मोहम्मद पैगंबरांविषयी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी अपशब्द वापरल्यानंतर आखाती देशांनी अत्यंत कडक भूमिका घेतल्याने प्रथमच भारतीय जनता पक्षाला बॅकफूटवर जावं लागलं आहे. यामध्ये सौदी अरेबियाचाही (Saudi Arabia) समावेश आहे. जगभरातील मुस्लीमांसाठी मक्का मदिनामुळे (Islam’s holiest city) सौदी अरेबिया त्यांच्यासाठी आदराचे स्थान आहे. त्या देशातील भूमिका जगभरातील मुस्लिमांसाठी प्रमाण मानली जाते. मुस्लिमांमध्ये शिया सुन्नी (shia sunni conflict) असा रक्तरंजित संघर्ष असतानाही, तरी पवित्र स्थानांसाठी मात्र एक आहेत. त्या सौदी अरेबियातील दम्माम शहरामध्ये मी चार वर्ष (2014 ते 18) या कालावधीत वास्तव्यास होतो. या कालावधीत तेथील बदल अगदी जवळून पाहिला आहे. तेथील बदलाच्या नोंदी विविध दैनिके, ब्लाॅग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आलो आहे. 


सौदी अरेबियात 26 लाखांवर भारतीय 


2014 पासूनचा कालावधी जसा सौदी अरेबियासाठी आव्हानात्मक होता, तितकाच भारतासाठी सुद्धा नव्या स्वप्नांची उमेद दाखवणारा कालावधी होता. कारण भारतात मोदी (PM narendra modi) पर्व याच कालखंडामध्ये सुरु झाले होते, तर सौदीमध्येही पेट्रोल आणि डिझेलमधून अब्जावधी रुपये मिळवल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दराला ओहोटी लागली होती. तो दर इतका खाली आला की तब्बल 145 डाॅलरवरून थेट तो 20 डाॅलरपर्यंत येऊन कोसळला. त्यामुळे तेलावरील अवंलबित्व कमी करण्याशिवाय कोणताही मार्ग सौदीसमोर नव्हता आणि नेतृत्व होते अवघ्या 29 वर्षीय क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman Al Saud) यांच्याकडे. देशाच्या अर्थव्यवस्थेला वित्तीय तुटीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सौदीची झोप उडाली होती. 



आज घडीला सौदी अरेबियात तब्बल 26 लाख भारतीय (indians in saudi arabia) नोकरी करत आहेत. सौदीच्या अर्थव्यवस्थेला हातभार ते लावत आहेतच, पण परकीय चलनाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेलाही बळ देत आहेत. सौदी अरेबियामधील ही संख्या संयुक्त अरब अमिरातीनंतर (जवळपास 34 लाख भारतीय) सर्वांधिक आहेत. सौदीच्या अमानवी शिक्षा आजही चर्चिल्या जातात. तशा शिक्षा आपल्याकडेही द्याव्यात असेही आजकाल अनेक हिंदुत्ववाद्यांना आणि नवहिंदुत्ववाद्यांना वाटत असते. गेल्या काही दिवसांपासून देशात अल्पसंख्यांकावरील हल्ल्याच्या वाढत्या घटना आणि देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने स्वीकारलेलं मौन व्रत हे हिंसा करणाऱ्यांना अधिक बळ देत आहे. मात्र सौदी अरेबियामधील असे दोन प्रसंग आहेत जे आपल्यासाठी आजच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी पुरेसे आहेत. तसेच पीएम मोदींच्या मौनावर चपखलपणे भाष्य करतात. 


आणि धार्मिक पोलिसांचे सौदीच्या राजाने पंख छाटले


सौदीत धार्मिक पोलिस आहेत, त्यांना 'मुतावा' (saudi religious police) असेही म्हटले जाते. त्या मुतावांचे जे प्रमुख असतात त्यांना सौदी मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट रँक असून ते थेट राजेंना रिपोर्ट करतात. त्यामुळे त्या मुतावांचा देशातील अतिरेकी उन्माद काही नवीन नव्हता. इस्लामिक नियमांची अंमलबजावणी करण्याचे जबाबदारी त्यांच्याकडे असते. सौदी अधिकाऱ्यांनी परिभाषित केल्याप्रमाणे वर्तन, ड्रेस कोडचे पालन, सार्वजनिक ठिकाणी लैंगिक भेदभाव आणि प्रार्थनेच्या वेळी दुकाने बंद आहेत की नाही यावर ते देखरेख करतात. 


