श्रावण महिन्यात बाई व्रतांच्या फेऱ्यात
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2018 10:11 AM (IST)
श्रावण महिना सुरू होण्याआधीच स्त्रिया श्रावणाच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. पावित्र्याच्या नावाखाली आहेत नाहीत तेवढी सगळी कपडे धुवून ,भांडी घासून आधीच स्वच्छ असलेल्या घरदाराची पुन्हा सगळी स्वच्छता करतात
नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे. शनिवारी गटारी आमावस्या साजरी करणाऱ्या काही पुरूषांनी खाण्यापिण्याच्या बाबतीत दरवर्षीप्रमाणे कडक श्रावण ( मांसाहार वर्ज्य करणे ) पाळला असेल तर काहीजण श्रावणात दाढी न करण्याच्या परंपरेचे पाईक झाले असतील. पुरूषवर्गासाठी श्रावण महिना म्हणजे इतकेच काय ते पथ्यपाणी. पण तमाम स्त्रीवर्गासाठी श्रावण महिना म्हणजे वर्षभर मनात योजलेल्या धार्मिक विधींची पूर्तता करण्याची आणि परंपरागत व्रतवैकल्यांच्या नावाखाली देवदेव करण्याची सुवर्णसंधीच असते. आणि अशा संधीचं त्या सोनं न करतील तर नवलच. श्रावण महिना सुरू होण्याआधीच स्त्रिया श्रावणाच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. पावित्र्याच्या नावाखाली आहेत नाहीत तेवढी सगळी कपडे धुवून ,भांडी घासून आधीच स्वच्छ असलेल्या घरदाराची पुन्हा सगळी स्वच्छता करून ( तरीही स्वतःच्या स्वच्छतेवर विश्वास नसल्यासारख्या पुन्हा घरभर परमपवित्र गोमुत्र शिंपडतात ) अंगातलं त्राण आधीच घालवून बसलेल्या असतात. आणि मग आभाळातल्या / स्वर्गातल्या देवाला ( विशेषतः शंकराला) प्रसन्न करण्यासाठी आई/आजी/काकी/सासू यांचं अंधानुकरण करत वेगवेगळ्या उपवासाचं, व्रतांचं ओझं ओढून अंगावर लादून घेतात. स्वतःला मिळालेला हा व्रतवसा त्या पुन्हा आपल्या सुना-लेकींच्या पदरात टाकण्याचं कर्तव्यही चोख बजावतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शेकडा नव्व्यानव स्त्रियांचा कडक उपवास असतो. काही स्त्रियांची श्रावणी असते ( श्रावणी म्हणजे पूर्ण श्रावण महिनाभर दिवसातून केवळ एकच वेळ जेवण करणे). काहीजणी दिवसभर नुसत्या पाण्याच्या घोटावर राहतात आणि रात्री पोटाचा विचार न करता साग्रसंगीत जेवणाचा ( पचनास जड) गळ्यापर्यंत येईस्तोवर आस्वाद घेतात. काहीजणी दिवसभर चहाचे कपावर कप रिचवतात. काहीजणी तर देवाच्या इतक्या भक्त असतात की उपवासाचा अख्खा दिवस अन्न-पाण्याविना राहून आपण किती मोठ्या देवाच्या भक्त आहोत हे सिद्ध करत असतात. कारण ज्या स्त्रीचा अधिक कडक उपवास तिला देवधर्मवेड्या मंडळींमध्ये अधिक प्रतिष्ठा असते. ती स्त्री देवाच्या अधिक जवळची समजली जाते. धार्मिक कार्यात तिला अधिक मानसम्मान मिळतो. उपवास केला तर देव पावतो ( देव सुखा समाधानाचं आयुष्य देतो) आणि नाही केला तर कोपतो ( प्रत्येक कामात अडचणी, संकटे निर्माण करतो) अशा अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहात केवळ खेड्यातील अशिक्षित महिलाच अडकलेल्या आहेत असे मुळीत नाही उलट शहरी सुशिक्षित स्त्रियांनाही अशा उपास-तापासाच्या फलनिष्पत्तीवर भलता विश्वास आहे. श्रावणातल्या प्रत्येक दिवशी सोवळंओवळं पाळत तासतासभर देवपूजा करणाऱ्या स्त्रिया खेड्यातच नाही तर मोठमोठ्या शहरातही सापडतील. पावित्र्याच्या नावाखाली पूर्ण श्रावणभर नवऱ्याला अंगाला हातही लावू न देणाऱ्या स्त्रियासुद्धा एकवीसाव्या शतकात आहेत याचे आश्चर्य वाटायला नको. दारात आलेल्या भिकाऱ्याला अर्धी भाकर न देणाऱ्या स्त्रियांना श्रावण सोमवारी शंकराच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी ( दही,दूध,तूप,बेल,फुले ) कितीही पैसे गेले तरी चालणारे असते. यात काय चूक काय बरोबर याचा विचार करायला सवड कुणालाच नसते. श्रावणातली आणि इतरही व्रतं फक्त विवाहित महिलाच करतात असं मुळीच नाही. चांगला नवरा मिळून संसार चांगला होणे आणि अहेव मरण ( नवऱ्याआधी मरण ) मिळणे यातच स्त्रीच्या आयुष्याची इतीकर्तव्यता आहे हे अविवाहित मुलींच्या गळी उतरविण्याचं काम पद्धतशीरपणे आपल्या पुरूषाप्रधान संस्कृतीने केलं आहे. आणि हे सगळं संसार सौभाग्य व्रतवैकल्यांमुळेच मिळतं असा बिनबुडाचा विचारही पुरूषप्रधान संस्कृतीचीच देण आहे. म्हणून कित्येक शिकल्या सवरलेल्या, स्वावलंबी असणाऱ्या अविवाहित मुलीसुद्धा कडक श्रावण सोमवारचं व्रत करतात. दर सोमवारी महादेवाला अभिषेक, एकशे एकवीस बेल वाहणे, पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे असे कसलंही लाॕजिक नसलेले प्रकार अत्यंत मनोभावे करतात. एवढचं करून थांबत नाहीत तर फेसबुक, वाॕट्सअॕपवर श्रावण सोमवारचे, श्रावण चतुर्थीचे शुभेच्छा संदेश फाॕरवर्ड करत राहतात. श्रावणात श्रावण सोमवार बरोबरच श्रावण शनीवारही उपवास करतात. नागपंचमीला नागाला भाऊ समजून नागाचा उपवास धरतात. हा उपवास केल्याने भावाच्या आयुष्याचे कल्याण होते असा समज त्यापाठीमागे आहे. प्रत्यक्षात भावाच्या एकरभर जमीनीच्या तुकड्यातला अर्धा एकराचा वाटा मिळवण्यासाठी महिन्याला कोर्टाच्या फेऱ्या मारणाऱ्या, भावासोबत उभा दावा मांडणाऱ्या स्त्रियाही भावासाठी निरंकार उपवास धरतात. श्रावणातल्या चतुर्थीला इतर चतुर्थ्यांपेक्षा अधिक पवित्र आणि लाभदायक समजले जाते. म्हणून त्या दिवशीही उपवास करतात.एकूण काय तर तमाम स्त्रीवर्ग संपूर्ण श्रावण महिना व्रतवैकल्यांच्या फेऱ्यात अडकलेला दिसून येतो. यातून त्यांना नेमकी कसली मनःशांती आणि समाधान मिळते हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. विवाहित स्त्रियांचं उपवास करण्यामागचा पारंपरिक विचार म्हणजे देवाची कृपादृष्टी आपल्या घरसंसारावर, घरधान्यावर राहावी, त्याला उदंड आयुष्य लाभावे, घरात लक्ष्मी सदैव नांदती राहावी, मुलाबाळांचे कल्याण व्हावे..वगैरे..