मार्केट (Share Market) जेव्हा सगळ्यात सेफ आहे असं वाटतं तेव्हा केलेली गुंतवणूक ही सगळ्यात रिस्की गुंतवणूक असते आणि मार्केट जेव्हा सगळ्यात जास्त रिस्की आहे असं वाटतं तेव्हा केलेली गुंतवणूक ही सगळ्यात जास्त सेफ असते. आर्थिक क्षेत्रातील माझ्या दोन दशकांपेक्षा जास्त काळाचा अनुभव असं सांगतो, की भारतीय स्टॉक मार्केट हे प्रचंड अनिश्चित आहे. भारताच्या वित्तक्षेत्रातील आजवरच्या इतिहासाचा विशालकाय पट डोळ्यासमोर ठेवल्यास त्यात असंख्य चढउतार दिसून येतात. अनुभवी आणि नवखे गुंतवणूकदारही या चढउतारांच्या अव्याहतपणे चालणाऱ्या चक्रात योग्य वेळ साधून जास्तीत जास्त परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु या सातत्याने सुरू असलेल्या आकड्यांच्या खेळाचा अभ्यास केल्यास त्यातून काही विरोधाभासात्मक निष्कर्ष निघतात. त्यापैकी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, स्टॉक मार्केटमध्ये फायदा होईल असा आशावाद ज्या वेळी सर्वात जास्त असतो, त्या वेळी केलेली गुंतवणूक जास्त असुरक्षित असते, याउलट जेव्हा बाजारात मंदीचं वातावरण असतं तेव्हा केलेली गुंतवणूक जास्त सुरक्षित असते आणि चांगला परतावाही मिळवून देते.


हर्षद मेहता आणि 1992 चा सिक्युरिटी स्कॅम


नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला भारतात आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं वारं वाहत होतं. थेट परकीय गुंतवणुकीसाठी भारताची दारे खुली झाल्याने शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. या तेजीच्या काळात हर्षद मेहता नावाचा एक ब्रोकर रातोरात प्रसिध्द झाला. स्वतःकडे असलेल्या काही कंपन्यांच्या शेअर्सचे भाग गगनाला भिडवून त्याने बाजारात अभूतपूर्व तेजी आणली होती. त्यावेळी भारताचं शेअर मार्केट आता याच उंचीवर कायम राहील असं अनेकांना वाटत होतं.परंतु झालं असं, की हर्षद मेहाताने बँक सिक्युरिटीमध्ये केलेला कुप्रसिध्द घोटाळा बाहेर आला आणि शेअर मार्केटचा फुगवलेला फुगा फुटला! भाव चढलेल्या अनेक कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले आणि त्या शेअर्समध्ये ज्यांनी तेजीच्या काळात आपले पैसे गुंतवले होते त्या गुंतवणूकदारांना याचं मोठं नुकसान सोसावं लागलं. याच्याच अगदी उलट प्रकार त्यानंतर घडला. हा घोटाळा झाल्यानंतर सामान्य गुंतवणूकदारांचा शेअर मार्केटवरचा विश्वास उडाला होता. परंतु ज्यांनी त्या गोंधळाच्या परिस्थितीतही संयम बाळगला, त्यांच्यासाठी मुळातच भक्कम असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची ही सोनेरी संधी होती, आणि ती त्यांनी साधली.


2008 ची जागतिक मंदी आणि तिचे भारतात उमटलेले पडसाद


2008  या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेलं अभूतपूर्व मंदीचं संकट हे फक्त पश्चिमेकडील देशांपुरतं मर्यादित नव्हतं. जागतिक वित्तसाखळीला जोडल्या गेलेल्या भारतीय शेअर मार्केटमध्येही या मंदीचा विपरीत परिणाम जाणवला होता. 2000च्या दशकाच्या मध्यावर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे भारतात शेअर मार्केट तेजीत होतं. सेन्सेक्स वाढत होता आणि आपण करत असलेली गुंतवणूक सुरक्षित आहे असं लोकांना वाटत होतं.परंतु जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आणि त्याच्या सोबतीने भारतातलं शेअर मार्केटही कोसळायला सुरुवात झाली. गुंतवणूकदारांची त्यातून घोर निराशा झाली. पुढे वर्षभरात आर्थिक मंदी आटोक्यात आली आणि शेअर मार्केट पुन्हा वर गेलं. डोळसपणे आणि बारकाईने अभ्यास करून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी मंदीच्या काळात भाव उतरलेले शेअर्स विकत घेतले आणि त्यातून चांगला नफाही मिळवला. रिस्कच्या तळाशी कुठेतरी खरी जास्त परतावा मिळवण्याची संधी दडलेली असते हे यातून सिध्द झालं.


