Veteran Theater Director Vijaya Mehta Passed Away: नाटकवाल्यांच्या 'बाई'

तू काय करतोयस इथं... मला ओळखणाऱ्या एका व्यक्तीचा कुतुहलानं प्रश्न...
तुझा काय इथं संबंध... माझी तिथली उपस्थिती अनपेक्षित असलेल्या व्यक्तीकडून चक्क उलटतपासणी...
तुम्ही एबीपी माझावर स्पोर्टसचं अँकरिंग करता ना, मग आज नाटकवाल्यांमध्ये काय?... तिसऱ्या प्रश्नकर्त्याच्या सूरात पुन्हा एकदा आश्चर्य दडलेलं...
मी नाटक-सिनेमात कधीच काम केलेलं नाही. दिग्दर्शन आणि माझा तर आजवर संबंध आलेला नाही आणि यापुढच्या काळातही तो येईल असं वाटत नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण 2014-15 साली विजया मेहता यांचं पाच दिवसांचं वर्कशॉप मी करायचं ठरवलं, त्यावेळी मला अजिबातच वाटलं नव्हतं की, आपल्या ओळखीच्या नाटकवाल्यांना त्या कृतीचं इतकं मोठं आश्चर्य वाटेल. विजयाबाईंचं ते वर्कशॉप खरं तर साऱ्यांसाठी खुल होतं. अभिनेते-अभिनेत्री, दिग्दर्शक आणि अगदी ऑब्जर्व्हर्स म्हणजे, प्रेक्षकांसाठीही. आयोजकांनी पाठवलेला अर्ज आणि वर्कशॉपसाठीचं शुल्क भरलं की, कुणीही विजयाबाईंसमोर मांडी घालून बसायला मोकळं होतं. बरं, आजच्या जमान्यात ज्यांच्या पायाशी मांडी घालून बसावं आणि मिळेल तेवढं ज्ञान पदरात पाडून घ्यावं अशी ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वं दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळं विजयाबाईंचं ते वर्कशॉप ही केवळ नटमंडळी किंवा दिग्दर्शकांसाठीच नाही, तर माझ्यासारख्या नाटकांची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठीही मोठी पर्वणी होती. त्यामुळं मला विजयाबाईंच्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थी बनून बसावंसं वाटावं यात आश्चर्य काहीच नव्हतं.
बाईंनी बसवलेलं पुरुष, तसंच वाडा चिरेबंदीची त्रिनाट्यधारा, जब्बार पटेलांचं मूळ संचातलं घाशीराम कोतवाल, सतीश आळेकर-चंद्रकांत काळे यांचं बेगम बर्वे अशी किती तरी नाटकं मी ऐन तारुण्यात पाहिली होती. पण विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखतींमधून बाईंच्या कर्तृत्त्वाचा झालेला उल्लेख त्यांच्याविषयी अधिक कुतूहल निर्माण करणारा होता. कळत्या वयात ते आकर्षण आणखी वाढलं. बाईंचं 'झिम्मा' वाचूनही ती भूक भागली नव्हती. 'एबीपी माझा'च्या सन्मान सोहळ्यात बाईंशी प्रत्यक्ष बोलताही आलं. पण बाई अभिनेत्यांना पैलू कसे पाडतात, ती प्रोसेस प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा कायम होती. शशी व्यास यांच्या 'पंचम निषाद'च्या वतीनं प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीत बारा वर्षांपूर्वी आयोजित वर्कशॉपच्या निमित्तानं माझी ती इच्छा सफल झाली. पण बाईंचं ते वर्कशॉप म्हणजे, नाट्यशिक्षणं कसं असावं याचा तो निव्वळ वस्तुपाठ नव्हता, तर एखाद्याचं जगणंही समृद्ध करणारा तो अनुभव होता.
