिंदू आहोत म्हणून अतिरेक्यांनी बंदुकीच्या गोळीने निष्पपांना ठार केलं. पण या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये केवळ हिंदू नव्हते तर मुस्लिम, ख्रिश्चन, आणि परदेशी नागरिकही होते हे रिपोर्ट सांगतो.
गेल्या दोन दिवसात सोशल मीडियाच्या भिंतीवर अनेकांनी आपल्याला हव्या त्या सोयीप्रमाणे धर्मांधतेच्या नावाने बोंबा मारल्या. देशात आणि मृत्यू झालेल्यांच्या घरात काय तणावाची स्थिती आहे ह्याचं भान न ठेवता सोशल मीडियावर कमेंट्स पोस्ट आणि ट्रोलिंग करून अनेकांनी स्वतः ची हौस भागवून घेतलीच. ज्यामध्ये खोट्या असंख्य बातम्या, व्हिडिओ आणि अजेंडे दोन्हीकडून राबवले गेले. मात्र या सगळ्याच्या पुढे जाऊन हे ज्यांनी घडवलं त्यांच्या उद्देश सफल करायला आपणच हातभार लावतो आहोत याची कल्पना लोकांना का नसावी?
धर्माच्या मुद्द्यांवरून रक्तपात घडवायचा… कट्टरतेला बळ पुरवायचं… माणसं मारायची… हिंदू - मुस्लिम तेढ आणि नंतर देशांतर्गत दंगल घडवायची… जमेल तितका भारतातला समाज कायम दहशतीत आणि विस्कळीत कसा ठेवता येईल याचा बंदोबस्त करायचा हा पाकड्यांचा अजेंडा.
आजही आपल्या देशातील सहिष्णुता, इथली बंधुता, समानता ही आपल्या सर्वोच्च राज्यघटनेतली सूत्र आणि मानवतेवर अजूनही विश्वास ठेवलेला समाज हे पाकिस्तानला कधीच बघवणार नाही. किंबहुना आपल्या देशात बिळात लपून बसलेल्या पाकिस्तानी विचारांच्या लोकांचीही मानसिकता अशीच सडकी आहे. आणि यातूनच अशा घटना घडतात ज्यामुळे पाकिस्तानात बसलेले ‘आका’ आपली दाढी कुरवाळत हसतात… या घटनांच्या नंतर सुरू झालेलं सोशल मीडियावरचं धर्मयुद्ध त्या आकांच्या मनसुब्यांना अधिक बळ पुरवतं… आणि आकांना सुखावणारं खाद्य आपणच नकळत पुरवतो…!
काश्मीर कायम धगधगत राहावं आणि दहशतीच्या काळ्यकुट्ट ढगांची सावली काश्मीरवर असावी हाच तर त्यांचा अजेंडा. देशातले भारतीय मुस्लिम बांधव आणि हिंदू यांनी एकमेकांना कायम शत्रू म्हणून पाहावं हाच उद्देश असणाऱ्या पाकड्यांच्या घातसूत्राला आपणच आपल्या कृतीतून छुपा पाठिंबा देतोय का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आम्ही काश्मीर मध्ये 26 मारले मात्र देशातल्या 140 कोटी माणसांमध्ये फूट पाडली हा त्यांचा मनसुबा हाणून पाडायचा असेल तर केवळ धार्मिक तेढीवर बोलून काहीच हाशील होणार नाही.
पंतप्रधान मोदींनीही आज ठणकावून सांगितलेलं आहे, "पहलगामच्या गुन्हेगारांना दफन करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आपण त्यांना पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत हाकलून लावू. भारताचा आत्मा दहशतवादामुळे कधीही भंगणार नाही. दहशतवादाला शिक्षा होणारच."
गेल्या दोन दिवसात सरकारने पाकिस्तान संदर्भात कठोर निर्णयांचं धोरण बजावलेलं आहेच… पण त्यासोबतच एक सणसणीत संदेश आणि दणकाही देण्याची गरज आहे… त्यासाठी आपल्यालाही सक्षमतेने पुढे जावं लागेल. आपल्यालाही कोणती चूक करून चालणार नाही.
बैसरन व्हॅलीमध्ये दोन हजारांवर पर्यटक जमले होते. या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एकही पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणांचा कर्मचारी उपस्थित नव्हता, अशी माहिती समोर आली. ज्यांच्या कुटुंबीयांना प्राणांना मुकावं लागलं त्यांनीही हे कथन केलं. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर माजी मेजर जनरल जीडी बक्षी यांनी सैन्य कपातीवर घणाघाती हल्ला चढवला. भारतीय लष्करात सैन्य भरती रोखून लष्कराचा आकार 1 लाख 80 हजारांनी कमी केला. कोणाची ही डोकेबाज आयडिया होती? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षा आणि अशा संवेदनशील नव्हे अति संवेदनशील ठिकाणी अपेक्षित असणारी सुरक्षा देण्यासाठी काही कसूर झाली आहे का याचाही तितक्याच गंभीरतेने शोध घ्यायची गरज आहे.
पहलगामच्या नंदनवनात रक्ताचा चिखल घडवला गेला… तिथल्या मोकळ्या शुद्ध हवेत दहशतीचा विषारी वायू मिसळला… जिथून भावी आयुष्याची सुरुवात होणार होती तिथेच मृत्यूने गाठलं… अनेक निरपराध माणसांची कुटुंब उजाड झाली… आधार हरपला… कायमचा मानसिक हादरा बसला… अजून काय काय आणि किती किती काळीज पिळवटून टाकणारं दुःख या एका घटनेने दिलं.
एकीकडे हे दुःख… तर दुसरीकडे मानवतेचे झरे काळजात वाहत ठेवून धावून आलेले तिथले स्थानिक बांधव… लाल चौकात घुमत असणारा आवाज… जखमी पर्यटकाला पाठीवरून घेऊन जाणारा तरुण… पर्यटकांना गोळी मारू नका असं सांगत असताना एके 47 बंदूक खेचताना जीव गमावलेला सय्यद आदिल हुसैन शाह… रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला स्थानिक मुस्लिम बांधवाचा मदतीचा व्हिडिओ… या सगळ्यांनी माणुसकी जिवंत असल्याची उदाहरणे दिली…!
मनसेने काश्मीरची सहल आयोजित करत पाकड्यांच्या अजेंड्याला सुरुंग लावण्याचं एक स्वागतार्ह पाऊल उचललं आहे… काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. आम्ही तिथे जाण्यास घाबरत नाही. पर्यटकांना भारतात कुठेही जाण्याची भिती वाटू नये असा संदेश आम्हाला या प्रकरणी द्यायचा आहे, काश्मीर पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे. तेच बंद पाडण्याचा डाव अतिरेकी व पाकिस्तानचा आहे. हे त्यांनी म्हटलं आहे…
कोणताही अजेंडा मग तो कुणाचाही असो. माणसं मारण्याचा अजेंडा कधीच समर्थनीय नसतोच… तो अजेंडा ज्यांचा आहे, ते कोणत्याही धर्माचे असोत की जातीचे किंवा विचारांचे..! त्याचवेळी या सगळ्यांचं आपापल्या सोयीने भांडवल करणारेही देशासाठी तितकेच घातक असतात. विखार पसरवणाऱ्या लोकांनी खरं तर या क्षणी गप्प बसायची गरज आहे… पण उलट तेच जास्त बोलतात आणि दहशतवाद्यांना द्वेषाचं इंधन पुरवतात. त्यामुळे आता काळजी घेतली पाहिजे.
बोलताना, लिहिताना, कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना चारदा विचार करायला हवा. आपल्या बेसावधपणामुळे इतरांचे विखारी अजेंडे रेटून नेण्यात आपण मदत तर करत नाही ना, याचं भान असलंच पाहिजे. सतर्क राहा… काळजी घ्या... आणि आपली सुरक्षा आपल्याच हाती. जगाचा इतिहास सांगतो- विखार संपतोच, विचारच जिंकतो. त्यामुळे आता आपल्यालाच ठरवायला हवं आता कुणाच्या बाजूने राहायचं, विझणाऱ्या विखाराच्या की जिंकणाऱ्या विचाराच्या…!