PM Modi Oath Ceremony : 400 पारचा नारा देत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या नरेंद्र मोदी आणि भाजपला २०१४ आणि २०१९ प्रमाणे स्वबळावर सत्ता काही स्थापन करता आली नाही. एनडीए म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरुढ झालेत खरे पण पुढील पाच वर्षे त्यांना प्रचंड कसरत करावी लागणार आहे. आघाडीचे सरकार चालवताना किती अडचणी येतात हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आणि मनमोहन सिंह यांच्या काळात दिसून आले होते. पण येथे एक मोठा फरक हा आहे की, त्यावेळी भाजप आणि काँग्रेसचे स्वतःचे संख्याबळ फारच कमी होते. आज तसे नाही. मोदींकडे २४० चे संख्याबळ आहे, स्वबळावर येण्यासाठी  त्यांना ३३ खासदार कमी पडल्याने त्यांना घटक पक्षांची पदत घ्यावी लागत आहे.


अन्य घटक पक्षांची तेवढी ताकत नाही मात्र तेलुगु देसमचे चंद्राबाबू नायडू आणि जडीयूचे नितीश कुमार हे सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. चंद्राबाबू आणि नितीश कुमार किंगमेकरच्या भूमिकेत असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर भाजपकडे एकून किती संख्याबळ आहे याची आकडेवारी समाज माध्यमांवर फिरु लागली. चंद्राबाबू किंवा नितीश कुमार एनडीएसोबत आले नाहीत तरी भाजपच्या सत्तेला धोका नाही असे त्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला होता.


दुसरीकडे काँग्रेस आणि इंडी आघाडीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु केला होता. नितीश कुमार यांना म्हणे इंडी आघाडीने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, मात्र नितीश कुमार यांनी ती फेटाळल्याचे सांगितले जात आहे. खरे तर नितीश कुमार यांनीच मोदींच्या विरोधाच विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी पावले उचलली होती. त्यांना इंडी आघाडी्चे संयोजक बनवले जाईल असे वाटत होते पण काँग्रेस आणि अन्य पक्षांनी नितीश कुमार यांना खड्यासारखे बाजूला करण्याचा प्रयत्न केला. नितीश कुमार यांच्या हे लक्षात येताच त्यांनी इंडी आघाडीशी काडीमोड घेतली आणि पुम्हा मोदींकडे गेले. नितीश कुमार यांचाही काँग्रेस वा इंडी आघाडीतील पक्षांवर विश्वास राहिलेला नाही.  


नितीशकुमार यांचा मागील इतिहास पाहता त्यांच्यावर सहजासहजी विश्वास ठेवायला कोणीही अगदी इंडी आघाडीपासून भाजपपर्यंत कोणीही तयार नाही. मात्र नरेंद्र मोदी यांची जेव्हा एनडीएच्या नेतेपदी निवड झाली तेव्हा बोलताना नितीशकुमार यांनी संपूर्ण वेळ मोदींसोबत राहाणार असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर भाषण संपल्यावर परत जाताना त्यांनी मोदींच्या पाया पडण्याचाही प्रयत्न केला, पण मोदींनी त्यांना थांबवले, खरे तर नितीशकुमार मोदींपेक्षा पाच-सहा महिन्यांनीच लहान आहेत मात्र त्यांनी जे काही केले ते पाहून मोदी आणि नितीश कुमार यांच्यात एकमेकांबद्दल असलेला विश्वास आणि बंधुता दिसून आली. असेही म्हटले जाते की, २००२ मध्ये जेव्हा गुजरातमध्ये दंगे झाले तेव्हा मोदींना हटवण्यासाठी सगळे कामाला लागले होते पण तेव्हा नितीश कुमार यांनी मौन बाळगत एक प्रकारे मोदींना मदतच केली होती. तेव्हापासून दोघांमध्ये चांगले संबंध झाल्याचे सांगितले जाते.


