भारतीय द्वीपखंडाच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन इतिहासात जी नावं ठळकपणे घेतली जातात त्यात शिवरायांचे नाव अग्रस्थानी आहे. जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, प्रांत या सर्वांचे भेद विसरुन सर्व वयोगटातील लोक शिवरायांना आपला आदर्श मानतात. अद्भुत पराक्रम, समतोल विचारसरणी, तेजस्वी व्यक्तिमत्व आणि प्रभावी रित्या यशस्वी अंमलात आणलेली शिवशाही हे शिवबांच्या सार्वत्रिक समर्थनाची कारणे आहेत. त्यातही शिवशाहीचा ठसा जनमनाच्या हृदयावर अधिक खोलपणे उमटला असल्याचे जाणवते. याचे कारण शिवशाहीची धोरणे, ध्येयवाद आणि अंमलबजावणी. तुलनेत आजच्या सद्य लोकशाही राजवटीकडे पाहू जाता या तिन्ही मुद्द्यांचा दूरदूरपर्यंत कुठेही संबंध येत नाही. वास्तविक पाहता आपल्या राज्यकारभारासाठी बाबासाहेबांसारख्या द्रष्ट्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली एका समर्थ राज्यघटनेचा भक्कम आधार आजच्या राज्यकर्त्यांना लाभला आहे. मात्र तरीही कमालीचे पंगूत्व या राजवटीत आढळते. शिवकालात अशी कोणतीही लिखित घटना वगैरे नव्हती, पण शिवरायांचे काही कायदे कानून होते, नियम होते, तत्वे होती, विचारधारा होती, धोरणे होती. ज्या अनुषंगाने स्वराज्याचे शकट चाले.


शिवबांचा इतिहास उत्तुंग आणि दैदिप्यमान होता, ज्याचा ठसा अमीट आहे. आजघडीला मात्र काही जणांकडून हेच चित्र डिस्टोर्टेड पद्धतीने समोर मांडण्यात येतेय. छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने मतांची भीक मागून, त्यांची छबी आपल्या प्रचार साहित्यात वापरुन, त्यांचा आशीर्वाद आपल्या एकट्यालाच आहे असे भासवून, फक्त आपण एकटेच त्यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे दांभिकतेने भासवून, बुद्धिभेद करुन राजकारण करत राहायचे आणि काहीही करुन सत्तेत रहायचे हा आजच्या राजकीय पक्षांचा फंडा बनला आहे. छत्रपतींचे नाव वापरले की लोक भावनाविवश होतात, कारण लोक त्यांना पूजतात. मात्र राजकीय पक्ष हे विसरतात की आपण जेंव्हा शिवबांचे नाव वापरतो तेंव्हा शिवशाहीप्रमाणे राज्य करुन दाखवण्याचे उत्तरदायित्व आपल्या शिरावर येऊन पडते. शिवशाही तर फार लांबची गोष्ट झाली, देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके होत आलीत पण लोकशाही आणि तिची मुल्ये याची जाणच आपल्या राजकारण्यांना आलेली नाही असे खेदाने नमूद करावे वाटते.

स्त्रीच्या इभ्रतीची विटंबना केली म्हणून शिवबांनी रांझ्याच्या पाटलाला चौरंगा केल्याचे सर्वांना ज्ञात आहे. पण एका स्त्रीशी दुर्व्यवहार केल्याने त्यांनी त्यांच्या सख्ख्या मेव्हण्याचे सखोजी गायकवाडांचे डोळे काढले होते. आजकाल असे घडते का? आपली व आपल्या पक्षाची छबी बिघडू नये याकडे राज्यकर्ते कल ठेवतात. कुणाचेही गैरव्यवहार उघड झाले किंवा आपल्या निकटच्या लोकांचे गुन्हे उजेडात आले की त्याला लवकरात 'क्लीनचिट'चं चिटोरं देण्यात धन्यता मानणाऱ्या राज्यकर्त्यांना शिवबांचे नाव आपल्या राजकारणासाठी वापरण्याचा कोणताही नैतिक आधार नाही. शिवबांनी जनतेच्या मालमत्तेची काळजी घेताना अगदी त्यांच्या गवताच्या गंजीतील काडीचाही विचार केला होता तर आजच्या लोकशाहीत प्रजेच्या घराची काडीदेखील उरता कामा नये असा चंग शासकांनी बांधला आहे की काय असे वाटावे अशी आजची परिस्थिती आहे.

