भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन् हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं.


खरंतर मास टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनीवरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिझल्ट यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे कोरोना नसलेल्या लोकांना, असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं.


या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन् त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिझल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार. पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय, त्याच्या साध्या टेस्ट्स करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली. मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन् छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग.?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते सोल्युशन.


देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या. एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन् देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन् त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती. साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन् त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री. ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंन्सीच्या आठव्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती.


रिस्क प्रचंड होतीच यात, कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव. हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती. झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती. अक्षरक्षः दिवस अन् रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन् या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती. सगळ्याच अन् त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती. परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं. हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं?


एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम. नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती. आता पुढे काय? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्तातनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा हिला तरी हार कशी मानू देणार होता. हिने खूप विचार केला अन् बॉसला अन् डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन् शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं.)


सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन् तिला तासाभरातच सिझेरियनसाठी दवाखान्यात भरती करावं लागलं. या स्थिततही तिने या किटचे रिझलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला अचूक येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटलमध्ये सिझेरियनसाठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली. आणि पाच दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन् टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला.


हे भारतातलं पहिलं Covid-19/कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं. एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं. हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिझल्ट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किटमध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. अॅक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि अचूक येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.)


संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेक्ट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल. ही रणरागिणी आहे, मिनल डाखवे-भोसले (रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, मायलॅब डिस्कव्हरी) तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो. शेवटी एवढंच की मीनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, एक तिच्या गोड अन् धाडसी बाळाला. दोन या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला.