T20 World Cup 2024 Ind vs ENG: नोव्हेंबरमध्ये सांगता झालेल्या वनडे वर्ल्डकपनंतर सातच महिन्यात झालेल्या क्रिकेटच्या दुसऱ्या महाकुंभाची भैरवी आता जवळ आलीय. टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या मैदानात रोहितसेनेने सेमी फायनल गाठलीय. वनडे वर्ल्डकपमध्ये फायनलपर्यंत अजिंक्य राहिलेल्या भारताचा वारु कांगारुंनी रोखला. यावेळी भारत आणि अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर कांगारुंचं पॅकअप झालंय. तर, भारत एकही सामना न गमावता सेमी फायनलमध्ये दाखल झालाय. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारख्या नावाजलेल्या संघांना आपण धूळ चारलीय. विंडीज आणि अमेरिकेत रंगत असलेल्या या स्पर्धेत कडक परफॉर्मन्सने त्यांच्या विश्वासाचा नायगारा धबधबा भरभरून वाहतोय.


या स्पर्धेत काही गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळाल्या. रोहितसोबत विराट ओपनिंगला खेळतोय. दोन सम्राट सुरुवातीलाच मैदानात उतरुन प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करतायत. एरवी अशा व्यूहरचनेने आपलं ब्लडप्रेशर वाढवलं असतं. दोघंही विकेट गमावून बसले तर...या विश्वचषकात मात्र असा कोणताही जर...तर किंतु परंतु आपल्या मनात नाही. आपण अत्यंत पॉझिटिव्ह माईंडने मैदानात उतरतोय. वनडे वर्ल्डकपप्रमाणेच आपण इथेही कुणा एकावर अवलंबून नाहीये. म्हणजे पाहा ना...कोहली त्याच्या विराट फॉर्ममध्ये नाहीये, तरीही आपल्याला फरक पडलेला नाही. इथे मधल्या फळीची कामगिरी मॅटर करते. वनडे वर्ल्डकपप्रमाणेच आपण पाच फलंदाज, पाच गोलंदाज आणि एक यष्टीरक्षक अशा कॉम्बिनेशनने खेळतोय. त्यात या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये अत्यंत सुखावणारी बाब म्हणजे आपल्याकडे अल्टरनेट बॅट्समन लेफ्ट हॅण्डर आहे. ऋषभ पंतच्या समावेशाने टीमच्या देहाला आक्रमकतेच्या सिक्स पॅक ॲबची ताकद आलीय. त्याचं डावखुरं असणं, त्याचं आक्रमकतेने तुटून पडणं, तसंच सुरु आहे. गंभीर दुखापतीतून सावरुन पंतने जी नवी इनिंग सुरु केलीय, ती काबिल-ए-तारीफ आहे. डावखुरा शिवम दुबेही संघात आलाय. अक्षर पटेल आहे, रवींद्र जडेजा आहे. डावखुऱ्या-उजव्या फलंदाजांच्या कॉम्बिनेशनने अपोझिशन टीमची लाईन अँड लेंथ डिस्टर्ब होते. त्यामुळे बॅटिंग लाईनअपमध्ये डावखुरे असणं महत्त्वाचं.


या स्पर्धेतली एक लक्षणीय बाब म्हणजे रोहित, विराटसारखे सम्राट बॅट्समन कोसळल्यावरही युवा सैनिक किल्ल्याचं रक्षण करताना दिसलेत. कधी पंत, कधी दुबे संघाची नौका तारतायत. कधी सूर्यकुमारच्या तेजाने प्रतिस्पर्धी झाकोळतायत. तर, कधी पंड्याच्या तडाख्यात गारद होतायत. हे चित्र सुखावह आहे. असं सातत्याने होत राहिलं तरच दबावाचा डोंगर झुगारत रोहित, कोहलीसारख्या मशीनगन धावांच्या गोळ्या सुसाट सोडतील. कोहलीसाठी टी-ट्वेन्टीला ओपनिंग हा काहीसा नवीन रोल आहे, म्हणजे आयपीएलमध्ये तो ओपनिंग करतोच. पण, आंतरराष्ट्रीय मंचावर आता तो सलामीला खेळतोय. या स्पर्धेत तरी त्याच्या कोहली स्टँडर्डला मॅच होणारा परफॉर्मन्स त्याला देता आला नाहीये. त्यामुळे इंग्लंडला सांभाळून राहा, अशीच वॉर्निंग जणू त्याने दिलीय. संघात डावखुऱ्या बॅट्समनसोबतच डावखुरा वेगवान गोलंदाज असणंही अनमोल आहे. टी-ट्वेन्टीमध्ये अर्शदीपच्या रुपात आपल्याला तो गवसलाय. त्याच्याकडे चांगला स्विंग आहे. हाणामारीच्या षटकातला प्रभावी यॉर्करही त्याच्या भात्यात आहे. धीम्या गतीचा चेंडू आहे. थोडा वेग त्याने अॅड केला तो आणखी धोकादायक गोलंदाज होऊ शकेल. या स्पर्धेत तो आता सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. अर्थात त्याच्या विकेट्सचं श्रेय त्याने बुमराला दिलंय. अर्शदीप म्हणतो, बुमरा एका एन्डने फलंदाजांना जखडून ठेवतो. मग ते माझ्यावर आक्रमण करायला जातात आणि विकेट मला मिळते.


