समतेचा, पुरोगामी बाण्याचा संदेश फक्त राज्याला नव्हे, तर देशाला देणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात गेल्या काही महिन्यांपासून जी गोष्ट सर्वसामान्य निष्पाप जनता, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांकडून जाहीरपणे बोलली जात होती ती धार्मिक दंगल (Kolhapur Violence) अखेर घडलीच. सात स्टेट्सने कोल्हापुरात दंगलीची ठिणगी पडली आणि त्यानंतर शहरात हिंसक जमावाने ठराविक परिसर, ठराविक दुकाने तसेच हातावर पोट असणाऱ्या ठराविक लोकांच्या फळांच्या कपबशीच्या हातगाड्या उलटवून कोणता बाणेदारपणा दाखवला? हा प्रश्न अनुत्तरित आहे. अल्पवयीन भरकटलेल्या टीनपाटांनी मिशा फुटायच्या आधीच औरंगजेब आणि टिपू सुलतानचा स्टेट्स लावून दोन दिवस शाहूनगरी वेठीस धरायला लावली हा प्रकारच संतापात भर टाकणारा आहे.


ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्यांच्याच शिवराज्याभिषेक दिनी केवळ स्टेट्स लावले म्हणून दंगली घडवण्याइतपत आपण आणि आपलं कोल्हापूर एवढं कमजोर झालं आहे का? या भूमीतही दंगल पेटू शकते हा संदेश तर आपल्या कृतीतून दिला नाही ना? याचा विचार भरकटलेल्या नेतृत्वाने आणि आपल्याच लोकांवर दगड उचलणाऱ्या तरुणाईने करण्याची गरज आहे. सोशल मीडियातील विषवल्ली पसरवणारा नंगानाच कोल्हापूरच्या देदीप्यमान वारशाला काळीमा फासणारा ठरला आणि कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच इंटरनेट बंद ठेवायची वेळ आली. शिवराज्यभिषेक दिनी पहिल्या दिवशी जातीय तणावाचा भयकंप झाल्याने दोनशे कोटींवर पाणी सोडायची वेळ झाली, तर त्यानंतर 31 तास इंटरनेट बंद ठेवल्याने तोच आकडा 1 हजार कोटींवर गेला आहे.


पन्हाळ्यातील अनुभव पुरेसा नव्हता का?


कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा तालुक्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गेल्या काही दिवसांपासून घडल्या आहेत हे पोलीस प्रशासनाला माहित नव्हते का? मंगळवारी चार तास दंगलसदृश्य परिस्थिती होऊनही नेमके कोणी हात बांधले होते? बघ्याची भूमिका का घेतली? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. शाहू महाराज छत्रपती यांनी जमाव नियंत्रणात न आल्यास, पोलिसांनी हवं असल्यास आपल्याला बोलवावे, असे सांगूनही त्यांना का बोलावण्यात आलं नाही? त्यांनी जाहीरपणे खंतच बोलून दाखवल्याने पोलिसांसह जिल्हा प्रशासनाचा नाकर्तेपणा लपून राहिलेला नाही.


पन्हाळ्यात मजार पाडण्याचा प्रकार झाल्यानंतर तत्कालिन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तातडीने स्वत: सकाळीच घटनास्थळी हजर होते. सर्वधर्मियांकडून मजार पुन्हा बांधली जात असताना ते स्वत: त्या ठिकाणी उपस्थित होते. परिस्थिती नाजूक असल्याने त्यांनी चोख बंदोबस्त तैनात करत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. हा अनुभव किमान नव्या पोलीस अधीक्षकांना नसला, तरी पोलीस कर्मचाऱ्यांना नव्हता का? असा प्रश्न उपस्थित होतो.