शिवशाहीत न्याय व्यवस्था सक्षम होती, न्यायदान वेळेवर आणि निर्भीड, निपक्षपाती तर होतेच पण त्यांतील सजेची तामिली लगेच व्हायची. न्यायव्यवस्थेइतकीच सक्षम प्रशासन व्यवस्था शिवशाही होती. शिवकालीन पत्रव्यवहारातून याची अनुभूती येते. स्वतः शिवराय जातीने लक्ष घालून चौथाईपासून ते जकातीपर्यंतच्या मामल्यात लक्ष घालीत, जमिनीचे - इनामाचे तंटे बखेडे सोडवत. या उलट आजकालच्या मंत्र्यांनी जमिनी हडपणे हा एक अलिखित नियम होऊन गेला आहे. शिवाय आजच्या प्रशासनावर राज्यकर्त्यांचा वचक नसल्याचे चित्र दिसते. स्वराज्याच्या खजिन्यातील पैसे कसे वापरावेत याची काही तत्वे शिवशाहीत होती तर जनतेचे पैसे कसे ओरबाडून खावेत याची आगळी संहिता सद्यकाळात आढळते. एका प्रसंगी रात्र झाल्यावर उशिरा गडावर आल्यावर खुद्द शिवबांना गडात घेतले गेले नव्हते, त्यांना गडाबाहेर थांबवले गेले होते. दिवस उजाडता गडात आल्यावर त्यांनी त्या किल्लेदाराचा हातातील कडे देऊन सन्मान केला होता. जनतेच्या पैशातून विमानातून फिरणाऱ्या आजच्या राज्यकर्त्यात शिवशाहीतील निग्रह, त्याग, सचोटी, तळमळ आणि सर्वस्व अर्पण करण्याची तयारी हे गुण जोवर येत नाही तोवर शिवशाहीचा उल्लेख देखील आजच्या शासकांनी करु नये असे जनतेला अपेक्षित आहे.

रायगडावर अडकलेल्या हिरकणीने भर रात्री आपल्या मुलाच्या ओढीने जिथून गड उतरुन दरी पार केली, तिथे तिच्या नावाचा बुरुज उभा केला. तिची खणा नारळाने ओटी भरली, तिला चोळी बांगडी दिली. किल्ल्यातील एक त्रुटी समोर आल्यावर तिची तात्काळ दुरुस्ती करुन त्याची जाणीव ठेवत हिरकणीचा आणि तिच्या मातृत्वाचा गौरव करणारे शिवबा राजे दूरदृष्टीचे तर होतेच होते, पण आपल्या प्रजेप्रती कनवाळूही होते हे यातून दिसून येते. आजच्या शासकांत हे गुण पूर्णतः लोप झालेत.

शिवशाहीत न्याय्य मार्गाने महसूल गोळा करून त्याचा योग्य वापर करणारी सक्षम यंत्रणा होती. त्यातून लोकसहभागाद्वारे धरणे, रस्ते, घरेबांधणी आणि राज्यसुरक्षा ही कामे केली जात. आजच्या काळात जमा होणारा सर्व पैसा जसाच्या तसा पै न पै च्या हिशोबाने विकासकामासाठी वापरला जातो का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. एक मासलेवाईक उदाहरण म्हणून आजच्या टोलनाक्यांचे चित्र काय दर्शवते? शिवशाहीत स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण केले जायचे, लोकांमध्ये धर्मभेद केला जात नसे, अमुक एक व्यक्ती मुसलमान आहे म्हणून त्याला ठार मारा असे राजांनी म्हटल्याचे एकही वाक्य इतिहासाच्या कोणत्याही दस्तऐवजात आढळून येत नाही. पण आजकाल शिवबांचे नाव वापरुन जाती धर्मात फुट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेणे हा एक शिरस्ता पडला आहे.

