“विकली ऑफ आणि माझा? अहो, आमची ड्युटी 12 तास. रोजच. कामाचे दिवस आठवड्याला सातही. आठवड्याला सुट्टी मागितली तर थेट पगारातून कापून घेतात. त्यामुळे ती चैन परवडत नाही.” नामदेव पवार सांगत होते...नामदेव माझ्या रोजच्या जाण्या-येण्याच्या मार्गावरील एका सोसायटीचे सुरक्षारक्षक. आपल्या भाषेत वॉचमन. सध्याच्या प्रचलित राजकीय भाषेत चौकीदार. हक्काची साप्ताहिक सुट्टी म्हणजे चैन... ती घेतली तर पगार कापला जाईल अशी भीती बाळगत आठवडाभर राबत राहणाऱ्या नामदेवसारख्या चौकीदारांच्या भरवशावरच आपण निवांत झोपतो आणि त्या चौकादारांना बारा तासाची ड्युटी करून चार तासांच्या प्रवासानंतर घरी पोहचल्यावर झोपायला उरतात ते पाच-सहा तासच. आणि मग कधी ड्युटीवर डोळ्यावर झापड आली तर जो पाहील त्याच्या शिव्यांचा बोनस मात्र मिळण्याची हमीच!


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चौकीदाराहून राजकीय रणधुमाळी सुरु झाली तेव्हापासूनच मनात आलं होतं ज्या चौकीदारांचा राजकारणासाठी वापर केला जातोय त्या चौकीदारांशी बोललं पाहिजे. तसं माझं बोलणं होतं असतं. खुशाली विचारण्याइतकं. येता-जाता नमस्कार करण्याइतकं. काहीवेळा सकाळी तेच आणि रात्रीही तेच दिसतात, त्यामुळे त्यांच्या नोकरीविषयीही बोलणं व्हायचं. पण ते वरवरचं. यावेळी मात्र ठरवून बोलण्यास सुरुवात केली. आणि आजवर दिसत होतं त्याही पलीकडचं भयावह वास्तव समोर आलं.

महाराष्ट्रात किमान चार ते पाच लाख तरी सुरक्षारक्षक म्हणजेच चौकीदार असावेत. आता येथे सध्याचा जास्त प्रचलित झालेला शब्द चौकीदारच वापरतो. या लाखो चौकीदारांपैकी 90 टक्के चौकीदार हे माणूस म्हणून सन्मानानं जगू शकत नाहीयत. त्यांना इच्छा असूनही तसं जगणं शक्यच नाही. मुंबईतील चौकीदारांचे पगार सरासरी 7 ते 15 हजारांच्या श्रेणीत आहेत. पुन्हा अनेकांना गैरसमज होईल म्हणून स्पष्ट करतो हे बेसिक पगार आणि त्यावर मग इतर भत्ते वगैरे असे लाड मुळीच नाहीत. हेच ते जे आहेत ते पगार. त्यातच सारं काही. मग त्यांनी त्यातच राहायचं, खायचं, आजारी पडलं तर डॉक्टरचा, औषधांचा खर्चही करायचा आणि पुन्हा त्यांच्या सिक्युरिटी एजन्सीनं दिलेले गणवेश सुद्धा स्वच्छ ठेवायचे. आता ज्या मुंबईत झोपडपट्टीतील साध्या एका खोलीचं भाडंही किमान सहा हजार आहे तेथे या पगारात कुटुंबासह राहण्याची अपेक्षाच ठेवता येत नाही. आणि ठेवलीच तर मग केवळ पत्नीलाच नाही तर चिल्ल्या-पिल्ल्यांनाही काहीतरी कामाला जुंपावं लागतं. म्हणजे पूर्ण कुटुंबानं राबायचं ते फक्त घराचं भाडं आणि दोन वेळचं जेवता यावं यासाठी.

हे योग्य नसतं. त्यामुळे रामशरण यादवसारखे अनेक आपल्या पत्नी आणि मुलांना गावीच ठेवतात. येथे ते एकटं राहतात. एखाद्या भाड्याच्या खोलीत एकत्र राहतात. सोमवारी रात्री घरी जाताना मी पाहिलं. रामशरण जेवत होता. प्लास्टिकच्या पातळ पिशवीत डाळीसारखा पदार्थ. समोरच्या ताटातल्या भातात तो ओतत होता. एका कागदावर काही भजी होते. हिरव्या मिरच्या. रामशरण ज्या सोसायटीचा चौकीदार आहे तेथे 120 कुटुंबे राहतात. एका सदनिकेची किंमत किमान सव्वा कोटी असावी. सोसायटीचे आऊटगोईंग पाच हजारापेक्षा जास्तच. तरीही रामशरणला मात्र महिन्याला बारा हजारच मिळतात. तो जे खात होता ते काही सकस अन्न नव्हतं. फुटपाथवरील फेरीवाल्याकडील जेवण. मिळेल ते खाऊन जगावं लागत असल्यानं त्याचा परिणाम तब्येतीवर होतोच होतो. आजार जडतात. सुट्टी होते. पगार कापला जातो. कमी पगार आल्यानं कमी खर्च करता येतो. पुन्हा खाणं कमी. पुन्हा आजार. दुष्टचक्रच सुरु राहतं.