पोलिसांच्या नाकर्तेपणाने अनेक प्रश्न अनुत्तरित


कोल्हापुरात पोलिसांची खांदेपालट झाली असली, तरी पोलीस कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात हिंदुत्ववादी नेत्यांची ताकद किती आहे? याची माहिती नाही का? असे म्हणणे दूधखुळपणाचे ठरेल. जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सुद्धा हिंदुत्ववादी नेते म्हणून घेणाऱ्यांची ताकद किती आहे हे सांगू शकतो. त्यासाठी कोणत्या गुप्तचर अहवालाची गरज नाही. असे असतानाही हजारोंचा जमाव कोठून आला? कोणी फूस लावून आणला? शिवाजी चौकात विटा दगड कोठून आले? बाहेरचा जमाव कसा आणि कोणत्या पद्धतीने पोहोचला? बंदी आदेश मंगळवार संध्याकाळी सहा वाजल्यापासून असतानाही शिवाजी चौकात दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच जमाव नेमक्या कोणाच्या स्वागतासाठी आणि कोणाला भडकवण्यासाठी जमू देण्यात आला? शिवराज्यभिषेक दिनी झालेला आगडोंब पाहता बुधवार दुपारी सत्यानाश होईपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होते? सर्व होऊन गेल्यानंतर 31 तासांची इंटरनेट बंदी पाहता वरातीमागून घोडं नेण्याचा अट्टाहास प्रशासनाचा होता का? असाही प्रश्न उपस्थित होतो.


तोकडा बंदोबस्त, अन् बेकाबू जमाव


जमाव जमल्याचे सोशल मीडियातून व्हायरल होत असताना पुरेसा बंदोबस्त का मागवण्यात आला नाही? पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सकाळी अकराच्या सुमारास आणि त्यानंतर आयजी सुनील फुलारी साडे बाराच्या सुमारास जमाव अनियंत्रित झाल्यानंतर शिवाजी चौकात दिसून आले. तेच परिस्थितीचे भान ओळखून जमाव हुज्जत घालत असतानाच बंदी आदेशान्वये तो नियंत्रित करता आला नसता का? की जमलेल्या जमावाला बंदी आदेशातून सूट देण्यात आली? तोकड्या बंदोबस्तातून पोलीस कर्मचाऱ्याची हिंसक जमावाच्या मागून फरफट झाल्याचे स्पष्ट दिसून आले. जमाव बेभान होईपर्यंत पोलिसांची बघ्याचीच भूमिका दिसून आली. परतून जाताना जमाव बेभान होतो, हा पुर्वानुभव होता, तर त्यानुसार पावले का उचलली नाहीत? असाही प्रश्न उपस्थित होतो.


कोल्हापूर जिल्ह्यातील जातीय तणाव माहित नव्हता का?


कोल्हापुरात अनुचित प्रकार घडू शकतो याबाबतची निवेदने पोलीस प्रशासनाला अधीक्षक कार्यालयात जाऊन तत्कालिन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यांपासून विशेष करुन हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सलग जातीय तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. इतका ढळढळीत पुरावा असतानाही कोल्हापूर शहरात मंगळवारी झालेल्या भयकंपानंतर कोल्हापूर पोलिसांना हिंदुत्ववादी आणि मुस्लीम समाज संघटनांना एकत्रित बसवून तोडगा काढता आला असता. आजवर ही परंपरा दिसून आली आहे. त्याचबरोबर तातडीचा उपाय म्हणून इंटरनेट बंदीचा निर्णय बुधवारी संध्याकाळी घेतला तो मंगळवारी संध्याकाळी सुद्धा घेता आला असता, पण तसंही झालेलं दिसून आलं नाही.


शहरातील सीसीटीव्ही धूळ खात पडले


कोल्हापूर शहरात सेफ सिटी अंतर्गत 165 कॅमेरे 65 ठिकाणी बसवले आहेत. त्या कॅमेऱ्यांमधून 261 व्ह्यू आहेत. मात्र, ही यंत्रणाच पूर्णत: धूळखात पडली आहे. याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गर्दीचा अंदाज घेऊन कारवाई करणे सहज शक्य होते. पण कॅमेरेच धूळखात पडले आहेत. तसेच सर्व्हिलन्स व्हॅन, पोलीस अॅड्रेस सिस्टम नेमकी कोणत्या ठिकाणी होती? हे सुद्धा दिसून आलं नाही. कोल्हापूर जळाल्यानंतर शांतता समितीची आणि प्रशासनाची बैठक बुधवारी सायंकाळी पार पडली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर एवढं सगळं होऊनही बाजू काढताना दिसून आले. मेघा पानसरे बोलतानाही वाद घालण्याचा प्रकार घडला. या बैठकीसाठी माजी गृहराज्यमंत्री राहिलेल्या सतेज पाटील यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे शहर पेटत असताना राजकारण सुचते तरी कसे असाच प्रश्न उपस्थित होतो.