रोज सकाळी दहाच्या ठोक्याला बाई डाव्या विंगेतून मिनी ऑडिटोरियमच्या स्टेजवर अवतीर्ण होत. वयोमानानुसार बाईंची चाल आणि त्यांच्या हालचाली संथ झाल्या होत्या. पण त्यांच्यामधली कमालीची उर्जा त्यावेळीही कायम होती. आपल्यातली ती उर्जा बाई समोरच्या माणसांमध्ये अतिशय सहजतेनं परावर्तित करत. म्हणूनच एखादा पोरसवदा अभिनेता असो किंवा वयाची साठी ओलांडलेले सशक्त अभिनेते किंवा अभिनेत्री असोत, प्रत्येकजण पाच दिवसांत अगदी 'विजयाबाई'मय झाला होता. बाईंची तुकतुकीत कांती, त्यांची प्रसन्न मुद्रा, त्यांचे रुपेरी केस, डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगाची त्यांची साडी पाहिली की, साक्षात सरस्वतीमातेनंच मॉडर्न अवतारात रंगमंचावर एण्ट्री घेतल्याचा भास व्हायचा आणि कळत नकळत प्रत्येकजण खुर्चीतून उठून उभा राहायचा. मग बाईंचं, 'ए तुम्ही उठून नाही हं उभं राहायचं' असं दरडावणं ठरलेलं असायचं. पण ते दरडावणंही कानाला इतकं गोड वाटायचं की, बाईंच्या व्यक्तिमत्त्वाबाबतचं पहिलं टेन्शन तिथंच खलास व्हायचं. मग लक्षात यायचा तो बाईंचा काटेकोर स्वभाव. बाईंना त्यांची खुर्ची, त्यांचं टेबल, त्यांची पर्स, त्यांचं पेन अगदी नेमक्या जागीच लागायचं. रंगमंच आणि सभागृहामधल्या प्रकाशयोजनेवरही त्यांची सूक्ष्म नजर असायची. आपल्याला हव्या त्या गोष्टी विशिष्ट जागी दिसल्या, प्रकाशयोजना आणि साऊंड सिस्टिम मनासारखी आढळली की, 'देवीजी' प्रसन्न होऊन आपल्या खुर्चीत आसनस्थ होत. आणि मग वर्कशॉपच्या नावानं सुरू होई तो माणूस घडवण्याचा प्रवास.
बाईंना त्यांना हवी असलेली एखादी गोष्ट वेळेवर आणि पाहिजे त्या जागी सापडली नाही की, खूप गंमत येई. 'ए माझं पेन कुठेय? तुमचं लक्ष नाही हं माझ्याकडे' अशी लडिवाळ तक्रार करून बाई पुन्हा आपल्या मुद्यावर येत. बाईंच्या तक्रारीचा तो सूरही कानाला इतका गोड लागायचा की, कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं. त्याच प्रेमातून कुणाला बाईंमध्ये आपल्या आईचा, तर कुणाला आजीचा भास झाला. तसं त्यांनी समारोप सोहळ्यात बोलून दाखवलं. पण मला बाईंमध्ये दिसल्या होत्या त्या शिशुवर्गातल्या आपल्या शिक्षिका किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर माँटेसरीच्या टिचर. समोरची मुलं दंगा घालणार, त्यांचं आपल्याकडं अधूनमधून लक्ष नसणार हे ध्यानात ठेवून, शिशुवर्गाच्या शिक्षिका कशा त्या चिमुरड्यांच्या कलांनी घेतात, त्यांच्याशी कशा एकरुप होतात; तशाच विजयाबाईही वर्कशॉपमधल्या लहानथोरांशी बोलताना मूलात मूल होऊन बोलायच्या. त्यामुळं त्यांच्या विद्वतेचं कधी दडपण आलं नाही. समोरच्याच खुर्चीतला एक युवा रंगकर्मी चक्क च्युईंगम चघळत असल्याचं आढळल्यावरही बाईंच्या रागाचा पारा चढला नाही. कदाचित बाईंच्या लडिवाळ तक्रारीचा परिणामच इतका उत्तम असतो की, त्यांना आयुष्यात कधी आवाज चढवायची गरज भासली नसावी. 'ए, मी मघाचपासून बघतेय हं, हा किनई च्युईंगम खातोय’, या बाईंच्या लडिवाळ उद्गारांवर सभागृहात पिकलेला हशा विरायच्या आत, त्या युवा रंगकर्मीनं शरमेनं ते च्युईंगम चक्क गिळलेलं होतं. आणि तसं त्यानं लागलीच जाहीरही करून टाकलं.
विजयाबाईंचा मूळचा बोलघेवडा आणि गोष्टीवेल्हाळ स्वभाव त्यांच्या वर्कशॉपदरम्यान अनेकदा उफाळून येई. सरावाच्या नसलेल्या माणसांची नावं बाईंना त्यावेळी लक्षात राहात नव्हती. म्हणून मुलांना बाबू आणि मुलींना बाबी किंवा बेब संबोधण्याचा सोयीस्कर पर्याय त्यांनी स्वीकारला होता. वैभव तत्त्ववादीला त्याच्याच सुचनेनुसार आतंकवादी, भूषण प्रधानला ‘ए सीकेपी’ किंवा मनवा नाईकला सुचेल त्या नावानं त्या बोलवायच्या. एरवी मात्र विजयाबाईंची स्मरणशक्ती दांडगी होती. एखादा विषय समजावून देताना जुन्या नटांचे, नाटकांचे कितीतरी किस्से त्यांच्या ओठांवर सहज येत. आणि मग ते किस्से रंगवून सांगताना बाई त्यात इतक्या रमून जायच्या की, कुणालाही वेळेचं भान उरायचं नाही. पण वेळेचं भान आलं की, पुन्हा डोकावायचा तो बाईंचा लडिवाळपणा... ए, मी खूप बोलते का, असा प्रश्न करत बाई पुन्हा मूळ मुद्यावर यायच्या. पण तोवर समोरचा विद्यार्थी हा ब्रेख्त, बारो, स्टेनिस्लावस्की, पीटर ब्रुक, फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांच्यापासून मास्टर दत्ताराम, गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी आदी नाट्यप्रतिभावंताच्या प्रतिमांमध्ये गुंग झालेला असायचा. बाईंनी बोलण्याच्या ओघात काही दिग्गजांशी झालेल्या आपल्या वादांची, मग त्यांनी धरलेल्या अबोल्यांचीही कबुली दिली. पण पाच दिवसांत त्यांनी एकदाही कुणावर कटू शेरेबाजी केली नाही. विक्रम गोखले, अशोक सराफ, नाना पाटेकर, रवींद्र मंकणी, भारती आचरेकर, सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्यासारख्या आजच्या पिढीलाही परिचीत अशा नटाविषयी किंवा नटीविषयी चांगली कमेंट केली, की बाईंचा आग्रह भलताच लडिवाळ व्हायचा... 'ए, त्याला सांगू नका हं मी त्याच्याविषयी चांगलं बोलली म्हणून...' बाईंनी कौतुक केलेली ही नटमंडळी त्यावेळी चक्क साठीपासष्ठीच्या अल्याड किंवा पल्याड उभी होती, पण आपल्या कौतुकानं तो किंवा ती फार शेफारून जाऊ नयेत, एवढीच मातृत्त्वसुलभ भीती त्यांच्या लडिवाळ आग्रहापाठी असायची.
बाईंच्या तक्रारी किंवा त्यांच्या आग्रहाइतकीच त्यांची टीकाही भलतीच लोभसवाणी वाटायची. नव्या संचात उभी राहिलेली जुनी नाटकं त्यांना फारशी भावली नव्हती. 'ए, मला नाही आवडलं हं ते' या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या मनातली ती खंत व्यक्त केली होती. टेलिव्हिजन सीरियल्समधल्या स्त्रिया धडोतीची लुगडी का नेसत नाहीत, त्या घरात इतके दागिने का घालतात, त्या लिपस्टिक लावून चपात्या का लाटतात, सीरीयल्स चकचकीत वस्तूंमध्ये हरवल्या आहेत का, असे प्रश्न त्यांनी नव्या पिढीच्या कलाकारांना विचारले. बाईंच्या त्या शंकांचे काहींनी आपापल्या परीनं निरसन करण्याचा प्रयत्न केला होता. 'बाई, एखाद्या निर्मात्यानं तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं पायलट एपिसोड्स शूट केले ना तर ती सीरियल पासच होत नाही. त्यामुळं आमच्याइतकीच तुमच्या मार्गदर्शनाची गरज ही विविध चॅनेल्समधल्या कार्यकारी निर्मात्यांना आहे.’ टेलिव्हिजन सीरियल्समधल्या कलाकारांना वेळेत स्क्रीप्ट्स मिळत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या तालमीच होत नाहीत, या बाईंच्या तक्रारीवर नाना पाटेकरांनी नव्या पिढीची वकिली केली होती. नाना म्हणाले होते, 'बाई, ते या काळाचंच दुर्दैव आहे. म्हणून मी सीरियल्स करत नाही, पण चित्रपटांच्या दुनियेतही हीच बोंब आहे. माझा एकंदर स्वभाव लक्षात घेता मला वेळेत स्क्रीप्ट मिळेल याची दक्षता घेतली जाते.’ विजयाबाईंचं मोठेपण म्हणजे त्यांनी आपल्या शिष्योत्तमांनी घेतलेला मोठा घासही अगदी सहज स्वीकारला होता. मोठी माणसं ही मोठी का असतात याचं विजयाबाई या आदर्श उदाहरण होत्या.
