कोरोना काळात ज्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक बाधित होत होते, अनेक जणांचे या आजारामुळे मृत्यू झाले होते. त्यावेळी नागरिकांमध्ये या आजराने जबरदस्त दहशत पसरवली होती. त्यावेळी प्रत्येक जण या आजरावरील लस कधी येणार असे प्रश्न विचारत होते. अनेक लस निर्मित करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ या कामी दिवस रात्र काम करत होते. देशातील डॉक्टरच नव्हे तर सर्वसाधारण व्यक्ती लसीची वाट बघत होते. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात लस आली, आपातकालीन वापरासाठी परवानगीही मिळाली. लसीकरणाची मोहिमेचा मोठ्या थाटात शुभारंभ संपूर्ण देशात पार पडला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने ठरले होते त्याप्रमाणे सुरूही झाले मात्र या लसीकरण मोहिमेला अपेक्षित हवा तसा प्रतिसाद पहिल्या टप्प्यात मिळत नसल्याचे दिसत आहे. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीचे महत्त्व सामान्य लोकांना पटवून ती लोकांनी घ्यावी म्हणून प्रचार करणारी मंडळी या लसीकरणाबाबत एवढी उदासीनता का दाखवत आहे हा प्रश्न या ठिकणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. गेल्या पाच दिवसात देशात आणि राज्यात तीन दिवसात 50-68 टक्क्याच्या दरम्यान लसीकरण झाले आहे. आरोग्याची आणीबाणी असताना आणि कोरोनासारख्या भयंकर आजाराविरोधात ' लसीकरण ' मोहिमेला हवे तेवढं यश प्राप्त होताना दिसत नाही. आरोग्य कर्मचारी सुरक्षित असतील तर ते सामान्य जनतेला व्यवस्थित उपचार देऊ शकतील, कोरोनाच्या विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात असताना लसीकरण मोहिमेला यश मिळणे काळाची गरज असून येत्या काळात लसीकरण करून घेणाऱ्याच्या आकडयात चांगलीच भर पडेल आणि या मोहिमेला बळ मिळेल अशी आशा बाळगण्यास काही हरकत नाही.


लसीकरण मोहिमेचे सक्षमीकरण अधिक प्रमाणात कशा पद्धतीने करता येईल याचा विचार सध्या करावा लागणार आहे. नागरिकांचा लसीकरणावरील विश्वास वाढेल अशा पद्धतीने राज्याच्या आणि महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापासूनच शहारा-शहरात लसीकरणाच्या अनुषंगाने समुपदेशन, माहिती देण्यास सुरुवात केली पाहिजे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांसोबत आरोग्य संवादाचे आयोजन करावे लागणार आहे. चाळीत, गृह निर्माण संकुलात, वाड्या-वस्त्यांमध्ये फिरून लसीचे महत्तव लोकांना पटवून दयावे लागणार आहे. त्यासाठी काही काळापुरती का होईना तात्पुरत्या स्वरूपाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे.


आज देशाचे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी या महामारीचा अंत करण्यासाठी सगळ्यांनी लस घ्यावी म्हणून लसीकरणाबाबत संकोच नको या आशयाचे पोस्टरचे अनावरण केले, तसेच त्यांनी लस सुरक्षित आणि परिणामकारकता करणारी आहे, असेही आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हटले आहे. तसेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असेही म्हटले आहे कि अनेक बाहेरच्या देशातून आपल्या देशातील लशीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लसीकरणाबाबत कुणी चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसीची पूर्ण तपासणी केल्यानंतरच आपतकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. कोव्हॅक्सीन घेतलेल्याना आतापर्यंत कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाही. त्यामुळे लशीबाबात कोणताही भेदभाव करून संभ्रम पसरवू नये. येत्या काळात आणखी काही लसी येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे गेले दोन दिवस सोशल मीडियावर 'ओ ' रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना कोरोना आजराचा धोका नाही, त्यामुळे त्यांनी लस नाही घेतली तर चालेल, अशी माहिती पसरत आहे. मात्र, वैद्यकीय तज्ञांच्या मते रक्तगट कुठलाही असू द्या लस सर्वांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.