शिवरायांचे चरित्र लिहिणारे, मांडणारे, उद्घोषित करणारे आणि त्यावर विचार मांडणारे लोक देखील बहुत करून आपल्याला हवा तसा सोयीस्कर अर्थ लावून आपल्या वकुबानुसार आणि विचारसरणीनुसार त्यांना रंगवतात. आताच्या काळात सकल शिवराय जसेच्या तसे मांडणे अनिवार्य झाले आहे. लोकांचे खोटे नाटे इतिहास प्रकटन होते पण त्यातून अनेकदा चुकीचे संदेश जातात याचा त्यांना विसर पडतो. आपले विचार महापुरुषांच्या आडून मांडणे, आपला विखार त्यातून पसरवणे,आपल्या इप्सित गोष्टींना साध्य करण्यासाठी महापुरुषांचे नाव घेणे या बाबी आता सामान्य होत चालल्यात. या गोष्टी धोकादायक आणि धक्कादायक आहेत.

अशीच खटकणारी आणखी एक बाब म्हणजे काही लोक शिवबांना आपल्या जातीच्या चौकटीत बंद करू इच्छितात. त्यांना एका जातीपुरते मर्यादित करून स्वतःची अस्मिता गोंजारताना हे ही विसरतात की हा राजा कुणा एका जाती धर्माचा नव्हता तर त्याच्या स्वराज्यातील अखिल रयतेचा राजा होता. काही लोक त्यांना ठराविक साचेबंद गाळीव इतिहासाच्या पानात चितारून त्यांचे प्रतिमाभंजन करतात. शिवबांनी केलेल्या स्वाऱ्या असोत वा तहनामे असोत वा रयतेच्या कल्याणाची कामे असोत त्यात एकच उद्देश होता तो म्हणजे जिजाऊंच्या स्वप्नातले स्वराज्य उभे करणे. शिवरायांनी अस्मानी शत्रू नमवला, दमवला आणि झिजवला. शून्यातून स्वराज्य उभं करताना त्यांनी सर्व जात धर्माच्या, सर्व सुभ्या-परगण्यातील लोकांना आपल्या सैन्यात आणि हृदयात स्थान दिलं. असं असूनही काही लोक त्यांना आपल्या आवडीनुसार विशिष्ठ चाकोरीत कैद करू इच्छितात. धर्मभेद - जातीभेद करण्यासाठी शिवबांच्या नावाचा हत्यारासारखा वापर करतात. हे अत्यंत निंदनीय आहे. या सर्वात वाईट गोष्ट ही आहे की हे सर्व जनतेच्या अंगवळणी पडत चालले आहे. जनतेला थोडेफार वैषम्य वाटतेय पण ती निव्वळ बघ्याच्या भूमिकेत आहे. लोकांना खरोखर शिवशाही यावी असे वाटत असेल तर आधी त्यांना स्वतःला खडबडून जागे व्हावे लागेल. मग राज्यकर्त्यांना वठणीवर आणायला वेळ लागणार नाही. तोवर विविध पक्षांकडून शिवशाहीची गाजरे घेत बसणे क्रमप्राप्त आहे .

पक्ष, संघटना, संस्था, व्यक्तीविशेष कोणही असो त्यांनी आपल्या स्वार्थासाठी शिवबांच्या नावाचा वापर करताना त्यांनी हजार वेळा विचार केला पाहिजे अशी स्थिती निर्माण करणं शक्य आहे, पण त्या साठी कुणासोबतही वाहवत जाणं आधी बंद व्हायला हवं. स्वतःचे विचार स्पष्ट आणि परखड हवेत, नानाविध इतिहासकारांनी रेखाटलेल्या शिवचरित्राचे वाचन हवं, चुकीची वा गैर मांडणी समोर आल्यास त्याचं खंडनमंडन करता यायला हवं. मुख्य म्हणजे शिवबांच्या मार्गावर जगण्याची कास मनी यायला हवी. हे शक्यही आहे कारण आपल्या राजाने अतर्क्य अशक्य असे कर्तृत्व आपल्या युक्ती आणि शक्तीच्या जोरावर शक्य करून दाखवलं होतं. आपण किमान त्यांच्या विचारांशी ठाम राहिलो तरी हे शिवधनुष्य सहज पेलू शकू आणि खऱ्या अर्थाने शिवशाही अस्तित्वात येण्यासाठी इतकं तर आपण केलंच पाहिजे...

- समीर गायकवाड.