इयत्ता बारावीच्या युवकभारती पुस्तकात विख्यात विद्रोही दलित साहित्यिक वामन होवाळ यांची 'मजल्याचं घर' ही कथा होती. होवाळांच्या 'बेनवाड' ह्या गाजलेल्या कथासंग्रहातली ही कथा. बयाजी नावाच्या माणसाची. त्याच्या स्वप्नाची आणि स्वप्नासाठीच्या लढाईची!
गावातल्या तालेवार लोकांची, उच्च जातीय मंडळींची, कथित श्रेष्ठ वर्गीयांची जशी घरे आहेत तसंच आपलंही घर असावं हे बयाजीचे स्वप्न. बयाजीच्या स्वप्नातले घर दुमजली होते ही गावाच्या दृष्टीने पोटदुखी होती कारण गावात कोंडीबा पाटलाचे एकच घर दुमजली असते! हे स्वप्न बयाजी एकट्याने पाहत नाही. त्याचं अख्खं कुटुंब त्यात सामील असते.
चार दशके मुंबईच्या गोदीत काम करून आपल्या गावी आलेला बयाजी गावाकडे आपल्या मालकीचे घर बांधू इच्छितो. निवृत्तीनंतर मिळालेले फंडाचे सगळे पैसे कनवटीला बांधून गावात येतो. येताना आपल्या पोरापोरीसाठी बायकोसाठी तो कोणतीही चीजवस्तू आणत नाही. सर्वांचा हिरमोड होतो. त्याने एक ट्रंक आणलेली असते ज्यात फक्त भांडीकुंडी, खिळे आणि काही फोटो फ्रेम असतात.
लोकांनी मारलेले टोमणे सहन करत, दमदाटी सोसत बयाजी घर बांधतो. भिंतीच्या आतून त्याने एक जिना बांधलेला असतो जेणेकरुन गावाला असे वाटू नये की, ह्याने दुमजली घर बांधले आहे! नकळत त्याच्या मनातल्या दडपणाने त्याच्या इच्छेवर मात केलेली असते, पोटमाळ्यासारखा मजला बांधून झाल्यावर त्याचे घर पूर्ण होते. बाहेरून पाहणाऱ्या कोणत्याही माणसाला ते एक मजली घर वाटले असते अशी त्याची रचना असते!
बांधकाम उरकल्यावर एक दिवस ठरवून, बयाजी आपल्या नव्या घराचे 'वास्तुक' घालायचे ठरवतो. पाव्हण्या रावळ्यांना जेवणाचे निमंत्रण देतो, गावातल्या जिम्मेदार माणसांना पानसुपारीचे आवतण धाडतो. कारण त्यांना बयाजीच्या वस्तीमधले जेवण कसे चालले असते! आप्तेष्ट मंडळींसाठी शिरापुरीचा बेत होतो.
तो दिवस उजाडतो. घरापुढे मांडव उभा राहतो. लोक आवर्जून येतात. भजनी मंडळींकडून आंबेडकर आणि बुद्ध यांची भजने गायली जातात. जेवणावळी पूर्ण होतात. गावातले लोक त्याच्यावर जाम चडफडतात. 'भिकारडं माजलंय, ह्याच्याकडे बघितलं पाहिजे,' अशी शेरेबाजी होते आणि मध्यरात्र उलटल्यानंतर बयाजीच्या घराला आग लागते!
आग लावली गेली की लागली हे कळून येत नाही मात्र आपले घर वाचवण्यासाठी आग विझवण्याच्या नादात बयाजी होरपळून निघतो. त्यात त्याचा मृत्यू होतो. सुखाची झोप घेण्यासाठी गावाकडे राहायला आलेल्या बयाजीला अकाली सरणावर निजावे लागते! मरताना तो आपल्या मुलांना एकच सांगतो, 'मजल्याचं घर बांधा पोरवांनो माझी एकच इच्छा आहे!'
बयाजी मरून जेमतेम एक हप्ता उलटतो आणि बयाजीची पोरं कुदळ फावडी खोरे हाती घेऊन कामाला लागतात. गाव आश्चर्य करू लागतं, 'पोरांनो तुमचा बाप मरून अजुक धा रोज पण झालं नाहीत आणि तुम्ही हे काय लावलंय! त्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल!'बयाजीचा थोरला पोरगा उत्तरतो, "त्या साठीच तर हे चाललंय!"गावकरी विचारतात, 'पण तुम्ही करताय तरी काय?'"ही घराची सुरुवात हाय, ती पन दडग्या मजल्याची नव्हं! दुमजली घराची सुरुवात!" बयाजीचा पोरगा उत्तरतो. आणि त्यासरशी लागलीच त्याचे सारे कुटुंब नेटाने दुमजली घरासाठी कामाला लागते. इथे कथा संपते.
आज हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे होवाळ मांगाचे होते की महाराचे होते ह्या भिकार वादाने आलेला उद्वेग! हा साहित्यिक माझ्या जातीचा होता हे दोन्ही बाजूंच्या लोकांना आपल्या समाजाला सांगायचे आहे. कशासाठी, तर अस्मितेची चूल पेटवण्यासाठी! 'मजल्याचं घर मध्ये बयाजी मरून जातो आणि त्याची पुढची पिढी त्याच्या कामाचा वसा घेत तेचे स्वप्न पूर्ण करते.
वामन होवाळ आता हयात नाहीत, त्यांच्या स्वप्नातलं अक्षर साहित्याचं घर बांधण्याचा वसा कुणालाही नकोय मात्र त्यांच्या जातीचा वारसा अनेकांना हवाय! ही, त्या थोर व्यक्तीच्या विचारांची परवड आहे! ही लाजिरवाणी बाब आहे.
'मजल्याचं घर'मध्ये एका परिच्छेदात बयाजीचे घर पूर्ण झाल्यानंतर त्याने त्याच्या घरात कोणकोणत्या थोर महापुरुषांच्या तसविरी लावलेल्या आहेत याचा एक उल्लेख आहे. त्यात कर्मवीर भाऊराव पाटील आणि जोतिबा फुले यांचीही नावे आहेत. ही बाब महत्वाची आहे.
वामन होवाळ, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर गावचे. इथेच गावकुसाबाहेर त्यांचा जन्म झाला. अत्यंत संघर्षमय वातावरणात त्यांनी शिक्षण घेतले. रेल्वेत नोकरी केली. दलितांच्या व्यथा टोकदार शब्दांत मांडल्या. होवाळ लक्षात राहिले ते त्यांच्या कथाकथनामुळे. अन्य प्रीव्हिलेज्ड जातींच्या कथाकथनकारांच्या तुलनेत त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलं हे विशेष.
त्यांचे जन्मगाव अतिशय सुंदर निसर्गरम्य आहे, सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे मात्र त्यांच्या कथांतले गाव टोचणी देणारे आहे. जगण्याची साधने धडधाकट असली तर जगण्याचा, भोवतालाचा आनंद घेता येतो अन्यथा सारं काही बेगडी ठरतं.
वामन होवाळ यांच्या विचारांचा वारसा हवाय म्हणून समाज बाह्या सरसावून पुढे येत नाही तर त्यांच्या जातीशी आपली जात जोडली जावी म्हणून पुढे येतोय हे चित्र त्यांच्या संघर्षाचा, विचारांचा अपमान करणारे आहे! अर्थातच सर्वचजण ह्या विचारांचे आहेत असे नाही, त्यात काही अपवादही आहेत मात्र त्यांची संख्या नगण्य आहे. उपवर्गीकरणाचे निमित्त करुन दोन शोषित जातींत लावला गेलेला हांडगूळ एक सुनियोजित कारस्थान आहे हे देखील समाजाला कळू नये हे त्याहून वाईट आहे!
- समीर गायकवाड