याप्रकणी सध्याचे राज्याचे वैद्यकीय सल्लागार आणि जागतिक परिषदेच्या साऊथ आशिया विभागीय कार्यालयात 4 वर्षे सहाय्यक विभागीय संचालक म्हणून काम पाहणारे डॉ सुभाष साळुंखे सांगतात की, " पहिली गोष्ट म्हणजे लसीकरण व्यस्थापनामध्ये मोठ्या त्रुटी आहेत ह्या आपल्याला पहिल्याच दिवशी आढळून आले आहे. ज्या कोवीन अँप वरून लसीकरण लाभार्थीना लसीकरणाबाबतचे संदेश जाणे अपेक्षित होते. ते काही झाले नाही. त्या अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. त्याशिवाय कोव्हॅक्सीन या लसीला ज्या पद्धतीने घाई घाईने दिलेली परवानगी यामुळे सर्वांमध्ये संभ्रम आहे. या लसीला घेऊन अनेक जणांच्या मनात आजही किंतु आणि परंतु आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेआगोदर त्यांनी सर्व डॉक्टरांना विश्वासात घेतले पाहिजे होते. लसीकरणाबाबत सर्वांचे समुपदेश केले जाणे गरजेचे होते. जर अशा पद्धतीने कमी प्रतिसाद ह्या आरोग्य क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनी या लसीकरण मोहिमेला दिला तर त्याचा खूप चुकीचा संदेश सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. या लसीकरणाबाबतीत वैद्यककीय क्षेत्रातील लोकांशी व्यवस्थित केंद्र सरकाने संवाद साधायला हवा. लस सगळयांनी घेतली पाहिजे या मतांचा मी आहे. कारण यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना या आजाराच्या विरोधात सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे. मी लस घेतली आहे आणि ती सगळ्यांनी घ्यावी."


जानेवारी 19 ला, 'संवाद लसीकरणाचा!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये कोरोनाच्या आजाराविरोधातील राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम जेव्हा जाहीर होतो तेव्हा साहजिकच सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींचा विचार केलेला असतो. भारतासारख्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण हा तसा जिकिरीचा कार्यक्रम आहे याची केंद्र आणि राज्य सरकारला व्यवस्थित माहिती आहे. कोरोनाने ज्यावेळी एकाबाजूला संपूर्ण जगात हाहाकार माजविला होतो, अनेक जण त्यावेळी याआजारामुळे मृत्युमुखी पडत होते. त्यावेळी देश-विदेशातील शास्त्रज्ञ या विषयातील लस शोधण्याचे काम नेटाने करत होते. त्यांच्या या कामाला काही दिवसांपूर्वी यश प्राप्त झाले आणि या संसर्गजन्य आजार विरोधातील लस विकसित झाली. त्यांची परिणामकारकता, सुरक्षितता आणि उपयुक्तता ज्या संबंधित संस्थांनी तपासणे अपेक्षित होते, त्यांनी तपासून आणि सर्व बाजूंचा विचार करून सध्या तरी दोन लसींना आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. लसीकरणा सारखा महाकाय असा कार्यक्रम राबवितांना नव-नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. छोटया-छोट्या गोष्टींचे भांडवल करून अर्धवट माहितीच्या आधारे चुकीची माहिती सर्व सामन्यांमध्ये प्रसारित होणे, हा ह्या लसीकरण मोहिमेमधील सर्वात मोठा अडथळा आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे शासनाने वेळीच ' सावध ऐका पुढल्या हाका ' हे धोरण अवलंबून लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी 'संवाद लसीकरणाचा' हा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे.


लस कधी येणार ते लस आल्यानंतर ती घेण्याबाबत असणारी उदासीनता ह्या सगळ्या प्रकारामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पहिल्या टप्प्यातील लस घेणारे कुणी सर्वसाधारण व्यक्ती नसून त्या आरोग्य क्षेत्रात रोज काम करणारे लोक आहेत. त्यांनीच जर लसीकरणाला कमी प्रतिसाद दिला तर सर्व सामान्य नागरिकांनी कुणाच्या भरवश्यावर लस टोचून घ्यायची हा मोठा प्रश्न येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. लस घेणे हा ऐच्छिक विषय असला तरी या आजराविरोधात सुरक्षा मिळविल्यास लस घेणारा स्वतः आणि त्याच्या संपर्कात येणारे सर्व या आजरापासून सुरक्षित होऊ शकतात. आज पर्यंत ज्यांनी राज्यात लस टोचून घेतली आहे त्यापैकी अत्यल्प लोकांना सर्व साधारण दुष्परिणाम जे कोणत्याही लसीकरांच्या वेळी येतात असे प्रकार सोडले तर कुणालाही विशेष असे दुष्परिणाम जाणवलेले नाही. मागील संपूर्ण वर्षात सर्वानीच कोरोना या आजराची भीती अनुभवली आहे. या संसर्गजन्य आजरामुळे बाधितांना उपचारासाठी बेड मिळणे मुश्किल झाले होते. प्राणवायूचा तुटवडा भासू लागला होता. आय सी यू मध्ये जागा मिळत नव्हती. त्यामुळे या सर्व प्रकारातून सुटका करायची असेल तर सगळ्यांनी लस घेतली पाहिजे. यावेळी गीतकार सुरेश भटांच्या या ' उषःकाल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ' या ओळी सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमे निम्मित जो प्रकार सध्या सुरु आहे त्यास लागू पडतात.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग