BLOG : 2024 मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असा प्रयत्न सर्वप्रथम तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि के. चंद्रशेखर राव यांनी सुरु केला. यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात येऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. देशभरातील भाजपविरोधी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी केसीआर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही प्रयत्न सुरु केले होते. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तर केसीआर राव यांचे नाव पंतप्रधानपदासाठीही सुचवले होते. पण निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि केसीआर यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र आता त्यांनी 2024 साठी तयारी सुरु केली आहे.


केसीआर यांच्या महत्वाकांक्षा फार मोठ्या असून त्यांना राष्ट्रीय स्तरावरील नेता म्हणून पुढे यायचे आहे. विरोधी पक्षाची मोट बांधून पंतप्रधानपदाचे स्वप्न ते पाहात आहेत.


दुसरीकडे पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपला चारी मुंड्या चीत केल्यानंतर ममता बॅनर्जींचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनीही विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी महाराष्ट्रात येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट त्या घेणार होत्या. खरंतर, दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेण्याचेही ठरवले होते. पण सोनिया गांधींनी त्यांना वेळच दिला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात आल्यानंतर जेव्हा त्यांना यूपीएबाबत विचारले तेव्हा त्यांनी यूपीए आहेच कुठे? असा प्रश्न विचारत काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. ममता दीदींनाही भाजपला आपणच हरवू शकतो आणि मोदी-शाहांना दणका देऊ शकतो असे वाटते. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावरही त्यांनाच महत्व दिले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.


ममतांच्या यूपीए आहेच कुठे या प्रश्नानंतर सावरून घेत शरद पवार यांनी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी नाही असे म्हटले होते. मात्र, याच संजय राऊत यांनी 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांना देशाचे पंतप्रधान करणार असल्याचे म्हटले आहे. यावरून देशात शिवसेना हा विरोधी पक्षांच्या आघाडीतील मुख्य पक्ष व्हावा असा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.


असे सगळे सुरु असतानाच मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच यूपीएचे अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या बैठकीला स्वतः शरद पवारही उपस्थित होते. देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवे. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवे असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा हे की, काँग्रेस देशाचे नेतृत्व करू शकत नाही. या ठरावानंतर शरद पवार यांनी याबाबत काहीही वक्तव्य केले नाही. यावरूनच त्यांचा या ठरावाला पाठिंबा आहे हे स्पष्टपणे दिसून येते.


राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस असली तरी त्यांचे अस्तित्व मात्र उपकार करण्यात आलेल्या व्यक्तीप्रमाणेच आहे. सरकारमध्ये प्रथम राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेना आणि त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागतो. स्वतः काँग्रेसचे आमदारही हे खाजगीत बोलताना मान्य करतात. केवळ सत्तेत राहाण्याची संधी मिळाल्याने काही नेते सर्व काही सहन करीत असल्याचे मतही आमदार व्यक्त करतात. शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाच्या ठरावाबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष असल्याची टीका करीत राहुल गांधींमध्येच पंतप्रधान होण्याची क्षमता असून 2024 मध्ये ते पंतप्रधान होतील असे म्हटले आहे.


आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून लावत सत्ता काबीज केली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले एक राज्यही त्यांच्या हातातून गेले. याला अर्थातच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद कारणीभूत ठरला. काँग्रेसला वेळ असूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही आणि पंजाब घालवले. आता अरविंद केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेश, गुजरातसह ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत त्या राज्यांकडे लक्ष वळवले आहे. तेथे नेत्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. गुजरातमध्ये आपची हवा निर्माण करण्यासाठी अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भंगवंत सिंह यांच्यासोबत 2 आणि 3 एप्रिलला गुजरातला जाणार आहेत. तेथे त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे. केवळ दहा वर्षात आपने देशभरात स्वतःचे नाव केले आणि दोन राज्यांमध्ये सत्ताही हस्तगत केली आहे. बरेचसे राजकीय पक्ष हे प्रादेशिक अस्मिता, भाषा, संस्कृती, समुदायावर आधारित आहेत. पण आपचे तसे नाही. या पक्षाला कोणतीही अस्मिता, भाषा, जात, धर्माचा अडसर नाही. हा पक्ष अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या एका राष्ट्रीय चळवळीतून निर्माण झाला आहे. या आंदोलनाला देशभरातून लोक आले होते आणि त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवलाय.


2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पुढाकार घेत विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 19 विरोधी पक्षांना डिनरसाठी बोलावले होते. यात शरद पवारांपासून तृणमूल काँग्रेसकडून ममतांचे प्रतिनिधी म्हणून डेरेक ओ ब्रायन, सपाचे रामगोपाल यादव, एआययूडीएफचे बदरुद्दीन अजमल, आरजेडीच्या मीसा भारती, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, झारखंड विकास मोर्चाचे बाबू लाल मरांडी, राष्ट्रीय लोकदलचे अजित सिंह, सीपीआयचे डी राजा, सीपीएमचे सीताराम येचुरी. डीएमकेचे कनिमोझी, बसपाचे सतीश चंद्रा, भारतीय ट्रायबल पक्षाचे शरद यादव, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे जीतन राम मांझी यांचा समावेश होता. मात्र या डिनर डिप्लोमसीचा काहीही उपयोग झाला नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले.


यावेळी मात्र दोन वर्ष अगोदरच विरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्न करतायत. पण भाजपविरोधात विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे प्रयत्न ज्यांनी सुरु केलेत त्यांना विरोधी पक्षाचेही नेतृत्व करण्याची इच्छा आहे. याचाच अर्थ त्यांचा पंतप्रधानपदाकडे डोळा आहे. सगळ्यांनाच जर पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असतील तर या विरोधकांची एकी होईल का असा प्रश्न मनात उद्भवल्याशिवाय राहात नाही.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha