28 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनक्रमात काहीच बदल नव्हता. मात्र, उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या मनात बदल्याची भावना खदखदत होती. मोदींच्या मनातील ही तीव्र खदखद त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनाही कदाचित कळू शकली नसेल.


पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरु असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विकासाच्या अजेंड्यावरुन लक्ष हटवलं नाही. त्यामुळेच की काय, 28 सप्टेंबरला साऊथ ब्लॉकमध्ये सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकासाच्या मुद्द्यावर ते पूर्णपणे मन लावून चर्चा ऐकत होते आणि त्यावर आपलं मत मांडत होते. यादरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचे कोणतेही संकेत पंतप्रधान मोदींनी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिले नाहीत.

पाकिस्तानला आता माफ न करण्याचा निश्चय केलेल्या पंतप्रधान मोदी उरी हल्ल्यानंतर अनेक रात्र नीट झोपलेही नव्हते. 28-29 सप्टेंबरच्या रात्री पंतप्रधान आपल्या कोअर टीमसोबत ‘7 लोककल्याण मार्गा’हून सर्जिकल ऑपरेशन मॉनिटरिंग करत होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, सर्जिकल ऑपरेशन यशस्वी झाल्याची बातमी येईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाण्याचा एक थेंबही प्यायले नव्हते. राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासह एनएसए अजित डोभाल आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोदी सातत्याने संपर्कात होते. ज्यावेळी सर्जिकल ऑपरेशन यशस्वी झाल्याची बातमी कळली, त्यानंतर म्हणजे 29 सप्टेंबरला सकाळी आपल्या खुर्चीवरुन उठून आराम करण्याऐवजी मोदी पुढील तयारीला लागले.

उरीमध्ये 18 सप्टेंबरला दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी देशभरातून आवाज उठू लागले. मात्र, मोदींनी अत्यंत शांततेने संपूर्ण परिस्थिती हातळली. देशातून पाकिस्तानविरोधात उठणारा आवाज आणि विरोधकांच्या टीका यांदरम्यान मोदींनी अत्यंत मोजक्या शब्दात म्हटलं होतं – “जवानों की शहादत व्यर्थ नही जाएगी”. मात्र, यावेळीही सर्वांना असंच वाटलं की, मोदींनी पुन्हा एकदा भाषणबाजी केली. मात्र, सर्जिकल ऑपरेशननंतर त्यांच्या विधानामागचं गांभिर्य सर्वांना कळलं असावं.

उरी हल्ल्यानंतर पुढील काही दिवस पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दिनक्रमात काहीच बदल केला नव्हता. त्यामुळे सर्वच स्तरातून पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्याच्या पंतप्रधान मोदींचा आदेश परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत गांभिर्याने घेतला होता आणि उरी हल्ल्यानंतर मोदींच्या आदेशाला अनुसरुन हालचालीही आणखी वाढल्या.

यूएनमध्ये जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार घणाघात केला. त्याचवेळी पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी होणाऱ्या इतर देशांनाही न सहभागी होण्यासाठी पटवून दिलं आणि इथेही एकप्रकारे भारताने पाकिस्तानचा पराभवच केला. दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदी प्रचंड दबावात होते. एका बाजूला त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते, तर दुसऱ्या बाजूला विरोधक टीकेची झोड उठवत होते. मात्र, मोदींनी यावरही शांत राहणं पसंत केलं.

सार्क परिषदेवरुन पाकिस्तान एकटं पडंल, यूएनजीएमध्येही पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांना काहीही भाव मिळाला नाही, त्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडण्यात आलं. एकंदरीत पाकिस्तानला एकामागोमाग एक धक्के दिले गेले. मात्र, या सर्व घडामोडींदरम्यान पंतप्रधान मोदी आपला दिनक्रम शांततेते पार पाडत होते. यावरुनच त्यांचं मनोधैर्य लक्षात येतं.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल ऑपरेशनच्या रात्री पंतप्रधान मोदी यांचे कार्यक्रम नेहमीसारखेच होते. कोणत्याही पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले नव्हते.

बुधवारी सकाळी साऊथ ब्लॉकमध्ये कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. त्यानंतर दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी विकास कामांवर होणाऱ्या प्रगती बैठकीत पंतप्रधान मोदी दुपारी 3.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सहभागी झाले. त्यानंतर 6.30 वाजता आपल्या निवासस्थानी म्हणजेच ‘7 लोककल्याण मार्ग’ येथे पोहोचले. तिथे आणखी दोन बैठकांना उपस्थिती लावली. मात्र, दिवसभरातील या सर्व घडामोडींदरम्यान मोदी यांनी सर्जिकल ऑपरेशनबाबत आपली चर्चा सुरुच ठेवली होती.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉन्चिंगपॅडच्या हालचाली दिसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ल्याचे परवानगी दिली. आपल्या सैनिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नको, अशा सूचनाही मोदींनी दिल्या. त्यानंतर संपूर्ण रात्रभर ऑपरेशनवर नजर ठेवण्यात आली.

सर्जिकल ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर सीमेवरील परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीसीएसची बैठक बोलावली, यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिरकर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, एनएसए अजित डोभाल, लष्करप्रमुख दलबीर सुहाग, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव एस. जयशंकर यांच्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

सीसीएसच्या बैठकीत नियंत्रण रेषेवरील (LOC) सद्यपरिस्थितीवर चर्चा झाली. त्याचसोबत राजकीय आणि आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्यासाठी मोदींची टीम कामाला लागली. देशाचा विकास आणि सुरक्षा या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, हेच मोदींनी या सर्व निर्णयांमधून दाखवून दिलं आहे.