कोरोना काळातली मार्केटमधील अनिश्चितता


वरील सर्व उदाहरणांमध्ये आणखी एका आर्थिक संकटाचा सामावेश करता येईल, ते म्हणजे कोरोनाच्या जागतिक संकटांचा काळ. त्याच्या आधीच्या काळात मार्केटमध्ये मंदी कधी येईल याची चर्चा सुरू होतीच, परंतु हे चढउतार पचवण्याइतकं स्थैर्य मार्केटमध्ये होतं. परंतु जागतिक महामारीची चाहूल लागली अनिश्चितता वाढली तेव्हा मार्केटमध्ये अचानक मंदी आली. पण या पडझडीच्या काळातही अनेक छुप्या संधी होत्याच. औषध निर्मिती, बँकिंग, फायनान्स, आयती, या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचा भाव या काळात वाढला. या काळात ज्यांनी आपली गुंतवणूक अशा वाढू शकणाऱ्या शेअर्सकडे वळवली त्यांना योग्य नफा कमावणं शक्य झालं.


या विरोधाभासाचं करायचं काय? 


गुंतवणूकदारांसाठी धोरणे वर उल्लेख केलेल्या काही ऐतिहासिक प्रसंगांमधून आपल्याला भारतीय स्टॉक मार्केटबद्दल कोणते धडे मिळतात ते पाहू...




  1. अभ्यास हीच गुरुकिल्ली  : मार्केटच्या चढउतार आणि आकड्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करा. त्या त्या क्षेत्रांमधील शॉर्ट टर्म ट्रेंड पाहण्याच्या ऐवजी दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास कोणता शेअर जास्त परतावा मिळवून देईल याचा विचार करा.




  2.  गर्दीच्या मागे जाणे टाळा :  मार्केट तेजीत असताना लोकांच्या आकांक्षा वाढलेल्या असतात. त्यातून सगळेच गुंतवणूक करण्याच्या विचारात असतात. अशा वेळी गर्दीच्या मागे न जाता अभ्यासपूर्वक निर्णय घ्या.




  3.  मंदीच्या बाजारात तुमची क्षमता टिकवा:  मंदीचा काळ हा संघर्षाचा काळ तर असतोच, परंतु मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी हा उत्तम काळ असू शकतो. कमी दरात उपलब्ध असलेले पण पाया भक्कम असलेले शेअर्स किंवा म्युच्युअल फंड निवडा आणि ते या काळात खरेदी करा.




  4. गुंतवणूक डायवर्सिफाय करा : तुमची गुंतवणूक अनेक क्षेत्रांमध्ये विभाजित करा. यामुळे फक्त रिस्क कमी होते असं नाही, तर जास्त परतावा मिळवून देऊ शकणाऱ्या अनेक संधींची दारेही खुली होतात.




  5. पर्सनल फायनान्समधील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या : मार्केटमधील गुंतागुंत समजून घेण्यासाठी तुम्हाला या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा फायदा तुम्हाला होऊ शकेल.




असंख्य संधी आणि तितकीच आव्हानं गुंतवणूकदारांसमोर उभी करणारं भारतातलं शेअर मार्केट हे गुंतवणुकीच्या एका जागतिक तत्वानुसार चालतं. ते तत्व म्हणजे, जेव्हा इतर लोक जास्त परताव्याचा लोभापायी जास्त गुंतवणूक करतात तेव्हा तुम्ही रिस्क घेणं टाळा, आणि जेव्हा इतर लोक रिस्क घ्यायला तयार नसतात तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा. मार्केटमधील हा विरोधाभास समजून घेतल्यास गुंतवणूकदार आपल्यासमोर असलेल्या आव्हानांचं थेट संधीत रूपांतर करू शकतात आणि त्यातून जास्तीत जास्त नफाही कमवू शकतात.