रामशरणसारखीच स्थिती मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या, एटीएम सेंटर, बँकांच्या चौकीदारांचीही. हे चौकीदार वावरतात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या ठिकाणी मात्र त्यांच्या हाती जे येतं ते इतकं नसतं की व्यवस्थित जगण्यासाठी पुरेसं ठरेल. मुंबईत काही राजकीय नेतेही सिक्युरिटी एजन्सी चालवतात. तसेच माजी पोलीस अधिकाऱ्यांनीही निवृत्तीनंतरही कमाईचा तोच मार्ग निवडलाय. धक्कादायक असं की सुरक्षेचं महत्त्व सर्वात जास्त माहित असलेला हा वर्गही सुरक्षा ज्यांच्या हाती त्या चौकीदारांसाठी काही करताना दिसत नाहीत. त्यांच्या एजन्सीचे चौकीदारही कसंबसं जगतात.

बहुतांश चौकीदार खरंतर जगायचं म्हणून जगतात. कृपाल हा चौकीदार तर त्राग्यानं म्हणाला, “कैसा जीना है ये... मरायचं नाही म्हणून जगायचं. किंवा मरण येईपर्यंत जीवन ओढायचं.”

कृपालचं बोलणं मला अस्वस्थच करून नाही गेलं तर धोक्याचा अलर्ट जारी करणारं वाटलं. ज्यांच्या हाती कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात त्या कंपन्यांची सुरक्षा असते, ज्यांच्या भरवशावर शेकडो कुटुंबं सुरक्षित जगतात ते चौकीदारच जीवनाचं ओझं केवळ लोढण्यासारखं ओढत जगत असतील तर ते नेमक्या कोणत्या मानसिकतेत वावरत असतील. खरंतर त्यांचे उपकार मानले पाहिजे. कौतुक केलं पाहिजे. सारा त्रास, विवंचनेचं जीवन जगत असूनही ते आपलं कर्तव्य बजावतात. नाहीतर खरंतर कमालीच्या प्रतिकूलतेत जगण्याच्या त्र्याग्यातून ते काहीही करू शकतात. कोणीही त्यांना कसेही वागवत असते. कमीच संस्था, सोसायटी अशा असतात जेथे चौकीदार हा फक्त सुरक्षेचं खरं कर्तव्य बजावू शकतो, बहुसंख्य ठिकाणी तेच पाण्याचे पंप चालवतात, झाडांना पाणी घालतात, काही दबंग सोसायटी सदस्यांची खाजगी कामेही करतात. तरीही कर्तव्य बजावण्यापासून ढळत नाहीत. कौतुक म्हटलं ते त्यामुळेच! एकीकडे चोरांची,  सोसायटी, कंपन्यांच्या प्रवेशद्वारांसमोर गाड्या जबरदस्तीनं पार्क करणाऱ्यांची भाईगिरी, दुसरीकडे रात्री डासांचा उपद्रव, वेळी-अवेळी ड्युटीमुळे उद्भवणारे आजार. जगणं नसतंच सोपं!

हे असं चौकीदाराचं संघर्षमय कर्तव्य बजावत जगणं एकीकडे आणि दुसरीकडे राजकारणासाठी होऊ लागलेला त्यांचा वापर. त्यात कुणी त्यांच्या नावानं ठणाणा बोंबा मारत “चौकीदार चोर है”म्हणतंय... तर कुणी “मैं भी चौकीदार” म्हणत भाव खातंय. ज्याचं त्याचं राजकारण. करायचं तसं करावं. मात्र, ज्यांच्या नावानं हे सारं घडतंय त्यांना माणसासारखं जगता यावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असं एकाला तरी वाटतंय का? जास्त काही नको, पण माणसासारखं सन्मानानं जगता यावं यासाठी चौकीदारांना केलेल्या कामाचा मोबदला योग्य मिळावा अशी व्यवस्था तरी केली जाणार का? त्यासाठी जास्त काही नको 2002 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना कायद्याला आणखी सक्षम केलं, महाराष्ट्र सुरक्षारक्षक महामंडळाला योग्य अधिकार दिले तरीही खूप साध्य होईल. सध्या राजकारणात वजन राखून असलेल्या सुरक्षारक्षक एजन्सींच्या दबावाखाली सरकार आवश्यक अशा या कायद्याला सौम्य करू लागलंय. तसंच खाजगी एजन्सींचा फायदा होईल असे सूट देणारी पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे उलट आता होणारं शोषण आणखी वाढेल.

अच्छे दिन तर सोडाच चौकीदारांना जगणंही कठीण होईल असंच सारं घडताना दिसतंय... अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या मोठ्या नेत्यांनीही “मैं भी चौकीदार” असं मिरवण्यास सुरुवात केली असली... राहुल गांधींनी आम आदमीसाठी आपणच, काँग्रेसच तारणहार असल्याचं राजकारण आक्रमकतेनं करण्यास सुरुवात केली असली... तरीही सर्वात आम असणाऱ्यांपैकीचेच खरे चौकीदार कुणाच्याच खिजगणतीत नाहीत. त्यांच्याशी संवाद केला जातो. पण त्यांच्या समस्या सोडवल्या तरच खरं. नाही तर त्यांचं महत्व आहे ते फक्त राजकारणासाठी त्यांना वापरून घेण्याएवढंच असंच वाटेल... कोणत्याही चौकीदाराला विचारलं तर ते सांगतील...”चौकीदार है ऐसा सिर्फ कहलाओ मत... चौकीदार हो के दिखाओ साब..फिर समझ में आएगा जिदंगी क्या होती है!”