अर्थात शरद पवारांप्रमाणेच नितीश कुमार यांना राजकारणात काय होणार आहे याचा अंदाज लगेच येतो. मोदींसोबत राहिल्यानेच आपला फायदा होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मोदींसोबत राहाण्याचा निर्णय घेतला हे स्पष्टपणे दिसून येते. अशा या नितीशकुमार यांना पाच वर्ष सांभाळून घेऊन नरेंद्र मोदींना सत्ता राबवायची आहे. नितीश कुमार कधी काय करतील याबाबत कोणीही सांगू शकत नाही. 


दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांनाही सांभाळायचे आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात चंद्राबाबूंचे भाजपमध्ये चांगले वजन होते. त्या काळात दिल्लीत असताना चंद्राबाबूंशी अनेकदा भेटी झाल्या होत्या अटलबिहारी वाजपेयी यांची ते प्रचंड प्रशंसा करीत असत. यावेळीही नरेंद्र मोदींची एनडीए नेतेपदी निवड झाली तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींची प्रशंसा करीत पुढील पाच वर्षात देश जगातील तीसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असे म्हटले. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देताच शेअर मार्केटने उसळी घेतली होती. या दोघांच्या पाठिंब्याने मोदी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि देशात राजकीय स्थिरता राहील असा विश्वास शेअर बाजारातील सटोडियांना वाटल्यानेच ही उसळी आली होती. चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती तयार करायची आहे, ज्याची पायाभरणी त्यांनी २०१८ मध्ये केली होती. पण सत्ता गेल्याने त्यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प रखडला होता. आता याप्रकल्पासाठी त्यांना केंद्राकडून भरीव मदत लागणार आहे आणि नरेंद्र मोदींकडून ते काम करून घेणे हे चंद्राबाबूंचे महत्वाचे कारण आहे. 


नरेंद्र मोदींना या दोघांना सांभाळून घेण्यासोबतच काँग्रेसने राज्यघटनेबाबत जनमानसात भाजपविरोधात तयार केलेले नरेटिव्ह संपूर्णपणे पुसून काढावे लागणार आहे. मोदींचा मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न या निवडणुकीत पूर्णपणे फसल्याचे दिसून आले. मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर इंडी आधाडीकडे वळल्याने भाजपला मोठे नुकसान झाले. केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदू, दलित आणि अन्य धर्मीय मतेही भाजपपासून दूर गेल्याचे निवडणुकू निकालावरून दिसून येत आहे. हे मतदार पुन्हा भाजपकडे वळण्याचे आव्हान नरेंद्र मोदींसमोर आहे.


काँग्रेस आगामी काळात भाजपला बदनाम करण्यासाठी सर्व प्रकारचे कारनामे करणार आहे. संसदेतील पुतळे नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरु झाले आणि काँग्रेसने यावरून मोदींना घेरण्यास सुरुवात केलीच आहे. खरे तर हे पुतळे दुसरीकडे नेण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या आधीच घेण्यात आला होता. मात्र तेव्हा काँग्रेसने काहीही केले नाही, आता मात्र त्यांना आयते कोलीत मिळाले आहे, यासोबतच अदानींवरून राहुल गांधी नरेंद्र मोदींना टार्गेट करीतच आहे. जनतेच्या मनात मोदी हे अदानींचे हे जे नरेटिव्ह सेट झाले आहे त्यालाही मोदींना आगामी काळात सामोरे जावे लागणार आहे. या संकटाचा सामना करतानाच देशाला पुढे घेऊन जाण्याचे कामही नरेंद्र मोदींना करावे लागणार आहे. या सर्व आघाड्यांवर मोदी यशस्वी झाले तरच २०२९ मध्ये भाजपला पुन्हा यश मिळू शकेल. अर्थात भाजपने २०२९ ची तयारी सुरु केलेलीच आहे, त्याला काँग्रेस कसे प्रत्युत्तर देते त्यावरच सर्व काही अवलंबून आहे.