आपले तीन डावखुरे फिरकीपटू ही आपल्या भात्यातली महत्त्वाची अस्त्र आहेत. तिघेही डावखुरे असले तरी तिघांची गोलंदाजीची शैली भिन्न आहे. म्हणजे जडेजा पारंपरिक डावखुरा फिरकीपटू आहे. त्याला चांगला टर्न मिळतो. कुलदीप चायनामन स्पिनर आहे. तर, अक्षर पटेल हा उंचापुरा असल्याने त्याला बाऊन्स चांगला मिळतो. शिवाय तो टर्नपेक्षा लाईन अँड लेंथवर लक्ष देतो. त्यामुळे पॉवर-प्लेमधील क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेमध्ये तो गोलंदाजी करतो आणि बॅट्समनना रोखतो. हार्दिक पंड्याच्या रुपात टी-ट्वेन्टीसाठी उपयुक्त अष्टपैलू आपल्याला लाभलाय. जो गोलंदाजीचा कोटा पूर्ण करतोय आणि फलंदाजीतला षटकारांचा कोटाही. आपल्याकडे बॅटिंग डेप्थ चांगली आहे. फिल्डिंगमध्ये चांगलं चाललंय. अक्षरने ऑस्ट्रेलियाच्या मॅचला पकडलेला मार्शचा कॅच तर काळजाचा ठोका चुकवणारा होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये हिटमॅन रोहितच्या सुपर हिट कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ४१ चेंडूंत ९२, ,सात चौकार, आठ षटकार. विराटची विकेट गेल्यावर रोहितने जो तडाखा दिला. त्यात ऑसी गोलंदाजीचा पालापाचोळा झाला. डावखुऱ्या स्टार्कच्या चेंडूला तर त्याने पहिल्याच षटकात स्टेडियमच्या चारही बाजूंना सहल घडवून आणली. मॅच बघतोय की. हायलाईट्स असा प्रश्न पडण्याइतक्या वेगाने रोहित चेंडू ठोकून काढत होता. तर, कमिन्सचं वेलकम त्याने ज्या षटकाराने केलं, तो पाहून कॅडिकला सचिनने २००३ च्या वर्ल्डकपमध्ये मैदानाबाहेर भिरकावलं होतं, त्या सिक्सरच्या आठवणी जाग्या झाल्या. उर्वरित सामन्यांसाठीही रोहित त्याची एक्स्प्रेस बॅटिंग सुरुच ठेवेल, हा विश्वास वाटतो.


इथे जसप्रीत बुमराची पाठही थोपटावी लागेल. तो आपली विकेटची थाळी आहे. कोणतीही सिच्युएशन असो, कोणतीही खेळपट्टी असो, कोणतीही टीम असो, फलंदाज डावखुरा असो किंवा उजवा. बुमराच्या जाळ्यात तो अडकतोच. स्विंग, बाऊन्सर, स्लोअरवन, यॉर्कर, अराऊंड द विकेट अशा मेन्यूने त्याची थाळी सजलेली असते. थाळीतला प्रत्येक पदार्थ समोरच्या बॅट्समनची चव बिघडवणारा असतो. पाकविरुद्धच्या मॅचमध्ये रिझवानची तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये हेडची विकेट घेत त्याने सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं.
एकूणात सारी भट्टी जमून आलीय. कोहलीची एक मोठी इनिंग आणि जडेजाचा एक विकेट टेकिंग स्पेल याची आता प्रतीक्षा आहे. सेमी फायनलमध्ये इंग्लिश आर्मीशी दोन हात करायचेत. बटलर आणि कंपनीला कमी लेखण्याची चूक आपण नक्कीच करणार नाही. २०२२ मधील टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सेमी फायनलमधील पराभव आपल्या मनात सलत असणार हे नक्की. या पराभवाचं उट्ट फेडण्याची हीच ती वेळ. पण, पहिल्या ओव्हरपासून त्यांच्यावर दबावाचा डोंगर ठेवू, ज्याच्याखाली त्यांचा आत्मविश्वास चिरडून जाईल. नॉक आऊट सामन्यात पहिल्या ओव्हरपासून सामन्यावरची ग्रिप सुटू न देणं महत्त्वाचं.


दुसऱ्या उपांत्य फेरीत आपल्यासारखीच अजिंक्य राहिलेली दक्षिण आफ्रिका आणि किवी तसंच कांगारुंना झटका देणारी अफगाणिस्तानची टीम भिडतेय. अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पाळणा हलून काहीच वर्ष झालीत. तरी त्यांचा परफॉर्मन्स वयात आलाय. त्यांचे फिरकी गोलंदाज, वेगवान गोलंदाज ही त्यांची जमेची बाजू आहे. राशिद खानच्या रुपातला क्लासी लेग स्पिनर त्यांना कॅप्टन म्हणून लाभलाय. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नसला तरीही त्यांनी जे सामने जिंकलेत ते हृदयाची धडधड वाढवून जिंकलेत. नेपाळविरुद्ध एका धावेने, बांगलादेशविरुद्ध चार धावांनी, इंग्लंडविरुद्ध सात धावांनी त्यांनी मिळवलेले विजय सफाईदार नव्हते तर, ब्लडप्रेशर मीटर वाढवणारे होते. तर वेस्ट इंडिजविरुद्ध १२३ चं टार्गेट गाठतानाही त्यांचा घामटा निघालेला. आता नॉक आऊट मॅचमध्ये अफगाणी टीमसोबत दोन हात करताना त्यांची परीक्षा असेल. एकूणात सेमी फायनलमध्ये असलेले चारही संघ तोडीस तोड खेळण्याची क्षमता बाळगून आहेत. सेमी फायनलची रेस जिंकून २९ जूनला वर्ल्डकप कवेत घेतलेला रोहित शर्मा मला पाहायचाय. ऑल द बेस्ट टीम इंडिया.


संबंधित बातमी:


जिद्दीचं दुसरं नाव - ऋषभ पंत