नमाज पठणावेळी कोणी बाहेर (स्थानिकांसाठी अधिक कडक नियम ) असल्यास किंवा महिलांचा सार्वजनिक ठिकाणी अबाया नसल्यास त्यांची खैर नसायची. 2016 मध्ये याच उन्मादी मुतावांनी फेब्रुवारी 2016 मध्ये राजधानी रियाधमध्ये (Saudi capital riyadh) एका तरुणीला बेदम मारहाण केली. यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटले. मुतावांचे अधिकार सनातन्यांना खुप चांगले आणि सोयीचे वाटत होते, पण उदारमतवादी आणि तेथील तरुणाईला त्याबाबत प्रचंड राग होता. तरुणीच्या मारहाणीचे प्रकरण तापू लागल्यानंतर 33 वर्षीय क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेत सगळे मुतावांचे अधिकार काढून घेतले आणि सौहार्दाने वर्तणूक करण्याचा आदेश दिला. प्रश्न विचारणे, ओळख विचारणे, ताब्यात घेणे किंवा अटक करणे हे सर्व अधिकार त्यांनी रद्दबातल करून टाकले. 


महिलांना मुख्य प्रवाहात आणले


क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना भूमिका बदलल्याशिवाय आणि अर्थव्यवस्था सर्वव्यापी केल्याशिवाय कोणताही पर्याय दिसत नव्हता. सौदी अरेबियाने व्हिजन 2030 (saudi arabia vision 2030) ची आखणी करून तेलावरील सौदी अर्थव्यवस्थेचे अवलंबित्व कमी करण्यास सुरुवात केली. महिलांना अधिकार देण्यास सुरुवात केली. त्यांना शिक्षण, नोकरी या माध्यमातून पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. लाल समुद्राला लागून कृत्रिम शहराची उभारणी सुरु आहे. पेट्रोल डिझेल जे पाण्याच्या दरात मिळत होते, त्याचेही दर वाढवण्यात आले. कर प्रणाली सु्द्धा लागू करण्यात आली. जनतेची सबसिडी सुद्धा कमी केली. खासगीकरणाला सुरुवात केली. उर्जा क्षेत्रात गुंतवणूक, आफ्रिका आशिया आणि युरोपला व्यापाराच्या माध्यमातून जोडणे आदी बाबींचा त्यामध्ये समावेश होता. या सर्व प्रकल्पांवर सध्या काम सुरु आहे. 


इस्त्राईलशी दोस्ती केली 


ज्या ईस्त्राईलशी जगभरातील मुस्लीम राष्ट्रांचा संघर्ष आहे त्याच इस्त्राईलशी द्विपक्षीय संबंध (saudi arabia and israel diplomatic relations) सुधारण्यावर भर दिला. जगभरातील जवळपास 57 मुस्लीम देश इस्त्राईलला दुश्मन मानतात, तरीही सौदीने करून दाखवलं. पासपोर्टवर इस्त्राईल व्हिसा असला, तरी सौदीमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. तर हे सर्व का केलं ? तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये झालेली अभूतपू्र्व घसरण. काळाची पावले ओळखून 36 वर्षीय क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ज्या यहुदींशी इस्लामच्या जन्मापासून संघर्ष आहे त्यांच्याशी सुद्धा जुळवून घेतले. 


ज्या देशाला आणि देशातील व्यवस्थेला जगाच्या पाठिवर रानटी समजले जाते त्याच देशात बदलाची प्रक्रिया गेल्या सहा सात वर्षांपासून होत आहे. रुढीवादी परंपरेचा दबाव असतानाही ही प्रक्रिया कासव गतीने का होईना पण होत आहे. मात्र, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात मात्र, जो काही सनातन्यांकडून धार्मिक उन्माद सुरु आहे त्यावरून जगात नाचक्की सुरु आहे. तुलना दोन देशांची तुलना कधीच होऊ शकत नाही, पण जी गोष्ट जाचक आहे ती बदलून टाकण्यास राजकीय नेतृत्व प्राधान्य देत आहे आणि आपले पंतप्रधान शांतपणे पाहत असतील तर हे अराजकतेला आपण निमंत्रण देत आहोत यात शंका नाही. भाजपने वादग्रस्त प्रवक्त्यांना निलंबित केलं असलं, तरी जागतिक पातळीवर झालेली हानी ही कधीही न भरून येणारी आहे.