विजयाबाई आपल्या वर्कशॉपमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही विषयांवर अगदी भरभरून आणि तळमळीनं बोलल्या होत्या. पाच दिवसांमधल्या साधारण वीसेक तासांत समोरच्यांना जितकं देता येईल, तितकं त्यांनी दिलं. समोरून कितीही असबंध प्रश्न आला तरी त्याचं सविस्तर उत्तर देऊन बाईंनी त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं समाधान होईल, हे कटाक्षानं पाहिलं. त्यावेळी त्या साधारण 80 वर्षांच्या होत्या. पण वयाच्या 80 व्या वर्षी विजयाबाईंइतका संयम, त्यांच्याइतकी उर्जा आपल्यापैकी कितीजण दाखवू शकतील, ही शंकाच आहे. म्हणूनच त्यांनी वर्कशॉपमध्ये दिलेला सल्ला किंवा त्यांनी गिरवून घेतलेला धडा हा अनेकांपर्यंत पोहोचावा हाच लेखाचा मूळ उद्देश आहे. बाईंचा तो सल्ला फक्त नाटकवाल्यांपुरता मर्यादित नाही, कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीनं आत्मसात करावा असा आहे. बाई म्हणाल्या होत्या की, आपण प्रत्येकजण कळत नकळत अभिनय करत असतो. पण आपल्याला आयुष्यात रॉबर्ट डी निरो बनायचं आहे की, एखाद्या सार्वजनिक उत्सवात कला सादर करून समाधान मानायचं आहे, हे ज्याचं त्यानं ठरवावं. सार्वजनिक उत्सवातून कर्णकर्कश संगीत वाजवून ऑर्केस्ट्रा सादर करण्यात येतो. पण त्याच वेळी एखादा कुमार गंधर्व जीवनाचा नवा अनुभव देत अभिजात संगीत निर्माण करत असतात.
विजयाबाईंच्या दृष्टीनं प्रशिक्षणाचं महत्त्व खूप मोठं होतं. ते ठासून सांगताना त्या म्हणाल्या होत्या, 'प्रशिक्षण दिलं जात नाही. ते घ्यावं लागतं. प्रशिक्षण खिरापतीसारखं दिलं गेलं असतं तर एनएसडीतले सारे विद्यार्थी नसिरुद्दिन शाह झाले असते. पण तसं होत नाही. कारण तुम्ही किती घेता यावर ते अवलंबून असतं. म्हणूनच प्रशिक्षणाचं महत्त्व लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही आयुष्यभर प्रशिक्षण घेत राहता. शोध घेत राहता. तो शोध संपला की तुमच्यातली कलाही संपते.’ विजयाबाईंनी वर्कशॉपच्या पहिल्याच दिवशी होतकरू कलाकारांना धोक्याचाही इशारा दिला होता. त्या म्हणाल्या होत्या, 'अभिनयाला टाळी लवकर मिळते. पण टाळी मिळते म्हणून प्रवास संपवू नका.' आधी अनुभूती आणि मग अभिव्यक्ती हे स्टेनिस्लावस्कीचं सूत्र सांगून त्या सांगितलं की, 'तुमच्यातल्या कलेवर प्रेम करा, पण स्वत:वर प्रेम करायचं टाळा. स्वत:च्या प्रेमात पडणारी माणसं त्यातच मुकी, बहिरी आणि आंधळी होतात. आणि तिथंच तुमचा शेवट होतो.'
विजयाबाईंचे ते शब्द खरं तर रंगकर्मींसाठी होते तरी त्या शब्दांमधून शहाणपण कुणी घ्यायचं याला मर्यादा नाहीत. त्या शब्दांमधून तुम्हीआम्हीही आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं आहे. विजय तेंडुलकरांनी आपल्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या, एकवीस वर्षांच्या विजया जयवंत म्हणजे विजया मेहतांना 'बाई' म्हणून संबोधायचं फर्मान काढलं होतं, ते किती योग्य होतं यावर पुढच्या काळात वारंवार शिक्कामोर्तब होत राहिलं. विजया मेहतांचं बारा वर्षांपूर्वीचं वर्कशॉपही त्याला अपवाद नव्हतं.
ट्रेंडिंग न्यूज






