वगैरे.. असे असते. हीच जर उपवासाची फलनिष्पत्ती असती तर उपवास करणाऱ्या एकाही स्त्रीचा नवरा व्यसनी झाला नसता, मरण पावला नसता, घरात धन्यधान्याची बरकत असती, घरात पैसा अडका भरपूर आला असता, सदैव सुख-समृद्धी नांदली असती. आणि सगळ्या विवाहेच्छुक मुलींना हवे तसे नवरे मिळाले असते, त्यांचे संसार सुखाचे झाले असते. पण तसे होताना दिसत नाही. उपवास-तापासातून, व्रतवैकल्यांतून मिळणारी भावनिकदृष्ट्या देवावर विसंबून राहण्यातली एक सुरक्षितता असते ती स्त्रियांना हवी असते. आणि त्या तेवढ्याच वर्तुळात खूष असतात. त्यांच्यासाठी ही फारच सोपी गोष्ट असते. रोज केल्या जाणाऱ्या उपवासामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांची यत्किंचितही पर्वा देवभोळ्या स्त्रियांना नसते किंबहुना देव नावाच्या अदृश्य, काल्पनिक शक्तीवर त्या इतक्या विसंबून राहतात की ' उपवासाने आजारी पडलो तर देवच बरं करेल.' असा त्यांचा गाढा विश्वास असतो. उपवासाने शरीरातले पाणी कमी होते, पित्त वाढते, पचनशक्तीवर परिणाम होतो आणि सततच्या उपवासामुळे कित्येक स्त्रिया अॕनिमियाच्या शिकारही होतात. एकूणातच त्यांच्या संपूर्ण शरीरावर तात्कालिक आणि दूरगामी वाईट परिणाम होतात. माझ्या ओळखीतल्या एका स्त्रीला सततच्या कडक उपवास धरण्याने उठत-बसता चक्कर येण्याचं प्रमाण वाढलं तेव्हा डाॕक्टरांनी उपवास संपूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला पण तो सल्ला धुडकावून त्या आपलेच खरे म्हणत उपवास करत राहिल्या आणि एक दिवशी जिन्यावरून पडून कायमच्या अधू झाल्या. लग्न जमत नाही म्हणून वेगवेगळी व्रतं करणाऱ्या मुलीही उपवासाने अधिकच कोमेजून जावून निस्तेज दिसायला लागतात हे ही काही खोटे नाही. संस्कृतीरक्षणाची काळजी वाहणाऱ्या पूर्वजांनी व्रतवैकल्यांच्या निमित्ताने बाईला देवाची आणि पर्यायाने पुरूषजातीची गुलाम ( स्वतःच्या नव्हे तर मालकाच्या भल्यासाठीच गुलामाने प्रार्थना करायची असते असं इतिहास सांगतो.) करून टाकलं आहे हे उपवास-तापास करणाऱ्या,देवदेव करणाऱ्या कुठल्याही स्त्रिच्या मनीध्यानी नसते. हे देवदेव उपास-तापास आपण का करायचे आहेत? यातून खरंच काय साध्य होणारेय का? की आपणही डोळ्यांवर रूढींची पट्टी बांधून आपल्या पूर्वजांच्या हाताला हात लावून मम म्हणतोय? यातले कुठलेच प्रश्न त्यांना पडत नसावेत असे वाटते. आणि पडत असतील तर त्या या गोष्टींना विरोध न करता शांत कशा राहू शकतात हा मोठा प्रश्न आहे. आपल्या पूर्वजांनी स्त्रियांच्या मानगुटीवर दिलेलं धर्मकार्याचं, व्रतवैकल्यांचं जू फेकून द्यायची धमक क्वचितच काहीच स्त्रियांकडे असते. त्यांचे सदैव कौतुक आहे परंतु मानसिक गुलामगीरी पत्करलेल्या तमाम देवभोळ्या भारतीय स्त्रियांच्या अंगी ज्या दिवशी अशी धमक येईल, व्रतवैकल्यांमधला, पूजापाठातला फोलपणा त्यांना कळेल त्या दिवशी त्या सर्व स्त्रिया खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतील. कविता ननवरे यांचे आधीचे ब्लॉग