- देशातील सर्वच प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये खरीपाच्या लागवडीत २५ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. कर्नाटकसारख्या काही राज्यात तर ही घट ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
- खरीप हंगामामध्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अति पावासाने किंवा अत्यल्प पावसाने कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं आहे.
- देशातील विविध भागात जुलै महिन्याच्या उत्तरार्धात कमी पाऊस किंवा अति पावसाने पिकांना फटका बसला. मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील बऱ्याचशा भागात ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लागवडीखालील कांद्यालाही फटका बसणार आहे.
- राज्यात २०१४ आणि २०१५ मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे ऊस उत्पादक शेतकरी कांद्याकडे वळले; मात्र दर गडगडल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पुन्हा उसाकडे मोर्चा वळवला आहे. राज्यात उसाच्या क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत ४५ टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये उसाचं गाळप झाल्यानंतरच काही क्षेत्र कांद्यासाठी उपलब्ध होईल. त्यामुळे बागायती क्षेत्रात लगेच मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड वाढण्याची शक्यता नाही.
- राज्याबाहेर मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत जिथे पूर्वी कांद्याची लागवड होत नसे- तिथेही कांद्याचे क्षेत्र वाढले होते. तिथले शेतकरीही कांद्याच्या दरामध्ये मे-जूनमध्ये झालेल्या पडझडीमुळे इतर पिकांकडे वळले आहेत. मागील हंगामात दर पडल्यामुळे हात पोळून घेतल्याने ते आता कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याची शक्यता कमी आहे.
- मागील आठवड्यापर्यंत देशात जवळपास ८५ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच कांदा लागवडीसाठी मर्यादित क्षेत्र उपलब्ध आहे.
- भारतातून २०१६-१७ मध्ये कांद्याची विक्रमी निर्यात झाली. त्यातच दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या साठवणुकीकडे आवश्यक तेवढं लक्ष दिलं नाही. त्यामुळे बराच कांदा चाळीमध्ये खराब झाला. तसेच मध्य प्रदेश सरकारने ८ रूपये किलो दराने तिथल्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा साठवणुकीच्या सुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला. त्यामुळे मागील हंगामातील शिल्लक कांद्याचे प्रमाण तुटपुंजे आहे. सोयाबीन किंवा तुरीप्रमाणे कांदा २-३ वर्ष साठवता येत नाही. त्यामुळे मागील हंगामातील कांद्याची आक्टोबरपूर्वी विक्री करावीच लागेल. त्यानंतर नवीन कांद्यावरच भिस्त असेल. त्यामुळे कांद्याचे दर टिकून राहतील.
ब्लॉग : शेतकऱ्यांनो घाबरु नका, कांद्याची तेजी कायम राहिल!
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2017 11:20 AM (IST)
कांदा शंभरावर गेला की सर्व शेतकरी कांद्याची लागवड करतात मात्र भरघोस पीक आलं की कांदा शेतातून बाजारात नेण्याचा खर्चही परवडत नाही. मग शेतकरी कांदा लागवड करत नाहीत, त्यावर्षी कांद्याला पुन्हा तेजी येते. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी कांद्यांच्या बाजारपेठेचं अर्थकारण उलगडून दाखवलंय शेती प्रश्नाचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी...
मागील जवळपास दीड वर्ष शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याचे दर एका महिन्यात तिप्पट झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण कांद्याची लागवड करावी अथवा नाही याबाबत अजूनही शेतकरी संभ्रमात आहेत. यापूर्वी २०१५ मध्ये आलेल्या तेजीमुळे अपारंपारिक क्षेत्रात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. उत्पादन वाढले आणि दर पडले. मग आता शेतकऱ्यांनी कांदा लावावा का? तर या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्यांना रागंडा कांद्याची लागवड करणं शक्य आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याने जमेल तेवढ्या क्षेत्रात लागवड करावी. दहा रूपये प्रति किलो दर ज्यांना परवडू शकतो, त्यातून जे नफा कमवू शकतात त्यांनी तर नक्कीच लागवड करावी. कारण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कांद्यामध्ये सध्या आलेली तेजी ही अपघात नाही किंवा ती थोड्या काळासाठी नाही तर ती २०१७ मध्ये नक्कीच टिकणार आहे. त्याची काही कारणे पाहूः