खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे
एबीपी माझा वेब टीम | 28 Nov 2016 09:39 AM (IST)
महाराष्ट्रात जवळपास ४३ मनपा व पालिकांसाठी केंद्र सरकारने अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन ऍण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अर्थात अमृत योजनेचा प्रारंभ केला आहे. या योजनेत शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनि:स्सारण व्यवस्था करणे, मलव्यवस्थापन व पर्जन्यजलसाठी स्वतंत्र वाहिनीची व्यवस्था करणे, शहरातील मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, परिवहन व्यवस्था यांमध्ये सुधारणा करणे आदी कामे होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने देशातील ५०० शहरांचा या अमृत योजनेत समावेश केला असून यात खान्देशातील जळगाव व धुळे या दोन्ही मनपांचा समावेश आहे. या शहरांमध्ये २०११५ – १६ ते २०१९ – २० या पाच वर्षांच्या कालावधीत विविध कामे केली जाणार आहेत. या अंतर्गत धुळे शहरासाठी पाणी पुरवठा व भूमिगत गटार योजनेसाठी जवळपास २८४ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर आहेत. यात अक्कलपाडा प्रकल्प ते नकाणे तलावच्या दरम्यानच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १४६ कोटी रुपये व भूमिगत गटार योजनेसाठी २३८ कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव आहेत. जळगाव मनपाला सुद्धा अमृत योजनेत पाणीपुरवठा योजनेसाठी २४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी १२४ कोटी रुपयांचे अुनदान प्राप्त झाले असून १९१ कोटी रुपयांच्या कामाची निविदा निघालेली आहे. जळगाव आणि धुळे शहरांची प्रत्येकी लोकसंख्या पाच लाखांच्या वर पोहचली आहे. या दोन्ही शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढीव वसाहतीत पाणीपुरवठ्यासह गटार योजनांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. मात्र, पाणीयोजना व भूमिगत गटार योजनांची कामे करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या निकषानुसार पात्र ठेकेदार मिळणे अवघड झाले होते. जळगाव मनपाने याबाबत पाठपुरावा करुन काही अटी शिथील करुन घेतल्या. धुळ्यातील प्रकरण अद्याप निविदास्तरापर्यंत आलेले नाही. जळगाव येथील कामासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आली. पहिल्यावेळी केवळ दोन ठेकेदारांनी दरासह निविदा भरल्या. त्या तीन हव्या होत्या, म्हणून प्रक्रिया पुढे सरकली नाही. दुसऱ्या निविदेनंतर चौघा ठेकेदारांनी दराच्या निविदा भरल्या आहेत. परंतु एका निविदेच्या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आल्यामुळे त्याचे त्रांगडे मुख्य़मंत्र्यांकडे पोहचले आहे. धुळ्यातही अशाच प्रकारे त्रांगडे फसू शकते. धुळ्यात सध्या तापी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, ती खर्चिक असल्याने मनपाला परवडत नाही. याला पर्याय म्हणून अक्कलपाडा प्रकल्पातून नैसर्गिक उताराने धुळे शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशा अक्कलपाडा ते नकाणे तलावापर्यंतच्या जलवाहिनीचा प्रस्ताव या अमृत योजनेत सादर आहे. याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे सांगण्यात येते. या योजनेचा पाठपुरावा आमदार अनिल गोटे करीत असून केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही लक्ष घातले आहे. धुळ्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी नैसर्गिक उताराची तांत्रिक बाजू तपासल्यानंतरच या योजनेच्या पुढील प्रक्रियेस गती मिळू शकते. जळगावात अमृत योजनेची निविदा मंजुरीची प्रकिया होणार होती. चार ठेकेदारांनी दर भरले आहेत. पंरतु ४ पैकी एका ठेकेदाराच्या कागदपत्रावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे पुढील कार्यवाहीचा चेंडू पाणी पुरवठामंत्री व नंतर मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. आता, मुंबईतून काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे. गिरीश महाजन पालकमंत्री व्हावेत ... विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे चंदुलाल पटेल हे दणदणित मताधिक्य घेवून विजयी झाले आहेत. या विजयामागे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव जिल्ह्यातील सर्व समावेशक राजकारण उपयुक्त ठरले आहे. गिरीश महाजन यांनी पटेल यांना विजयी करुन एका दगडात पक्षांतर्गत व इतर विरोधकांना गप्प केले आहे. महाजन हे सध्या नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद होते. आता जयकुमार रावल यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. या पार्श्वभूमिवर महाजन यांच्याकडे स्वतःचा जिल्हा म्हणून जळगावचे पालकमंत्रीपद दिले जावे अशी मागणी आता भाजपत जोर धरत आहे. जिल्ह्यात दुसरे राज्यमंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील आहेत. महाजन यांना पालकमंत्रीपद दिले गेले तर ते पाटील यांनाही हवेच आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील भाजपसह इतर काही पक्षांचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून गिरीश महाजन यांना जळगावचे पालकमंत्री करा अशी मागणी करण्याची शक्यता आहे.